सांगली : चांगला पाऊस पडला तरच पेरणीचे धाडस

चांगला पाऊस पडला तरच पेरणीचे धाडस
चांगला पाऊस पडला तरच पेरणीचे धाडस

सांगली ः आत्ता कुठं उन्हाळी पिकाची काढणी झालीय... वळीव पाऊस झालाय पण त्यावर पेरणी करण्याची धाडस केलं नाय... शेतात मशागती सुरू हायती... पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करतोय... एखादा चांगला पाऊस झाला तरच पेरणी करणार असल्याचे सांगली जिल्ह्यातील शेतकरी सांगत होते.

यंदा मॉन्सून वेळेवर सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, जिल्ह्यात वळीव पावसाने कमी अधिक प्रमाणात झाला. मात्र, हा पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देणारा नव्हता. जिल्ह्यातील उन्हाळी पिकांची काढणी पूर्ण होऊन पंधरा दिवस झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे हाती घेतली आहेत.

दुष्काळी भागातील आटपाडी, कवठेमहांकाळ, जत तालुक्‍यात पावसाची प्रतीक्षाच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी कमी अधिक प्रमाणात पुढे येत आहेत. जिल्ह्यात सोयाबीनचे बियाणे १९ हजार १०० क्विंटलची मागणी केली असून, ५८ हजार ८०० हेक्‍टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, गतवर्षी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. यामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकाच्या लागवडीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्‍यता असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

शिराळा तालुक्‍यात धूळ वाफेवर भात पेरणी सुरू झाली आहे. तीही अल्प प्रमाणात झाली आहे. वाळवा, कडेगाव, पलूस तालुक्‍यांतील शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असल्याने काहीशा प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे धाडस केले आहे. मात्र, आता पाण्याची कमतरता पडू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करू लागला आहे.

भुईमूग बियाणे उपलब्धच नाही जिल्ह्यात बहुतांश शेतकरी भुईमुगाची लागवड आंतर पिकामध्ये केली जाते. भुईमुगाचे ९ हजार ६३० क्विंटल बियाणे कृषी विभागाने मागणी केली आहे. मात्र, अद्यापही भुईमुगाचे बियाणे उपलब्ध  होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याचाच अर्थ असा, की जिल्हा परिषद विभागाच्या कृषी विभागाने केवळ बियाण्यांची मागणी केली असल्याचे दिसते आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना बियाणे कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकरी करू लागले आहेत. 

तुरीच्या क्षेत्रात घटीची शक्‍यता दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठे महांकाळ, तासगाव तालुक्‍यांत तूर पीक प्रामुख्याने घेतले जाते. मात्र, तूर खरेदीचा गोंधळ आणि वारंवार शेतकऱ्यांना तूर विक्रीत अडचणी आल्यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. परिणामी यंदाच्या खरीप हंगामातील तुरीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्‍यता आहे. दोन वर्षांपूवी जिल्ह्यात सुमारे ११ हजार ४१३ हेक्‍टरवर तूर पिकाची पेरणी झाली होती. गेल्या वर्षी जिल्ह्यात ७ हजार २३२ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. यंदाही तुरीचे बियाणे केवळ ८५५ क्विंटलची मागणी केली आहे. तर कृषी विभागाने ७ हजार ४०० हेक्‍टरवर तुरीची पेरणी होईल, असा अंदाज त्यांच्या अहवालातून व्यक्त केला आहे.   

खत शिल्लक ः  २६८५० मेट्रिक टन    खरीप क्षेत्र ः ३ लाख ६१ हजार ४००   खरीप गावांची संख्या ः ६३१   बियाणे मागणी ः ५० हजार २९९ क्विंटल      

शेतीची मशागत करून ठेवली आहे. भुईमूग पेरणी करण्याचे नियोजन आहे. मात्र, भुईमूग बियाणे अजून उपलब्ध झाले नाहीत. - अधिकराव आंबी, बहे, जि. सांगली.

अवकाळी पाऊस अपेक्षित झाला नाही. उन्हाळी पिकांची काढणी झाली आहे. मशागतीला सुरवात केली आहे. पाणी उपलब्ध असल्याने पेरणी केली आहे. पण पाण्याची कमतरता भासू लागली आहे. उर्वरित क्षेत्रावर पाऊस सुरू झाल्यानंतर पेरणी करण्याचे नियोजन केले आहे.    - हणमंत कारंडे, शिवाजीनगर-कडेगाव, जि. सांगली.

जत तालुक्‍यात अवकाळी पाऊसच झाला नाही. मशागती करुन ठेवल्या आहेत. पावसाची प्रतीक्षा करतोय. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करणार नाही. - महेश पाटील, बालगाव, जि. सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com