`मी काय केले, हे विचारणाऱ्या अमित शहांनी काय केले?`: पवार

`मी काय केले, हे विचारणाऱ्या अमित शहांनी काय केले?`
`मी काय केले, हे विचारणाऱ्या अमित शहांनी काय केले?`

कन्नड जि. औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना ते जेथे जातात तेथे शरद पवारच आठवतात. पाच वर्षांपूर्वी शहा यांना कुणी ओळखतही नव्हते. केवळ मोदींचे मित्र व गुजरातचे आहेत म्हणून ते गृहमंत्री झाले. मी महाराष्ट्रात व देशात काय केले, हे पूर्ण जगाला माहीत आहे. मी काय काम केले, हे विचारणाऱ्या शहा यांनी काय केले, असा प्रश्न विचारून राष्र्टवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. 

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारासाठी शहरातील गिरणी ग्राउंड येथे सोमवारी (ता. १४) जाहीर सभा झाली. या वेळी उमेदवार संतोष कोल्हे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार नामदेवराव पवार, किशोर पाटील, द्वारकादास पाथ्रीकर, रंगनाथ काळे, हरीश‌चंद्र लहाने, अनिल पाटील सोनवणे, नगराध्यक्षा स्वाती कोल्हे, शेकनाथ चव्हाण, अशोक बरडे, अहमद अली, कल्याण पवार उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘बालाकोट हल्ला हा भारतीय सैन्याचे शौर्य आहे. हा हल्ला करण्यासंदर्भात माझ्यासह सर्व पक्षांनी सैन्याला सर्व अधिकार दिले होते. मात्र या सरकारने या हल्ल्याचे श्रेय घेतले. पूर्वी इंदिरा गांधी यांच्या काळात पाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले. मात्र त्यांनी कधीच त्याचे श्रेय घेतले नाही.’’

‘‘कापसाचा भाव विचारला तर ते ३७० कलम पुढे करतात. देशात, राज्यात कारखाने बंद पडले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. बेरोजगारी वाढली, नोकऱ्या गेल्या. मात्र त्यांचे ३७० च चालू आहे.  दिवस रात्र व झोपेतही ३७० कलम त्यांना आठवते. आमच्यासह सर्व पक्षांनी त्यास पाठिंबा दिला होता. आता ३७१ कलमही रद्द करावे,’’ अशी मागणी पवार यांनी केली.  

पवार म्हणाले, ‘‘कांद्याला दोन पैसे मिळू लागताच या सरकारने निर्यात बंद करून भाव पाडले. मी दिल्लीकरांचा विरोध पत्करून कांद्यावरील सर्व निर्बंध हटवले होते. विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री कापसाला ७ हजार रुपये भावाची मागणी करत होते. आता दिला का भाव? कन्नड तालुक्‍याची ओळख आले, टोमॅटो उत्पादक, पर्यटन अशी न राहता राज्यातील सर्वांत खराब रस्त्यांचा तालुका अशी झाली आहे. येथे प्रक्रिया उद्योग उभे राहिले नाहीत. तरुणांना रोजगार नाही. शेतकरी अडचणीत आहेत. १५ वर्षे खासदार राहणे सोपे आहे, पण एखाद्या गावात १५ वर्षे नगर सेवक म्हणून टिकून राहणे अवघड आहे.’’ 

‘‘केवळ चांगल्या कामाच्या व संपर्काच्या जोरावर संतोष कोल्हे कन्नड मध्ये नगरसेवक नाही, तर नगराध्यक्ष म्हणून सक्षमपणे उभे आहेत. आता हीच सत्ता तालुकभरात विस्तारित करा,’’ असे आवाहन त्यांनी केले. 

पवार यांनी रविवारी (ता. १३) वेरूळ येथे मुक्काम केला. रात्री व सोमवारी (ता. १४) सकाळी त्यांनी वेरूळसह कन्नड तालुक्‍यातील टापरगाव, हतनूरसह अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या वयातही आजाराला न जुमानता त्यांचा कामाचा व्याप व क्षमता या बाबत सामान्यांपासून ते नेते कार्यकर्त्यांत त्यांचीच चर्चा होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com