पंचनाम्यासाठी २० लाख विमाधारकांचे अर्जः कृषी आयुक्त

कृषी आयुक्त दिवसे
कृषी आयुक्त दिवसे

पुणे: राज्यात अतिपावसानंतर आत्तापर्यंत २० लाख विमाधारक शेतकऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली.   “पावसामुळे ५४ लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र, पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच निश्चित आकडा हाती येईल. सात नोव्हेंबरची अंतिम मुदत देत आम्ही सर्व यंत्रणा पंचनाम्यासाठी कामाला लावली असली तरी सतत पाऊस आणि बांधापर्यंत पोचण्यात अडचणी आहेत. त्यामुळे काम लांबले जाऊ शकते. तरीही कृषी विभागाने इतर कामे बाजूला सारून आमचे सर्व कृषी सहायक, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी व राज्यातील सर्व यंत्रणा या कामाला जुंपली आहे,” असे आयुक्त म्हणाले.    वीमा नियमावलीनुसार वैयक्तिक नुकसान झाल्यास इंटिमेशन (सूचित) देण्याची जबाबदारी शेतकऱ्यांकडे असते. आयुक्त म्हणाले की, “आतापर्यंत २० लाख अर्ज आलेले आहेत. अर्ज आल्यानंतर आम्हाला प्रत्यक्ष शेतात जावून अक्षांश-रेखांशच्या नोंदीसहीत छायाचित्र घेत पंचनामा करावा लागतो. भरपाईसाठी राबविली जाणारी प्रकिया त्याशिवाय पूर्ण होत नाही. इतक्या मोठ्या संख्येने प्रथमच अर्ज आलेले आहेत. ही जबाबदारी ताणतणावाची व चिंता वाढविणारी असली तरी आमची सर्व यंत्रणा दिवसरात्र काम करते आहे.” राज्यात आतापर्यंत काही भागात ३० ते ७० टक्के पंचनाम्याचे काम झालेले आहे. मुळात अतिपावसामुळे शेतात जाण्यास रस्ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे पंचनाम्याची कामे जलदपणे करण्यात सर्वच यंत्रणेला अडचणी येत आहेत. सर्वात जास्त नुकसान औरंगाबाद व लातूर भागात झाले आहे, असे निरीक्षण आयुक्तांनी नोंदविले.  विमा प्रतिनिधी नसला  तरीही पंचनामे ग्राह्य पिकाचे पंचनामे करताना वीमा कंपनीचा प्रतिनिधी अत्यावश्यक असतो. तथापि, लाखो ठिकाणी पोचणे शक्य नसल्याने विमा प्रतिनिधी नसला तरी कृषी विभागाच्या यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरले जाणार आहेत. कंपन्यांना देखील आम्ही तसे कळवून टाकले आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. धोरणात्मक निर्णय तातडीने शक्य पाऊस स्थिती, खरिपाचे नुकसान, रब्बीची तयारी याबाबत सरकारी पातळीवरून देखील सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांकडून गेल्या पाच दिवसांत पाच वेळा आढावा घेण्यात आला आहे. मी स्वतः जुन्नर, नाशिक, खेड, आंबेगाव, नगर, संगमनेर, लातूर, बीड भागाचा दौरा केला आहे. कृषी सचिवांनी धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव, जालना, नांदेड भागाचा दौरा केलेला आहे. मुख्यमंत्री देखील बांधावर जावून आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत धोरणात्मक निर्णय तातडीने होतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com