हरभरा पीक करणार यंदाही रब्बीचे नेतृत्व
पुणे ः राज्यात खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून सोयाबीन बनले असून रब्बीचे प्रमुख पीक होण्याचा मान आगामी हंगामात पुन्हा हरभऱ्यालाच मिळण्याची चिन्हे आहेत.
‘‘रब्बीमध्ये येत्या हंगामात हरभरा पेरा २४ लाख हेक्टरच्या आसपास राहण्याचा आमचा प्राथमिक अंदाज आहे. बियाणे बदलाचा दर विचारात घेता प्रतिहेक्टरी शेतकरी ३५ किलो हरभरा बियाणे वापरतील, असे गृहीत धरण्यात आले आहे. त्यामुळे राज्याला पाच लाख क्विंटलपेक्षा जास्त बियाणे पुरवावे लागेल. यात ‘महाबीज’ने १.९१ लाख क्विंटल बियाणे देण्याची तयारी दर्शविली आहे,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
महाबीजशिवाय राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून ४८ हजार क्विंटल हरभरा बियाणे मिळणार आहे. मात्र सरकारी संस्थांची तोकडी क्षमता बघता किमान ५० टक्के बियाणे पुरवठा खासगी कंपन्यांकडून होईल. या कंपन्या यंदा किमान २.७१ लाख क्विंटलपेक्षा जास्त हरभरा बियाणे बाजारपेठेत आणण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा एकूण ५.११ लाख क्विंटल हरभरा बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांकडून हरभऱ्याचा होणारा पेरा बघता दरवर्षी रब्बी हंगामात सरासरी साडेसतरा लाख हेक्टरवर हरभरा पेरला जातो. मात्र २०१९ च्या हंगामात पेरा २० लाख हेक्टरच्या पुढे गेला होता. विशेष म्हणजे गेल्या हंगामात हरभऱ्याची उच्चांकी लागवड झाली. कारण पेरा थेट २६ लाख हेक्टरपर्यंत पोहोचला होता.
‘‘गहू किंवा ज्वारी ही आता राज्याची मुख्य रब्बी पिके राहिलेली नाहीत. त्याची जागा पूर्णतः हरभऱ्याने घेतल्याचे चित्र गेल्या हंगामात दिसले. चालू हंगामातही हरभरा अग्रभागी राहील. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत दोन वर्षांपूर्वीच्या हंगामात २७ टक्क्यांनी हरभरा पीक वाढले. शास्त्रज्ञांचा सल्ला व शेतकऱ्यांचे परिश्रम यामुळे या पिकाचे क्षेत्रच नव्हे; तर उत्पादकता देखील वाढते आहे,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
राज्यात हरभऱ्याची प्रतिहेक्टरी उत्पादकता ८१४ किलो आहे. मात्र २०१९ च्या हंगामात उत्पादकता वाढून १०९६ किलो झाली. गेल्या हंगामातही त्यात वाढ होऊन उत्पादकता थेट ११०४ किलोपर्यंत गेली आहे. सरासरी उत्पादकतेपेक्षा सध्याची उत्पादकता ३६ टक्क्यांनी अधिक आहे. राज्यात लातूर (२.५७ लाख हेक्टर), उस्मानाबाद (२ लाख हेक्टर) आणि नांदेड (२.२९ लाख हेक्टर) हे तीन जिल्हे हरभरा लागवडीत झपाट्याने पुढे आलेले आहेत.
मराठवाड्यात रब्बीमध्ये हरभऱ्याचा आधार मराठवाड्याच्या रब्बी हंगामाला हरभरा शेतीने मोठा आधार दिला आहे. कारण औरंगाबाद, बीड, जालना या तीन जिल्ह्यांत ३.३८ लाख हेक्टरवर तर लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या हंगामात ९.५४ लाख हेक्टरवर हरभरा पिकवला गेला आहे. यंदादेखील मराठवाड्यातील बहुतांश गावे ‘रब्बी’साठी हरभरा पिकावरच अवलंबून राहण्याचे संकेत मिळत आहेत.
पेरणीच्या क्षेत्रात दरवर्षी वाढ
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.