खरीप पिकांसाठी आठ हजार तर, फळबागांसाठी १८ हजारांची मदत

राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ८००० रुपयांची मदत जाहीर केली. हिशोब करता गुंठ्याला केवळ ८० रुपये मदत मिळणार आहे. फळबागांना गुंठ्याला केवळ १८० रुपये मदत जाहीर केली. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे. आज कांद्याच्या रोपाच्या एका वाफ्याचा दर ५००० रुपये झाला आहे. फळबागांचा उत्पादन खर्च तर प्रचंड आहे. त्यामुळे गुंठ्याला लागणारा साधा बियाणांचा खर्चसुद्धा भागणार नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करायला आलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांना ही मदत मान्य आहे का? शेतकऱ्यांच्या संयमाची अधिक परीक्षा पाहू नका. शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका. जाहीर केलेल्या या तुटपुंज्या भरपाईचा तातडीने पुनर्विचार करा व एकरला किमान २५ हजार रुपयांची सरसकट प्राथमिक मदत जाहीर करा. - डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र
पीक नुकसान
पीक नुकसान

मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (ता. १६) मदत जाहीर केली. खरिपातील शेती-पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयांची, तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यपालांनी तातडीने ही मदत वाटप करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. याशिवाय संकटातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या शाळा- महाविद्यालयीन परीक्षांचे शुल्क आणि शेतसारा माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.  महाराष्ट्रामध्ये एकीकडे सत्ता स्थापनेसाठी राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्यातील अनेक भागांमध्ये अतिपाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना दहा हजार कोटींची मदत करण्याची घोषणा केली होती. परंतु त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने शेतकऱ्यांना मिळणारी मदत रखडली होती.  दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच कोणत्याही अटी आणि निकष न लावता शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट २५ हजार रुपयांची ताबडतोब मदत द्या, अशी मागणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.  मात्र, हेक्टरी ८ हजार म्हणजे एकरी ३ हजार ते ३,२०० रुपये इतकीच मदत मिळणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने विरोधकांनी त्यावर टीका सुरू केली आहे. ‘‘अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. मात्र प्रशासनाने ही मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल,’’ असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.  पावसाने केलेले प्रचंड नुकसान पाहता शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. मात्र राज्यपालांनी जाहीर केलेली मदत पुरेशी नाही. तरीही राज्यात सरकार अस्तित्वात नसताना जाहीर झालेल्या या मदतीचे प्रशासनाने तातडीने वितरण करावे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी करून अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा सहभाग असलेले सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या या मदतीत अधिक वाढ केली जाईल, असेही ते म्हणाले. प्रतिक्रिया ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. जो नियम महापूरग्रस्तांसाठी लावण्यात आला आहे, तोच अवकाळी पावसासाठी लावणे गरजेचे आहे. राज्यपाल कधीही राजभवनाबाहेर पडले नाहीत. शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. त्यांना शेतकऱ्यांचे दुःख माहिती नाही. खरंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एकदा बघावे, शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदना समजून घ्याव्यात.  - राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com