सरकार कांदा उत्पादकांचा विचार का करत नाही? शेतकऱ्यांचा सवाल

सरकार कांदा उत्पादकांचा विचार का करत नाही? शेतकऱ्यांचा सवाल
सरकार कांदा उत्पादकांचा विचार का करत नाही? शेतकऱ्यांचा सवाल

नाशिक : ऐन सणासुदीत कांद्याला दोन कष्टाचे पैसे कांदा उत्पादकांना मिळत होते. मात्र, सरकारने कांदा निर्यातबंदी व व्यापाऱ्यांवर साठेबाजीचे बंधन आणून सुरळीत चाललेले कामकाज अडचणीत आणले आहे. कांदा सर्वसामान्य माणसांना रास्त भावात मिळावा, अशी आमची पण मागणी आहे. मात्र, आमच्या मागण्यांचा व कष्टाचा कधीच विचार होत नाही, असा संतप्त सवाल कांदा उत्पादक शेतकरी करत आहे. त्यामुळे सर्व स्तरातून रोष व्यक्त होत असताना ऐन विधानसभेच्या तोंडावर कांद्यामुळे वातावरण तापण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

मागील वर्षी दुष्काळ त्यात पाणी वाचवून तर काही ठिकाणी पाणी विकत घेऊन कांदा पिकविला. त्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घटले. हा कांदा चाळीत साठविल्यानंतर अधिक उष्णता असल्याने चाळीत खराब झाला आहे. मागील वर्षी वर्षभर चाळीत कांदा सांभाळून तो शेवटी मातीमोल भावाने विकावा लागला. तेव्हा सरकारने त्याबाबत शेतकऱ्यांचा का विचार केला नाही. त्यामुळे जरी दोन पैसे भेटत असले तर ती आमचा खर्च व नुकसान सरकार विचारात का घेत नाही, असा सवाल कांदा उत्पादक करीत आहेत. समाजमाध्यमावर निर्णयासंबंधी मोठी टीकेची झोड उठली आहे. 

दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर तत्काळ बंदी घातली आहे. तर आता साठेबाजीला निर्बंध घातले आहेत. त्यामुळे बाजरात कांदा विक्री करताना यामुळे आलेल्या वाहनांचे लिलाव करताना मर्यादा येत आहेत. त्यामुळे माल आणून वेळ व अधिकचा पैसा खर्च होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व बाजार समितीचे दैनंदिन कामकाजात अडचणी येत आहेत.

मूठभर लोकांसाठी शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेतला जात आहे. सरकार कांद्याची निर्यातबंदी व व्यापाऱ्यावर स्टॉक लिमिट आणून सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याचा हक्क हिरावून घेतला. पडत्या काळातील मदतसुद्धा अजून पूर्ण दिली नाही आणि दोन पैसे मिळण्याचा हक्क हिरावून घेतला आहे. त्यामुळे शासनाचा या निर्णयाचा निषेध करतो. - रघुनाथ खैरनार, कांदा उत्पादक, सायगाव, ता. येवला

शेतकऱ्याच्या कष्टाला थोडा फार मोबदला मिळत असताना अचानक निर्यातबंदीचा निर्णय हा शेतकऱ्याला अडचणीत आणणारा आहे. सरकारने किमान निर्यात मूल्य वाढवावे हरकत नाही. मात्र, संपूर्ण निर्यातबंदी कांदा उत्पादकांच्या मुळावर आहे.  - विजय पगार, कांदा उत्पादक, कळवण

मागच्या वर्षी कांदे रस्त्यावर फेकले गेले. त्या वेळी कृषी मंत्रालयाचे पथक कुठे गेले होते. चालू वर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा सडला आहे. त्यामुळे खराब माल सोडून शेतकऱ्यांच्या हातात थोडे फार पैसे मिळत असताना सरकारने निर्णय घेऊन कांदा उत्पादक अडचणीत आणला आहे. - निवृत्ती न्याहारकर, कांदा उत्पादक शेतकरी, वाहेगाव साळ, ता. चांदवड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com