कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात सोयाबीन हद्दपार होण्याच्या मार्गावर

दरातील अनियमितता, प्रतिकूल हवामानामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी घट दिसून येते. हे क्षेत्र ऊस व भाजीपाल्याकडे वळत आहे. प्रत्येक वर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात घसरण थांबली नसल्याची स्थिती आहे. - गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी, शिरोळ गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीन घेणे बंद केले. अवकाळी पाऊस व रोगराईमुळे घातलेला पैसाही निघत नसेल, तर ते पीक घेऊन काहीच उपयोग नाही. यामुळे आम्ही उसाकडे वळत आहोत. - दीपक पाटील, शिरोळ
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात सोयाबीन हद्दपार होण्याच्या मार्गावर
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात सोयाबीन हद्दपार होण्याच्या मार्गावर

कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या जिल्ह्याचा पूर्व भाग आता या पिकांपासून दूर जात आहे. उत्पादकतेच्या बाबतीत मध्यप्रदेशाची स्पर्धा करणाऱ्या शिरोळ तालुक्‍यातील काही गावांत तर आता सोयाबीन शोधणे अवघड झाले आहे. गेल्या दहा वर्षांत शिरोळ तालुक्‍यातील सोयाबीन १४ हजार हेक्‍टरवरून घटून केवळ ९०० हेक्‍टरपर्यंत आले आहे. 

खरीप हंगामात जिल्ह्यात भाताखालोखाल सोयाबीनचे क्षेत्र असते. यामध्ये पूर्व भाग अग्रेसर असतो. पूर्व भागात पावसाचे प्रमाण जिल्ह्याच्या तुलनेत अत्यंत कमी असते. यामुळे या भागातील शेतकरी आगाप सोयाबीनची लागवड करतात. मे च्या शेवटच्या आठवड्यात पेरणी करून दिवाळीच्या अगोदर मळणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. पण, गेल्या दहा वर्षांत सोयाबीन उत्पादनाचे सूत्र पूर्णपणे बिघडून गेले आहे. 

प्रत्येक वर्षी तब्बल एक ते दीड हजार हेक्‍टरनी सोयाबीन क्षेत्रात घट होत गेली. सोयाबीनवर येणारा तांबेऱ्याचा प्रादुर्भाव, अवकाळी पावसाबरोबरच दरात नसलेले सातत्य शेतकऱ्याला सोयाबीनपासून दूर घेऊन गेले. वर्षाला एकरी २०-२५ हजार रुपयांपर्यंत खर्च करायचा आणि हातात केवळ दहा ते पंधरा हजार रुपये मिळायचे, हे उलटे चक्र सुरू झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली. हे सगळे क्षेत्र प्रामुख्याने ऊस व भाजीपाल्याकडे वळले आहे. 

बागायती असणाऱ्या अनेक मातब्बर गावांमध्ये ५०० हेक्‍टर क्षेत्र सोयाबीनचे असायचे. आता या गावात एक दोन हेक्‍टर क्षेत्र सुद्धा मुष्कीलीने मिळत आहे. तालुक्‍यातील जवळ सत्तर टक्के गावांतून सोयाबीन नामशेष होण्याची वेळ आली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

उत्पादनातही घट

शिरोळ तालुक्‍यातील सोयाबीनची उत्पादकता १६ ते १८ क्विंटल इतकी असायची. चांगल्या जमिनी व पाण्याची सोय असल्याने सोयाबीनचा दर्जा चांगला यायचा. परंतु, गेल्या दहा वर्षांत तांबेऱ्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. त्यावर नियंत्रण करण्यासाठी व्यवस्थापन खर्च वाढला. परिणामी, उत्पादनातही घट झाली. दरातही फारशी वाढ झाली नाही. व्यापाऱ्यांशिवाय इतर कुठेच विक्री होत नसल्याने फसवणुकीचे प्रमाण वाढले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com