गोंदिया : पाणी पुरवठा योजनांची बिले थकीत असल्याने अनेक योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करावा, अशा मागणीचे पत्र खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना देण्यात आले.
जिल्ह्यात अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना असून, यापैकी अनेक योजनांचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे करण्यात आले नाही. त्यामुळे देखभाल दुरुस्ती आणि थकीत वीज बिलामुळे अनेक पाणीपुरवठा योजना बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाईची गंभीर समस्या आहे. अशा योजनांचे सर्वेक्षण करून नवीन स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष बाब म्हणून लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
अनेक गावात नळ योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालविण्यात येतात. तर वसूल करण्यात येणारी पाणीपट्टीची रक्कम फारच अल्प असल्याने ग्रामपंचायतीसमोर वीजबिल भरण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ग्रामपंचायतींना शासनाने यासाठी मदत करण्याची गरज आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. चारही योजना शिखर समितीच्या माध्यमातून सुरू आहेत.
पाण्याचे स्रोत बळकट असल्याने तालुक्यातील ५० गावांना नियमित पाणीपुरवठा केला जातो, परंतु या योजनेचे बांधकाम १९९७ मध्ये झाले असल्याने या योजनेचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. पाणीपट्टीतून ही योजना चालवताना तूट निर्माण होते. त्यामुळे शासनाने ही तूट भरण्यासाठी मदत करावी, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश होता. माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, विनीत शहारे यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.