दोन वेचणीतच संपले पांढरे सोने 

या वर्षी अल्पावधीतच कपाशीचे पीक लाल पडले होते, कच्ची बोंडे फुटून दोन वेचणीतच अल्पसा कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला आहे. बहुतांश शेतातीत पिकांची उलंगवाडी झाली आहे. पिकाला या वर्षी संततधार पावसाचा फटका बसला आहे.
White gold ran out of two sales
White gold ran out of two sales

नागपूर : या वर्षी अल्पावधीतच कपाशीचे पीक लाल पडले होते, कच्ची बोंडे फुटून दोन वेचणीतच अल्पसा कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला आहे. बहुतांश शेतातीत पिकांची उलंगवाडी झाली आहे. पिकाला या वर्षी संततधार पावसाचा फटका बसला आहे. 

बागायती कापसाला प्रति एकर ५ ते ६ क्विंटल व कोरडवाहू क्षेत्रात ३ ते ४ क्विंटल उत्पन्न येत आहे. त्यामुळे कापसाच्या भावात बऱ्यापैकी तेजी असून, खासगी व्यापारी साडेआठ हजार रुपये क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करत आहे. मात्र त्याला वेचणीचा खर्च जास्त येत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. या वर्षीच्या खरीप हंगामाची पेरणी मृग नक्षत्रात झाल्यामुळे बागायती व कोरडवाहू या दोन्ही कपाशीची वेचणी एकत्र आली. परिणामी, मजुरांची उपलब्धता कमी होऊन शेतकऱ्यांना १० ते १२ रुपये प्रति किलो वेचणीसाठी तर मजूर आणण्यासाठी वाहनाचे वेगळे भाडे देऊन कापूस वेचावा लागला. 

मजुरीत गेला शेतकऱ्यांचा नफा  या वर्षी वेळोवेळी अवकाळी पाऊस येत गेल्याने कपाशीचे पीक कमी कालावधीतच लाल पडले. कपाशीवर दह्या, करपासदृश रोगाचा प्रादूर्भाव झाला. परिणामी कच्ची अपरिपक्व बोंडे फुटल्याने सध्या तर एक दोन वेच्यातच या कपाशीची उलंगवाडी होत आहे. त्यामुळे साहजिकच उत्पन्नात घट जाणवत असून, काही शेतकऱ्यांना एकरी चार पाच क्विंटलचेच उत्पन्न हाती येणार आहे. तर दुसरीकडे कमी उत्पन्न असताना वेचणीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्यामुळे वाढीव भाव मिळून शेतकऱ्यांच्या हाती आलेला अधिकचा पैसा मजुरीत गेला आहे. शासनाने अती पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता सरसकट सर्व पिकांसाठी हेक्टरी मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

प्रतिक्रिया  मोठ्या प्रमाणात झालेल्‍या पावसामुळे शेतातील कपाशीची बोंडे लाल पडली. हंगामात पिकावर करपा सदृश रोगाचा प्रादुर्भाव झाल्‍याने उत्‍पन्नात घट झाली. त्‍यामुळे पीकविमा काढलेल्या व न काढलेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी.  -मनीष जाधव, शेतकरी, वागद, जि. यवतमाळ    या वर्षी सुरुवातीलाच कापूस पिकात नैसर्गिक आपत्ती आली. ऑगस्ट महिन्यांत पडलेला पावसाचा खंड, ४० अंशांपर्यंत गेलेले तापमान व नंतर ढगफुटी सदृश पाऊस, सप्टेंबरची संततधार यामुळे बोंडसड, बुरशीजन्य रोग यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली आहे. बोंडाची संख्या कमी असल्याने मजूर मजुरी वाढवून मागत आहेत. कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.  - गणेश नानोटे, कापूस उत्पादक शेतकरी, निंभारा (ता. बार्शी टाकळी, जि. अकोला) 

दुप्‍पट पैसे देऊनही मजूर मिळेना  बहुतांश भागात कापसाच्‍या वेचणीस सुरुवात झाली. परंतु कापूस वेचणीसाठी १० ते १२ रुपये किलो भाव देऊनही मजूर मिळत नसल्‍याचे वास्‍तव असून, अशी परिस्थिती अनेक गावांत निर्माण झाली आहे. काही शेतकरी तर गावात मजूर मिळत नसल्याने अन्य गावांतून मजूर आणून वेचणी करीत आहेत. बाहेरगावावरून मजूर आणताना त्यांच्या जाण्या-येण्यासाठी लागणाऱ्या वाहनाची व्यवस्था त्या शेतकऱ्याला करावी लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com