शेळ्या-मेंढ्यांच्या छावण्या कधी?

आता पावसाळा तोंडावर आला आहे. एखादा पाऊस झाला की छावण्या बंद होतील. शेळ्या-मेंढ्यांचा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार असून आता छावण्या नेमक्या कधी सुरू होणार तेच कळत नाही. त्याएेवजी शेळ्या-मेंढ्यांसाठी थेट दावणीवर चारा द्यायला हवा. - गोरख पवार, शेतकरी, खांडगाव, ता. पाथर्डी
शेळ्या मेंढ्या
शेळ्या मेंढ्या

नगर ः राज्यांतील आठ जिल्ह्यांमध्ये शेळ्या-मेंढ्यासाठी छावण्या सुरू करण्याचा अध्यादेश महसूल व वन विभागाने दिला. त्याला आता दहा दिवसांचा कालावधी होऊन गेला तरी अजूनही नगर जिल्ह्यामध्ये शेळ्या-मेंढ्यासाठी छावणी सुरू झाली नाही. कधी सुरू होणार हेही प्रशासनाला सांगता येईना. त्यामुळे खरच छावणी सुरू होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेळ्या-मेंढ्याच्या चारा, पाण्याचा प्रश्न मात्र कायम आहे.   दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत शेळ्या-मेंढ्यासाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार अध्यादेश जारी करण्यात आला आहे. सोलापूरसह सातारा, सांगली, उस्मानाबाद, बीड, जळगाव, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांत या छावण्या सुरू करणार असल्याचे सांगितले. मात्र अद्याप एकही छावणी सुरू झालेली नाही. आता पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे शेळ्या-मेंढ्याच्या छावण्या नेमक्या कधी सुरू होणार असला प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नगर जिल्ह्यामध्ये दहा लाखांच्या जवळपास शेळ्या-मेंढ्याची संख्या आहे.  शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळ्या-मेंढ्याचे पालन करावे, यासाठी शासनच प्रोत्साहन देतेय. यंदाच्या दुष्काळात मात्र शेळ्या-मेंढ्या पालकांना सरकारने अक्षरशः वाऱ्यावर सोडले. आता कुठे पावसाळ्याच्या तोंडावर (दहा दिवसांपूर्वी) शेळ्या-मेंढ्यांच्या छावण्या सुरू करणार असल्याची घोषणा केली. छावणीत दाखल झालेल्या प्रती शेळी व मेंढीसाठी प्रत्येकी पंचवीस रुपये अनदान दिले जाणार आहे. पशुपालकांना छावणीत शेळ्या-मेंढ्या दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बंधन टाकण्यात आलेले नाही. मात्र, शेळ्या-मेंढ्यांच्या संरक्षणासाठी शेळ्या-मेंढ्यांच्या मालकांनी संरक्षण जाळे आणणे आवश्‍यक आहे.  छावणीतल्या प्रत्येक शेळी-मेंढीला प्रती दिन तीन ते चार लिटर स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. हिरव्या चाऱ्यात उसाचे वाडे किंवा उस देऊ नये. हिरवे वैरण उपलब्ध नसल्यास प्रती शेळी-मेंढी दोन किलोग्रॅम मूरघास द्यावे, असे या संदर्भातील आदेशात म्हटले. त्यालाही दहा दिवसांचा कालावधी उलटला असला तरी अजून त्याबाबत काहीच हालचाली दिसत नाहीत. आता पावसाळा तोंडावर आला आहे. मात्र, अन्य जनावरांसारखे शेळ्यांना सहजपणे खाद्य उपलब्ध होत नसलयाने शेळ्या-मेंढ्या जगविण्यासाठी संघर्ष सुरू आहे. सरकारने घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात शेळ्या-मेंढ्यांच्या छावण्या सुरू होणार तरी कधी असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.   प्रती शेळी-मेंढी चारा  हिरवा चाराः तीन किलो  वाळलेला चाराः एक किलो  पशुखाद्य (दिवसाआड)ः २०० ग्रॅम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com