कृषिपंप रिवाइंडिंग करणाऱ्या महिला शेतकरी मेकॅनिक 

जिल्ह्यातील आखाडा बाळापूर (ता.कळमनुरी) येथील अल्पभूधारक कुटुंबातील जयश्री अंभोरे यांनी कृषिपंप रिवाइडिंग व्यवसायातील पुरुषाची मक्तेदारी मोडीत काढली आहे.
Hingoli.
Hingoli.

हिंगोली ः जिल्ह्यातील आखाडा बाळापूर (ता.कळमनुरी) येथील अल्पभूधारक कुटुंबातील जयश्री अंभोरे यांनी कृषिपंप रिवाइडिंग व्यवसायातील पुरुषाची मक्तेदारी मोडीत काढली आहे. पती गोविंद यांना त्या अनेक वर्षांपासून मॅकेनिक म्हणून साथ देत आहेत. त्यासोबतच घरच्या शेतातील कामेदेखील करतात. त्यामुळे दोन्ही व्यवसायांतील कामाचा उरक वाढला तसेच खर्चात बचत होत आहे. 

गोविंद अंभोरे हे मूळ सुकळी (ता. वसमत) येथील रहिवासी आहेत. गावाकडे त्यांची साडेतीन एकर हलक्या प्रकारची जमीन होती. जिरायती जमिनीतून फारसे उत्पन्न मिळायचे नाही. त्यामुळे गोविंद यांनी 1994 मध्ये आखाडा बाळापूर येथे भाड्याच्या जागेत सायकल टॅक्सी तसेच स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान थाटले. सुरुवातीची काही वर्षे त्यांचा हा व्यवसाय चांगला चालला. परंतु अलीकडील काही वर्षांत सायकल वापर कमी झाल्यामुळे त्यांनी हा व्यवसाय बंद केला. २००० मध्ये संधी तसेच शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांनी कृषिपंप रिवाइंडिंग, कुलर, घरातील पंखे दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. परिसरातील ३५ ते ४० गावांतील शेतकरी कृषिपंप दुरुस्तीसाठी घेऊन येऊ लागले. स्थानिक नागरिकही घरगुती उपकरणे दुरुस्तीसाठी आणू लागली. त्यामुळे त्यांचा संपर्क वाढला तसेच व्यवसायातही चांगला जम बसला. सन २००३ मध्ये गोविंद यांचा विवाह मनुला (ता. हदगाव, जि. नांदेड) येथील जयश्री यांच्याशी झाला. सुरुवातीची काही वर्षे जयश्री या गृहिणीच होत्या. 

परंतु २०१० पासून त्यांनी गोविंद यांना मोटार रिवाइंडिंग व्यवसायातील बारीकसारिक कामे करून मदत करू लागल्या. काही दिवसांमध्येच जयश्री यांनी कृषिपंप रिवाइंडिंगच्या कामातील कौशल्य शिकून घेतले आहे. आता त्या स्वतः कृषिपंप दुरुस्ती, कुलर दुरुस्ती, घरातील पंखे दुरुस्तीची कामे करतात. त्यामुळे गोविंद यांना अन्य कामे करण्यासाठी सवड मिळू लागली आहे. व्यवसायाचा विस्तार झाल्यामुळे अंभोरे यांना कामासाठी तीन मेकॅनिकची गरज आहे. परंतु जयश्री या मेकॅनिकचे काम करू लागल्यामुळे आता त्यांनी अन्य दोन मेकॅनिक कामासाठी लावलेले आहेत. 

घर आणि शेतीही सांभाळतात  दरम्यानच्या काळात गावातील जमीन विकून अंभोरे यांनी चार किलोमीटरवरील कामठा शिवारात दोन एकर जमीन खरेदी केली आहे. खरिपात सोयाबीन, तर रब्बीमध्ये हरभरा ही पिके घेतात. पेरणी ते काढणी पर्यंतची सर्व कामे जयश्री करतात. सिंचन हंगाम सुरू झाल्यानंतर कृषिपंप बिघाडीचे प्रमाण वाढते. त्या वेळी जयश्री या घरची कामे आटोपून मॅकेनिकचे काम करतात. अंभोरे दांपत्याची मेकॅनिक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. दोघांची एकमेकांना साथ असल्यामुळे शेती तसेच व्यवसायातून त्यांना वर्षाकाठी खर्च जाता चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळते. शिलकीतून त्यांनी आखाडा बाळापूर येथे स्वतःची जागा खरेदी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com