सोलापूर : उजनी धरणात सध्या १२० टीएमसी पाणी असून, त्यात ५६.४५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पाणी सोडण्याच्या आवर्तनात बदल केला आहे. रब्बीसाठी एक, तर उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडण्याचे नियोजन केले आहे. रब्बीचे आवर्तन १० ते १५ जानेवारीदरम्यान सोडले जाणार आहे, असे सांगण्यात आले. पुढील आठवड्यात कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर या बाबत निर्णय होणार आहे. जिल्ह्यात रब्बी पिकांमध्ये ज्वारी, गहू, मका, हरभरा, सूर्यफूल यासह तृणधान्यांची पेरणी सुमारे साडेतीन लाख हेक्टरवर झाली आहे. जिल्ह्यात उसाचेही क्षेत्र मोठे आहे. दरवर्षी रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने सोडली जातात, तर उन्हाळ्यात एक आवर्तन सोडले जाते. मात्र, शेतीसाठी पाण्याची खरी गरज उन्हाळ्यात पडते. त्यामुळे दर वर्षीचे नियोजन बदलून रब्बी हंगामात एक, तर उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडण्याचा प्रयोग गतवर्षी करण्यात आला. त्या नियोजनाचे शेतकऱ्यांनी स्वागत केल्याने यंदाही तसाच प्रयोग केला जाणार आहे. डावा, उजवा कालवा, सीना-माढा, दहीगाव, शिरापूर उपसा सिंचन योजना आणि भीमा-सीना बोगद्याद्वारे पाणी सोडले जाणार आहे. पाटबंधारे विभागाने सर्व नियोजन केले आहे; परंतु कालवा सल्लागार समितीच्या मंजुरीनंतर उजनीतून पाणी सोडले जाणार आहे. अकरा टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. त्यानुसार १० ते १५ जानेवारी दरम्यान हे पाणी सोडले जाईल, असे सांगण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.