कृषी विद्यापीठ आणि विभागाने समन्वयाने काम करावे ः डॉ. अनिल बोंडे

कृषी विद्यापीठ आणि विभागाने समन्वयाने काम करावे ः डॉ. अनिल बोंडे
कृषी विद्यापीठ आणि विभागाने समन्वयाने काम करावे ः डॉ. अनिल बोंडे

अकोला : कृषीचे ज्ञान हे विद्यापीठात बंदीस्त होऊ नये. विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा. शेतकरी वारंवार विद्यापीठात यायला हवा. कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागात आज समन्वय दिसत नाही. येत्या काळात ही सांगड घातली जावी, अशी अपेक्षा कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी येथे व्यक्त केली.  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शनिवारी (ता. ६) आयोजित खरीप हंगाम समन्वयन आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, आमदार रणधीर सावरकर, कार्यकारी परिषद सदस्य विनायक सरनाईक, गणेश कंडारकर, स्नेहा हरडे, जैनुद्दीन जव्हेरी, डॉ. विलास खर्चे, डॉ. प्रकाश कडू, डॉ. डी. एम. मानकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, यांच्यासह विद्यापीठाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने शास्त्रज्ञ, कृषी सहायक, कृषी मित्र व विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी डॉ. बोंडे पुढे म्हणाले, विद्यापीठात जे संशोधनाचे काम चालते त्याला व्यावसायिक जोड मिळाली पाहिजे. तुमचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत सहजपणे कसे पोचेल हे लक्षात घेतले पाहिजे. आपण संशोधन करताना त्याचे पेटंट वाढवायला हवेत. व्यावसायिक उत्पादन वाढले पाहिजे. त्यासाठी त्याचा उत्पादन खर्चही कमी करावा लागेल. यासाठी शेतीला यांत्रिकिकरणाची जोड महत्त्वाची आहे. शेतीला पाणी, वीज, शेतापर्यंत जायला रस्ता मिळाला की शेतकऱ्याच्या अनेक समस्या सुटू शकतात. या दृष्टीने शासन काम करीत आहे. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची खरी जबाबदारी ही कृषी सहायकाच्या खांद्यावर आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीत त्याला बसायला जागा देत आहोत. तालुक्याला कृषी भवन तर मौज्याच्या गावात त्याच्यासाठी कार्यालयाची व्यवस्था करणार आहोत. यापुढील काळात कॉन्व्हेंटपासूनच कृषी शिक्षण का असू नये याबाबत विचार केला जात असल्याचेही डॉ. बोंडे म्हणाले.   केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे म्हणाले, कृषी खात्यात, विद्यापीठात काम करणाऱ्यांनी बदल्यांबाबत असलेली मानसिकता बदलावी. प्रत्येकाने आपापले काम इमानदारीने केले पाहिजे. तंत्रज्ञानाची जोड शेतीला मिळाली तर बदल नक्की घडतील. यंत्रणांनी समन्वयाने काम केले तर कुठलीही गोष्ट साध्य होते, हे गेल्या हंगामात गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण मिळवून आपण दाखवून दिले.  डॉ. भाले यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला. तत्पूर्वी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष लोगोचे संजय धोत्रे यांच्या हस्ते उद॒घाटन करण्यात आले.

महिनाभरात विद्यापीठांचे प्रश्‍न सोडविणार विद्यापीठांमध्ये मजुरांचे प्रश्न आहेत, रिक्त पदांसह इतरही अनेक विषय आहेत. याचा आढावा घेण्यासाठी शासनाचा एक अधिकारी उद्यापासून प्रत्येक विद्यापीठात जाऊन माहिती गोळा करणार आहे. ही माहिती एकत्र केल्यानंतर एका महिन्यात विद्यापीठांचे सर्व प्रश्न सोडविले जातील, अशी घोषणा कृषिमंत्री बोंडे यांनी केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com