साखर आयुक्तांना घेराव घालू : राजू शेट्टी 

ज्या साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’ची मोडतोड केली आहे, त्यांच्यावर ‘आरआरसी’ची कारवाई करा.
karad agitation
karad agitation

कऱ्हाड, जि. सातारा ः ज्या साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’ची मोडतोड केली आहे, त्यांच्यावर ‘आरआरसी’ची कारवाई करा, अन्यथा पाच एप्रिलला साखर आयुक्तांना गनिमीकाव्याने बेमुदत घेराव घालत थकीत एफआरपी वसूल करू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. २५) येथे दिला. 

दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेट्टी यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी राज्य शासन शेतकऱ्यांची एफआरपी दिली पाहिजे या मुद्यावर ठाम असून, माझ्याशी झालेल्या चर्चेतून शेट्टींचे समाधान झाल्याचे सांगितले.     साखर कारखान्यांकडील थकीत एफआरपी आणि वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी गुरुवारी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत सह्याद्री कारखान्यावर आंदोलन होणार होते. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी महामार्गावरून शेट्टी यांना येथील शासकीय विश्रामगृहात आणले. तेथे सहकारमंत्री पाटील व शेट्टी यांच्यासह शिष्टमंडळाची चर्चा झाली. त्याची माहिती देताना श्री. शेट्टी म्हणाले, की सहकारमंत्री यांनी एक एप्रिलला साखर आयुक्तालयात जाऊन एफआरपीचा आढावा घेऊन संबंधितावर कारवाई करू, असे आश्‍वासन दिले आहे. सहकारमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार २३०० कोटी थकबाकी आहे. थकीत एफआरपीवर आरआरसी करायला तयार आहोत, असे त्यांनी सांगितले आहे. वीजबिल भरले नाही म्हणून दोन हजारांसाठी शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते, हे योग्य नाही, अशी खंत व्यक्त केली. 

कारखान्यांकडील एफआरपीचे २८०० कोटींचे येणे आहे, तरीही वीज कनेक्शन तोडले जाते या प्रश्‍नावर सहकारमंत्री निरुत्तर झाल्याचे सांगितले. मी कोणत्या कायद्याचा भंग केला? मग पोलिसांनी मला ताब्यात घ्यायचे कारणच काय? शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी आंदोलन करायचे नाही? शेतकरी किड्या-मुंगीसारखे मरू देत का, अशी विचारणा करून शेट्टी म्हणाले, की मुलांच्या परीक्षा सुरू असताना वीज कनेक्शन तोडली जातात. आमचे कारखान्याकडून येणे असूनही वीज कनेक्शन कट केले जात आहेत. शिक्षण सम्राट फी वसुली करत आहेत. १७ हजार कोटी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे येणे आहे. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचे साडेतीन हजार कोटी सरकारकडून येणे आहे, त्याला जबाबदार कोण? शेतकऱ्यांचे येणं असले की पठाणी वसुली करणे हे आता फार काळ चालणार नाही, सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. पाच एप्रिलला साखर आयुक्तांकडे जाऊन त्यांना सहकारमंत्र्यांनी सांगूनही आरआरसी का काढली नाही, याचा जाब विचारणार आहोत. 

एफआरपी देण्यावर ठाम  सहकारमंत्री पाटील म्हणाले, कीन मागील वर्षी ९५ टक्के कारखान्यांनी एफआरपी दिलेली आहे. यंदा ८३ टक्के कारखान्यांनी एफआरपी दिलेली आहे. साखरेचे ३१०० रुपये व्हॅल्युएशन आहे. सध्या साखरेला उठाव नाही. त्यामुळे काही कारखान्यांनी त्याचे हप्ते पाडले आहेत, तर काही कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही त्यांच्यावर आरआरसीची कारवाई केली जाते. त्यातून कारखान्याकडील शिल्लक साखर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विकून त्यातून शेतकऱ्यांचे देणे भागवले जाते. अशा कारवाया केल्या आहेत. कारवाया करताना तो कोणाचा कारखाना आहे हे बघितले जात नाही. शेतकऱ्यांची एफआरपी दिली पाहिजे या मुद्यावर ठाम आहे. 

कार्यर्त्यांनी ठोकली बोंब...  थकीत एफआरपी प्रश्‍नी कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात सहकारमंत्री पाटील व राजू शेट्टी यांची चर्चा सुरू होती. त्यादरम्यान शेतकऱ्यांनी बोंब ठोकत एफआरपीप्रश्‍नी आपला निषेध व्यक्त केला. काही काळ बोंब ठोकणे सुरूच होते. सहकारमंत्री पाटील व श्री. शेट्टी यांच्यात चर्चा झाल्यानंतरही काहीकाळ कार्यकर्त्यांनी बोंब ठोकली. त्यानंतर शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर  शेतकरी घरी परतले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com