सरकारचे अपयश लोकांसमोर प्रभावीपणे मांडणार ः अशोक चव्हाण

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

नगर   ः सरकार कामे करण्यापेक्षा घोषणा देण्यावर भर देत आहे, आणि त्यातून राज्य कर्जबाजारी करून ठेवले आहे. त्याचाच परिणाम म्हणून दुष्काळी भागात उपाययोजना करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्याचे परिणाम भाजप-सेनेच्या लोकांना भोगावे लागतील. देश आणि राज्यातील सरकारचे अपयश लोकांसमोर प्रभावीपणे मांडणार आहोत. आजपासून (सोमवार, ता. २१) पाच दिवस जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत असून, सिंधुदुर्गातून यात्रेची सुरवात होत आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

श्री. चव्हाण यांनी रविवारी (ता.२०) नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. प्रारंभी नगर प्रेस क्‍लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी श्री. चव्हाण यांचे स्वागत केले. माजी खासदार उल्हास पाटील, माजी आमदार हनुमंत पाटील, आमदार भाऊसाहेब कांबळे, विनायक देशमुख उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, की सरकारने निवडणुकीच्या काळात कर्जमाफी, शेतमालाला आधारभूत किंमत, बेरोजगारांना नोकऱ्या यांसह अनेक फक्त घोषणा केल्या, प्रत्यक्षात अंमलबजावणी काहीच केली नाही. शेतकरी आत्महत्या थांबवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फक्त वापर केला, स्मारकांची कामे पूर्ण करण्याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहेत. या साऱ्या बाबी आणि सरकारचे अपयश लोकांत प्रभावीपणे मांडणार आहोत. त्यासाठी सोमवारपासून पाच दिवसांची संघर्ष यात्रा काढण्यात येत असून, ठाण्यात समारोप होईल.

याशिवाय जनसंघर्ष यात्रेच्या काळात जाऊ शकलो नाही, अशा भागात सुमारे ५० सभा घेतल्या जाणार आहेत. मार्चआधी राज्यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या चार ते पाच सभा घेण्यात येणार आहेत. राज्य दुष्काळाने होरपळत असताना सरकारकडून काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. या साऱ्या बाबी सरकारला धक्का देणाऱ्या आहेत. आताच पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांत भाजपला लोकांनी नाकारले. तशीच स्थिती महाराष्ट्रातही होऊन परिवर्तन होईल. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल व लोकायुक्तांच्या निुयक्तीसाठी पुकारलेल्या आंदोलनाला आम्ही कायम पाठिंबा दिलेला असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.   ‘मतपत्रिकांवर निवडणुका घ्या’ अशोक चव्हाण म्हणाले, की देशात भाजप व शिवसेनेचे लोक सोडले तर सगळ्याच पक्ष, नेत्यांना इव्हीएम मशिनबाबत शंका आहे. त्यामुळे मतपत्रिकेवर निवडणुका घ्या, पण भाजपचे लोक घेत नाहीत. पारदर्शकता आणायची असेल, तर मतपत्रिकांवर निवडणुका घ्यायला पाहिजे. ‘एमआयएम’ बाजूला गेल्याने राज्यात ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित आघाडीसोबत चर्चा करणार आहोत. नगर दक्षिण लोकसभेच्या जागेबाबत आम्ही आग्रही आहोत. जेथे ज्यांची जिंकण्याची ताकद आहे तेथील जागा त्यांना देण्याचे ठरले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com