परभणी जिल्ह्यात पाणीटंचाई वाढतेय

सिध्देश्वर धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला आहे.
सिध्देश्वर धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला आहे.
परभणी : वाढते तापमान, बाष्पीभवन, उपसा आदी कारणांमुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे. अनेक तलाव कोरडे आहेत. विहिरी, बोअरची पाणीपातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे अनेक गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावरील ग्रामस्थांना पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. दिवसागणिक पाणीटंचाईची दाहकता वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या २६ पर्यंत वाढली आहे.
 
रविवारी (ता. ६) पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात ३७.६९ टक्के, माजलगाव प्रकल्पात १८.९१ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात ३५.७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. आठवडाभरामध्ये या तीन धरणांतील पाणीसाठ्यात अनुक्रमे ३.०८, २.३१, २ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर या दोन्ही धरणांतील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. या धरणामध्ये आता केवळ मृत पाणीसाठ शिल्लक राहिला आहे.
 
करपरा मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्यात आठवडाभरात ३ टक्के घट झाली असून, रविवारी या धरणामध्ये १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. मासोळी धरणामध्ये आता केवळ मृत पाणीसाठा असून, त्यामध्येही घट होत आहे. धरणांवर अवलंबून असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे.
 
२२ लघु तलावांपैकी टाकळवाडी, जोगवाडा, बेलखेडा, चिंचोली, आडगाव, दहेगाव हे सहा तलाव कोरडे पडले आहेत. नखातवाडी, तांदूळवाडी, राणी सावरगाव, कोद्री, देवगाव, वडाळी, चारठाणा, केहाळ, भोसी या नऊ तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेलेला आहे.
 
उर्वरित तलांवापैकी झरी (ता. पाथरी) येथील तलावांमध्ये जायकवाडी डाव्या कालव्याचे पाणी सोडण्यात आल्यामुळे पाणीसाठ्यामध्ये ९७ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. पेडगाव तलावात ४, आंबेगाव तलावात २, पिंपळदरीत ७, कवडामध्ये ९, मांडवी मध्ये ३, पाडाळीमध्ये ३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.  विहिरी, बोअर आटत चालले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी, टॅंकरची संख्या वाढत चालली आहे.
पालम तालुक्‍यात पाणीटंचाईची दाहकता सर्वाधिक आहे. या तालुक्‍यात ९ गावे आणि दोन वाड्यांना १३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पूर्णा तालुक्‍यातील पाच गावांना ५ टॅंकरने, गंगाखेडमधील २ गावे आणि दोन वाड्यांना ४ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
सेलू तालुक्‍यात एका गावात १ टॅंकर सुरू आहे. जिंतूर तालुक्‍यातील ३ गावे, १ तांडा यांसाठी ३ टॅंकर सुरू आहेत. परभणी, सोनपेठ, पाथरी, मानवत हे तालुके अजून टॅंकरमुक्त आहेत. टॅंकरसाठी १४ आणि टॅंकरव्यतिरिक्त १३५, अशा एकूण १४९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com