रानातल्या कामातच जाईल यंदाचा दिवाळसण!

चाळीस वर्षे झाली शेतीत राबतोय. जिवाला आराम नाहीच. एखादं दुसरं साल गेलं की संकट आलंच म्हणा. यंदाच साल ओल्या दुष्काळाचं संकट घेऊन आलंय. शेतीत खर्च होऊन बसला अन् त्यानंतर लागून बसलेल्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान केल्याने झालेला खर्च वसूल होणं कठीण हाय.
This year's bankruptcy will go to work in the forest!
This year's bankruptcy will go to work in the forest!

जालना : चाळीस वर्षे झाली शेतीत राबतोय. जिवाला आराम नाहीच. एखादं दुसरं साल गेलं की संकट आलंच म्हणा. यंदाच साल ओल्या दुष्काळाचं संकट घेऊन आलंय. शेतीत खर्च होऊन बसला अन् त्यानंतर लागून बसलेल्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान केल्याने झालेला खर्च वसूल होणं कठीण हाय. अजूनही काही जमिनीत वाफसा नाही खरीप हातचा गेल्यानं रब्बीची तयारी करण्यासाठी शेतात राबावच लागणार. त्यामुळे दिवाळसण रानातल्या कामातच जाईल असं वाटतंय.

वयाची साठी ओलांडलेले जालना जिल्ह्यातील शेवगळचे प्रकाश व्यंकटराव लोंढे कुटुंबाचा प्रमुख म्हणून शेतकऱ्याच्या दिवाळी तयारीविषयी सांगत होते. कुटुंबात पत्नी, दोन मुलं, सुना, चार नातवंडं अशी जवळपास दहा माणसं असलेल्या प्रकाश लोंढे यांच्याकडे १८ एकर शेती. सोयाबीन, कापूस, रेशीम ही त्यांची प्रमुख पीक. दिवाळी तोंडावर येऊन ठेपली, कुटुंबाचा प्रमुख म्हणून दिवाळीची तयारी कशी चालली असं विचारताच प्रकाशराव मनमोकळं बोलू लागले... १९७८ ला शेतीत आलो. तवापासून आजतागायत सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत शेतातच असतो.

यंदा साडेपाच एकरावर मूग पीक घेतले. त्या मूगाचा पावसाने खेळखंडोबा केला. बी सुद्धा वसूल झालं नाय. चार एकरांवर सोयाबीन पेरलं. सुरुवातीपासून पीक जोमदार दिसू लागलं. पण काढणीला आलं अन् पाऊस लागून बसला. त्यामुळे उत्पादन जरी सात ते आठ क्विंटल प्रति एकर न हाती आला, तरी त्याचा दर्जा मात्र अतिपावसाने ढासळला. चार एकरांत कपाशीच पीक होतं. त्यातून एकरी पाच क्विंटल हाती आलं. आता बोंड असलेल्या कपाशीवर बोंड अळीचा आघात झालाय. शिवाय १० ते १२ रुपये प्रति किलो असणारी वेचणी आणखी वधारल्याने किडका कापूस वेचण्यापेक्षा कपाशी उपटून टाकण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे नुकसान झालं. अलीकडच्या तीन वर्षांपासून साडेतीन एकरात रेशीम साठी लागणारी तुती लागवड केली. पण दुष्काळी व कायम अवर्षणाचा सामना करणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या रेशीम उद्योगाची ही पीछेहाटच सुरू आहे.

आता दिवाळी म्हणलं की लेकीबाळी यायच्या-जायच्या. त्यासाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी पिकलेला माल मिळेल त्या भावात विकल्याशिवाय पर्याय नाय. अजून अनेक शेतात वापसा नाय. त्यामुळे दिवाळीचा दिवस तेवढा सोडा. यंदा झालेला खर्च वसूल होणे नाय. म्हणून आम्ही शेतकरीच एकमेकाला शेतीकामात मदत करून लागणारा खर्च वाचवण्याचा प्रयत्न करतोय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com