'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून राबवावी : जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह

'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून राबवावी : जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून राबवावी : जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह

जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात ठेकेदारामार्फत ही योजना राबविल्याने यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. परंतु, आता शासनाने ही योजनाच बंद करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. शासनाने सामुदायिक चळवळीच्या माध्यमातून ही योजना चालू ठेवावी,’ असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.  जलसंपदा विभागातर्फे आयोजित कार्यशाळेसाठी ते जळगावात आले होते. जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात बुधवारी (ता. २२) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, जलयुक्त शिवार ही चांगली योजना आहे. सुरुवातीच्या काळात ती प्रभावीपणे राबविण्यात आली. मात्र, शेवटच्या टप्प्यात ही योजना मक्तेदारामार्फत राबविण्यात आल्याने त्यात भ्रष्टाचार झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी ही योजना केवळ कागदावरच राहिली.  राज्यातील नवीन शासनाने ही योजनाच बंद करण्याचे पाऊल उचलले ते चुकीचे आहे. शासनाने यात काही सुधारणा करून सामुदायिक चळवळीतून योजना राबविण्याची गरज आहे.  मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत देशात गंगा सफाई योजना राबविली. त्याबाबत ते म्हणाले, केंद्र सरकारने गंगा सफाईवर केलेला २० कोटींचा खर्च वाया गेला आहे. ही योजना चुकीच्या पद्धतीने राबविली आहे. त्यांनी केवळ घाट बांधण्यावरच खर्च केला. नैसर्गिक स्रोतातून गंगा नदी वाहती करण्याची गरज असताना, त्यावर घाट बांधले. शिवाय, नदीवर बांधही घालण्यात आले आहेत. केंद्र शासनाने आम्हाला आश्‍वासन दिले होते, की गंगा नदीचा फ्लो नैसर्गिक पद्धतीने ठेवण्यात येईल; परंतु ते आश्‍वासन पाळले नाही. त्यामुळे साध्वी पद्मावती यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याचा आज ३९ वा दिवस आहे. गंगा नैसर्गिक पद्धतीने वाहिली पाहिजे, यासाठी देशात आगामी काळात मोठे आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.  पीक पद्धती बदलण्याची गरज आगामी काळात जगात पाण्यासाठी युद्ध होणार असल्याचे स्पष्ट करून डॉ. राजेंद्रसिंह यांनी सांगितले, तिसरे युद्ध हे पाण्यासाठी तहानलेली राष्ट्रे आणि पाणी समृद्धीची पॉवर ज्यांच्याकडे अशी राष्ट्रे यांच्यात होणार आहे. भारतातही पाण्याची समस्या बिकट होणार आहे. त्यामुळे अद्यापही वेळ आहे. त्यामुळे हवामानावर आधारित पिके घेण्याची गरज आहे. सामुदायिक पद्धतीने शेती करण्याची गरज आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com