जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक सिंचनासाठी फायदा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा खंड आहे. या स्थितीत खरीप पिकांच्या सिंचनासाठी जायकवाडी धरणातून डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले संरक्षित पाणी आवर्तन सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डाव्या कालव्याच्या पाण्यामुळे झरी (ता. पाथरी) येथील तलावांमध्ये रविवारी (ता. १८) सकाळी आठपर्यंत ४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. ढालेगाव, खडका बंधाऱ्यांमध्ये कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. उजव्या कालव्याच्या पाण्यामुळे माजलगाव धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे डिग्रस बंधाऱ्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. येलदरी, सिध्देश्वर या धरणांतील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. परंतू,या दोन्ही धरणांमध्ये अद्याप उणे पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. २० लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून परभणी जिल्ह्यात पावसाची उघडीप आहे. त्यामुळे जिल्ह्यातील झरी (ता.पाथरी) येथील लघु तलाव वगळता अन्य लघू तलावातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.

निवळी (ता.जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्प, सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे या प्रकल्पातील पाणीसाठ्यात बाष्पीभवन तसेच उपश्यामुळे घट झाली आहे. रविवारी (ता.१८) सकाळी आठ वाजेपर्यंत निम्न दुधना प्रकल्पामध्ये उणे १९.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. येलदरी धरणात उणे १.८३ टक्के, सिध्देश्वर धरणात उणे ५९.६४ टक्के पाणीसाठा होता.गोदावरील नदीवरील डिग्रस बंधाऱ्यामध्ये १.२३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे.

रविवारी (ता.१८) सकाळी आठ वाजता जायकवाडी धरणातून डाव्या कालव्याद्वारे १४०० क्युसेक, उजव्या कालव्याद्वारे ९०० क्युसेक, नदीपात्रामध्ये जलविद्युत केंद्रातून १५८९ क्युसेक, दरवाजाद्वारे ४१९२ क्युसेक असा एकूण ८ हजार ८१ क्युसेक विसर्ग सुरू होता. उजव्या कालव्याद्वारे ०.०६ टीएमसी पाण्याची आवक झाल्यामुळे माजलगाव धरणात एकूण २.२९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. डाव्या कालव्याच्या पाण्यामुळे झरी (ता.पाथरी) येथील लघू तलावांमध्ये ०.०२५ टिएमसी (४५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. यामुळे परिसरातील गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे.

डाव्या कालव्याद्वारे ढालेगाव (ता. पाथरी) तसेच खडका (ता. सोनपेठ) येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. ढालेगाव बंधारा भरल्यानंतर मुद्दगल  येथील बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यात येईल. डाव्या कालव्याचे पाणी परभणी तालुक्यात पोचले आहे.परंतु गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आलेले पाणी जिल्ह्यात पोचले नव्हते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com