जनावरांच्या बाजारासह आठवडी बाजार बंदच

नगर ः सलग दोन महिने लॉकडाउन करूनही कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने नगर जिल्ह्यात जनावरांच्या बाजारासह गावखेड्यातील छोटे-मोठे आठवडी बाजारही बंद आहेत. साडेतीन महिन्यांपासून जनावरांची खरेदी-विक्री तर बंद आहेच.
Weekly market closed with animal market
Weekly market closed with animal market

नगर ः सलग दोन महिने लॉकडाउन करूनही कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने नगर जिल्ह्यात जनावरांच्या बाजारासह गावखेड्यातील छोटे-मोठे आठवडी बाजारही बंद आहेत. साडेतीन महिन्यांपासून जनावरांची खरेदी-विक्री तर बंद आहेच. पण, छोटे-मोठे आठवडी बाजारही बंद असल्याने जिल्हाभरातील सुमारे वीस हजारांपेक्षा अधिक बाजारांतील किरकोळ विक्रेत्यांवर बाजार बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

जनावरांच्या खरेदी-विक्रीतून सुमारे दीडशे कोटींची, तर आठवडी बाजारातील किरकोळ विक्रीतून सुमारे दोनशे कोटींच्या वर उलाढाल थांबल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नगर जिल्ह्यात साधारण दहा ठिकाणी जनावरांचे मोठे बाजार भरतात, तर ग्रामीण भागात दोनशेपेक्षा अधिक गावांत आठवडी बाजार भरतात. जनावरांच्या प्रसिद्ध बाजारात लोणी (ता. राहाता) येथे गाईंसाठी, घोडेगाव (ता. नेवासा) येथे म्हशींसाठी, काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे शेळ्या-मेंढ्यांसह जनावरांसाठी; पाथर्डी, शेवगाव व बोधेगाव (ता. शेवगाव), वाळकी (ता. नगर) येथे बैलांसह अन्य जनावरांची खरेदी-विक्री होते. साकुर (ता. संगमनेर) व भाळवणी (ता. पारनेर) येथे शेळ्या-मेंढ्यांची खरेदी-विक्री होते.

कोरोना संसर्गामुळे हे जनावरांचे बाजार गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे बैल, दुभती जनावरे, गाई व शेळ्या-मेंढ्यांची खरेदी-विक्री ठप्प आहे. जनावरांच्या बाजारातून जिल्हाभरात दर बाजाराला सुमारे दहा ते बारा कोटींची तर किरकोळ आठवडी बाजारातून पंचवीस कोटींची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. जनावरांच्या बाजारांसह किरकोळ बाजारातून जिल्हाभरात सुमारे पंचवीस हजार किरकोळ विक्रेत्यांची उपासमार होत असल्याने साधारण पंधरा दिवसांपूर्वी श्रीगोंदा बाजार समितीने बाजार सुरू करण्याबाबत परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, अजून बाजार सुरू करण्याला परवानगी मिळाली नाही.

१ जुलैपासून बाजार सुरू होतील, अशी आशा होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने ती आशाही फोल ठरली. मात्र, ग्रामीण भागातील परिस्थिती पाहता कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून बाजार सुरू होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा श्रीगोंदा बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांनी व्यक्त केली.

घरखर्चच बंद झाला ग्रामीण भागातील आठवडी बाजारात शेतकरी किरकोळ प्रमाणात भाजीपाला, धान्य विकून घरखर्च भागवतात. आठवडी बाजार भरत असलेल्या बाजारपेठेच्या गावाशेजारील खेड्यातले अनेक लोक बाजार भरत असलेल्या ठिकाणी किरकोळ कामे करतात. यातूनच आठवड्याचा घरखर्च भागविण्याचा ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. साडेतीन महिन्यांपासून आठवडी बाजारच बंद असल्याने किरकोळ भाजीपाला, फळे व अन्य विक्रीसह बाजारात मिळणारे कामही बंद आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचा घरखर्चही बंद झाला आहे.

लोकांची गरज पाहता आठवडी बाजार, जनावरांचे बाजार सुरू होणे गरजेचे आहे. परंतु, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बाजार सुरू करणे तसे अडचणीचेच ठरणारे आहे. कारण, बाजारात दूरवरून व्यापारी व लोक येतात. त्यामुळे अधिक संसर्ग वाढण्याची भीती असते. - उद्धव देवकर, सचिव, बाजार समिती, राहाता, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com