खानदेशात वाढत्या उष्म्याचा पिकांना फटका

सध्या तापमान वाढतच आहे. कांदा पिकाला पाणी दोन-तीन दिवसाआड द्यावे लागत आहे. कमी पाण्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. - नरेंद्र पाटील, कापडणे, जि. धुळे
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः खानदेशात दिवसागणिक उष्णता वाढत असून, कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. केळीसह कांदा, मका आदी पिकांना याचा फटका बसत आहे. हलक्‍या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत पाट पद्धतीने सिंचन करताना नाकीनऊ येत असल्याची स्थिती आहे. 

कांदेबाग लागवड होऊन पाच ते साडेपाच महिने झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी या बागांभोवती पूर्व, पश्‍चिम व उत्तर दिशेला नैसर्गिक वारा अवरोधक किंवा उष्णता रोखण्यासाठीचे कृत्रिम उपाय केले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या केळी बागांना उष्णतेचा फारसा फटका बसत नसल्याची स्थिती आहे. उष्णतेमुळे सिंचन अधिक करावे लागत आहे. मुबलक पाणी व ठिबक सिंचन व्यवस्था ज्या शेतांमध्ये आहेत, तेथे बागांचे सिंचन करताना फारशा अडचणी येत नसल्याची स्थिती आहे. परंतु जेथे मुबलक पाणी नाही, त्या केळी बागांमध्ये पीक पिवळे पडत आहे. वाढ खुंटू लागली आहे. निसवलेल्या बागांमध्ये घड काळे पडू लागले आहेत. घड काळे पडत असल्याने त्यांच्या दर्जावर परिणाम झाला आहे. घड पक्‍व होण्याची प्रक्रियाही मंद होत असून, नुकसान होत आहे. 

यावलमधील सातपुड्यालगतची हंबर्डी, न्हावी, चोपड्यातील धानोरा, अडावद, पंचक, मोहरद भागात केळीचे उष्णतेमुळे नुकसान होत आहे. या भागात जलपातळी खालावली आहे. कांदा पिकात ज्यांनी ठिबकची व्यवस्था केलेली नाही, त्या शेतकऱ्यांना पाट पद्धतीने पाणी देताना कसरत करावी लागत आहे. यातच हलक्‍या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत दोन-चार दिवसाआड सिंचन करावे लागते. 

सध्या गिरणा, पांझरा व वाघूर नदीकाठी पाणीटंचाई वाढल्याने सिंचनासंबंधी नाकीनऊ येत आहेत. कमी पाण्यामुळे हलक्‍या जमिनीतील पिकाच्या उत्पादनात ३० ते ३५ टक्के घट होऊ शकते, असा अंदाज आहे. कारण कांद्याची वाढ कमी असून, पातही पिवळी पडू लागली आहे. पाण्याचा ताण नुकसानकारक ठरत आहे. सकाळी ११ ते दुपारी साडेचारपर्यंत उष्णता कायम असते. 

मका पिकासही सिंचनासाठी अधिक पाणी लागत असून, जळगाव तालुक्‍यातील खेडी खुर्द, जामनेरातील नेरी, पहूर, शेंदूर्णी, पाचोरामधील गाळण, नगरदेवळा भागात कमी पाण्याचा फटका पिकाला बसू लागला आहे. धुळ्यातील शिंदखेडा, सातपुडा पर्वतालगतच्या शिरपुरातील गावांमध्येही मका व कांदा पिकाला पाणीटंचाईचा फटका बसत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com