अधिक नफ्यासाठी शेतकरी गटांनी कापूस गाठींची विक्री करावी ः कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

वरुड येथे आयोजित कापूस कार्यशाळेत बोलताना डॉ. अनिल बोंडे
वरुड येथे आयोजित कापूस कार्यशाळेत बोलताना डॉ. अनिल बोंडे

अमरावती : कापूस विक्रीऐवजी गाठी तयार करून विकल्यास शेतकरी गटांना अधिक नफा मिळेल. त्यामुळे कापसावर प्रक्रिया करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. गटशेतीला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना अमलात आणल्या आहेत. गटशेतीचे अनुदान ८० टक्क्यांपर्यंत वाढविणे व क्षेत्रमर्यादा ५० एकरांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.

वरुड येथे ‘कापूस व कॉटनगाठी बाजारातील किंमत शोध’ याविषयी शुक्रवारी (ता. २३) शेतकरी जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉ. बोंडे बोलत होते.  ‘ॲग्री एमसीएक्स’च्या व्यवस्थापक दक्षा जानी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, रामराव वानखडे, निळकंठराव आडे, मोरेश्र्वरराव वानखडे, इंद्रभूषण सांडे, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, गोपाळ मालपे, रामकृष्ण मेश्राम, राजकुमार राऊत, राजाभाऊ सुपले आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी डॉ. बोंडे म्हणाले की, इतर व्यवसायात ज्याप्रमाणे व्यावसायिक एकत्र येऊन गट बनवून उत्पादन व विपणन करतात, तशी प्रक्रिया शेतकऱ्यांनी केली पाहिजे. त्यामुळे गटशेतीसाठी क्षेत्रमर्यादा ५० एकरांवर आणण्याचे व अनुदान वाढविण्याचे प्रस्तावित आहे. गटाला तारेचे कुंपण, अवजारे, यंत्रसामग्री आदी सुविधाही देण्यात येत आहे. जिनिंग प्रक्रियेमुळे कापसाची किंमत वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पक्का माल बनविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणे आवश्यक आहे. 

भाव चांगला मिळण्यासाठी कापूस घरात साठवून ठेवला जातो. त्याच कालावधीत गाठी तयार करता येतील. या गाठी गोदामात ठेवून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला दर मिळवणे शक्य आहे. शेतकरी उत्पादक कंपनीची नाबार्डकडे नोंदणी करण्यासाठी एमसीएक्स मदत करेल. शेतकरी उत्पादक कंपनीला विक्रीवर सेस लागत नाही. जिल्ह्यात पॅकहाउस जास्तीत जास्त प्रमाणात असावेत. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले.

या वेळी विजय चवाळे म्हणाले की, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी उत्पादकता वाढ करणे,  उत्पादन खर्च कमी करणे व विपणन हे पर्याय आहेत. उत्पादित मालावर प्रक्रिया केल्यास चांगला मोबदला मिळेल. अशा मालाचे ऑनलाइन ट्रेडिंग करता येईल. 

दक्षा जानी म्हणाल्या की, कापसापासून गाठी बनविल्यास त्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध असते. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ''एमसीएक्स''च्या माध्यमातून नोंदणी केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल. बाजारपेठेत सर्वोच्च दर मिळताच विक्रीचा निर्णय शेतकरी गटाला घेता येतो व मूल्यवर्धनाचा लाभ मिळतो. या कार्यशाळेसाठी अमरावती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, महाविदर्भ शेतकरी गट, पाणी वापर संस्था यांचे सहकार्य मिळाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com