तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने : पाटील

तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने : पाटील
तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने : पाटील

सांगली  : केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेबरोबरच जिल्हा बँक नफ्यातून २ टक्के व्याज परतावा देणार आहे. त्यामुळे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज परतफेड करून शून्य टक्के व्याजाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी केले आहे.  शेतकऱ्यांना ६ टक्के व्याज दराने विकास सोसायटीकडून अल्पमुदत पीक कर्जपुरवठा करण्यात येतो. जे शेतकरी अल्पमुदत पीककर्ज घेऊन त्याची निर्धारीतवेळेत परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून ३ लाखांपर्यंत ३ टक्के व राज्य शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत १ लाखापर्यंत ३ टक्के व १ लाखावर ते ३ लाखांपर्यंत १ टक्के व्याज परतावा मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना १ लाखापर्यंतचा पीक कर्जपुवठा शून्य टक्के व्याजदराने व १ लाखाचेवर ते ३ लाखांपर्यंत कर्जपुरवठा २ टक्के व्याजाने उपलब्ध होतो.  एक लाखावर ते तीन लाखांपर्यंत कर्ज पुरवठ्यावर शेतकऱ्यांना २ टक्के व्याज भरावे लागते. पीक कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी २ टक्के व्याजाचा परतावा जिल्हा बँकेच्या नफ्यातून देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचा पीक कर्जपुरवठा शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे. त्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड ३१ मार्च २०१९ पर्यंत करणे आवश्यक आहे, असे पाटील यांनी सांगितले.   जे शेतकरी पीककर्जाची निर्धारित वेळेत परतफेड करणार नाहीत, त्यांना पीककर्जावर थकतारखेपासून १०.५० टक्के अधिक २ टक्के दंडव्याज असे एकूण १२.५० टक्के प्रमाणे व्याज भरावे लागणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊन ते शून्य टक्केच्या व्याजाच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करता शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी परतफेड करून शून्य टक्के व्याजाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.  जिल्हा बँक कर्मचारी भरतीच्या हालचालींना गती जिल्हा बँकेत कर्मचाऱ्यांची सुमारे ४५२ पदे रिक्त आहेत. या पदभरतीच्या हालचालींना गती आली आहे. बँकेत शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक झाली. अध्यक्षस्थानी दिलीपराव पाटील होते. संचालक व अधिकारी उपस्थित होते. बँकेची कर्मचारी भरती ऑनलाईन होणार आहे. या भरतीप्रक्रियेसाठी पुणे व नागपूर येथील संस्थांनी प्रस्ताव दिला आहे. आठवड्यात पुन्हा संचालक मंडळाची बैठक होऊन भरतीप्रक्रियेसाठी संस्था निश्‍चिती होणार आहे. मिस्ड कॉल अलर्ट सेवा सुरू जिल्हा बँकेच्या मिस्ड कॉल अलर्ट सेवेचा प्रारंभ शुक्रवारी संचालक मंडळ सभेत अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्या हस्ते झाले. एसएमएस अलर्ट सुविधा घेतलेल्या बँकेच्या ग्राहकांनी त्यांचे बँक खात्याशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरून ९५१२१९५१२१ या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास त्यांना त्यांचे खात्यावरील बॅलन्स एसएमएस द्वारे प्राप्त होईल. ही सुविधा ग्राहकांसाठी मोफत उपलब्ध केली आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com