सोलापूर ः लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील कारखाने आणि घरगुती ग्राहकांना महावितरणने भरमसाठ बिले दिली आहेत. कोरोनाच्या महामारीतून अद्यापही सर्वसामान्य माणूस बाहेर आला नाही. त्यामुळे या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढीव बिले कमी करून आकारण्यात यावीत, अन्यथा भाजपच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार सुभाष देशमुख यांनी महावितरण आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला.
कारखानदार आणि घरगुती ग्राहकांना वाढीव बिले दिल्याबद्दल आमदार देशमुख यांनी महावितरणच्या कार्यालयात अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.
देशमुख म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. या कालावधीत कारखाने, उद्योग, व्यवसाय पूर्णपणे बंद होते. अद्यापही काही उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत. लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्य माणूसही घरातच बसून होता. अशा परिस्थितीत महावितरणने प्रतिमहा आकारण्यात येणाऱ्या बिलांच्या तुलनेत अधिक वीज बिले कारखाना आणि घरगुती ग्राहकांना दिली आहेत. याशिवाय विजेचे दरही एक एप्रिलपासून वाढवले आहेत.’’
लॉकडाऊनमुळे आधीच सर्वसामान्य माणूस आर्थिक अडचणीत सापडला आहे. तरीही त्यांना बिले भरण्याचा आग्रह केला जात आहे. तरी महावितरणने वाढीव बिले कमी करून आकारावी, अशी आमची मागणी आहे. महावितरणने बिले कमी केली नाहीत, तर भाजपच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, उत्तर तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम आदी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.