दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
अॅग्रो विशेष
पावसाचा सीताफळाला मोठा दणका; २५० कोटींचा थेट फटका
माझी एक हजार झाडे असून, झाडावरच सीताफळ परिपक्व होण्याचे प्रमाण वाढले आहे. जो हंगाम ४० दिवस सुरू राहणार होता तो फक्त २० दिवसच सुरू राहणार आहे, तर माल लवकर आणि जास्त निघत असल्याने बाजारभावदेखील कमी झाले आहेत. या हंगामात ७५ ते १०० रुपये दर मिळणे अपेक्षित होते तो दर आता २५-३० रुपये मिळत आहे.
- रमेश निकास, सावत्रा, ता. मेहेकर. जि. बुलढाणा
पुणे : ऑक्टोबर महिन्यातील मॉन्सूनोत्तर पावसामुळे सीताफळाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील सुमारे ३ लाख एकरांवरील सीताफळ बागांना फटका बसला आहे. ५० टक्क्यांपर्यंत नुकसानीचा अंदाज असून, सुमारे २५० कोटींच्या घरात शेतकऱ्यांना फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात पुण्यासह, औरंगाबाद, बुलडाणा, सोलापूर, सातारा, भंडारा, नगर आदी विविध जिल्ह्यांमध्ये सीताफळाचे उत्पादन घेतले जात आहे. या भागात सुमारे तीन लाख एकरांवर लागवड आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात आणि प्रामुख्याने पुरंदर तालुका सीताफळ उत्पादनात अग्रेसर आहे.
जिल्ह्यातील सुमारे २५ हजार एकर क्षेत्र बाधित झाले असून, काढणीला आलेली सुमारे ७० टक्के सीताफळाचे नुकसान झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पुरंदर तालुक्यात सीताफळाचे सुमारे १० हजार एकरवर लागवड आहे. तर इतर तालुक्यांमध्ये सुमारे १५ हजार एकर क्षेत्रावर असे सुमारे २५ हजार एकर क्षेत्रावर लागवड आहे. मॉन्सूनचा वाढलेला मुक्काम, मॉन्सूनोत्तर पावसामुळे सीताफळाच्या बागेत पाणी साठणे, जमिनीतील आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे फळे १५ ते २० दिवस अगोदरच अकाली उकलण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सुमारे ७० टक्क्यांपर्यंत नुकसानीचा अंदाज सीताफळ तज्ज्ञ डॉ. विकास खैरे यांनी व्यक्त केला आहे.
खैरे म्हणाले, ‘‘मी नुकताच धालेवाडी, जेजुरी परिसरातील सीताफळ बागांची पाहणी केली. या दरम्यान फळांची अकाली झालेली उकल, काळ्या बुरशीमुळे फळे काळी पडण्याचे प्रमाण वाढलेले दिसले. यामुळे बाजारभाव देखील पडले आहेत. जून ते सप्टेंबरदरम्यान सीताफळाला २० किलोच्या क्रेटला २ ते अडीच हजार रुपये दर होता. हाच दर आता ७०० ते ८०० रुपयांपर्यंत आहे. या दराचा विचार केला, तर शेतकऱ्यांचे सुमारे ७० ते ८० कोटींचे नुकसान झाल्याची भीती आहे.’’
वडकीचे शेतकरी संभाजी गायकवाड म्हणाले, ‘‘माझी २ एकर सीताफळ बाग असून, बागेत पाणी साठल्याने झाडांना धोका निर्माण झाला आहे. सध्या फळ काळी पडायला लागली असून, ते प्रमाण वाढण्याचा धोका आहे. सध्या किलोला १० ते ४० रुपये दर मिळत आहेत.
रघुनाथ चौधरी (रा. खरपुडी, ता. खेड) म्हणाले, ‘‘माझी शेताच्या बांधावर पारंपरिक सुमारे १ हजार झाडे असून, मध्ये पाऊस उघडल्यानंतर वाढलेल्या तापमानामुळे सीताफळ पिकायला लागली होती. त्यातच दोन दिवसांत झालेल्या पावसाने फळे फुटली असून, हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे दरवर्षी मिळणारे दीड-दोन लाखांचे उत्पन्न अजून ३० हजार पण झालेले नाही.
देशात सीताफळ उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर
अपेडाच्या २०१५-१६ च्या आकडेवारीनुसार देशातील एकूण २ लाख ९७ हजार ९४ टनांच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा ३०.९८ टक्के म्हणजेच ९२ हजार ३२० टन एवढा आहे. त्या खालोखाल गुजरात (२०.५३ टक्के), मध्य प्रदेश (१०.०४ टक्के), छत्तीसगड (१३.२८) तेलंगणा (५.३४ टक्के) वाटा आहे.
असे झाले नुकसान
- सध्या सीताफळ काढणीचा हंगाम सुरू
- जमीन, वातावरणातील आर्द्रता वाढल्याने फळ उकलले
- उकललेल्या फळात पाणी गेल्याने सडण्यास प्रारंभ
- काळ्या बुरशीच्या प्रादुर्भावाने फळे काळी पडली
- प्रत घसरल्याने बाजारभावदेखील पडले
- नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत
प्रमुख उत्पादन/लागवड :
- पुणे, औरंगाबाद, बुलडाणा, सोलापूर, सातारा, भंडारा, नगर आदी
- एकूण सुमारे तीन लाख एकरवर लागवड
प्रतिक्रिया
माझी २०० झाडे असून, पावसाने फळे काळी पडली आहेत. बाजारात क्रेटला २ हजार रुपये दर मिळायचा आता फळे झाडावरच फुटल्याने दर क्रेटला ५००-६०० देखील मिळत नाही.
- शेतकरी विक्रम पवार, रा. सिंगापूर, ता. पुरंदर
माझी १७ एकरांवर मिश्र फळबाग असून, यामध्ये सीताफळाची सुमारे साडेतीन हजार झाडे आहेत. नुकत्याच झालेल्या अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली सीताफळे फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. तर पावसामुळे काढणीसाठी बागेत जाणे शक्य न झाल्याने फळे जमिनीवर पडत आहेत. तसेच आता अचानक होणाऱ्या तापमान वाढीमुळे फळ पिकण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे फळांची दूरवर वाहतूक करणे अवघड झाले आहे. बाजारातील आवकदेखील वाढल्याने दर घसरले आहेत. अशा परिस्थितीत सुमारे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे.
- संजय मोरे पाटील, नळविहीर, ता. जाफराबाद, जि. जालना
अवकाळी पावसाने सीताफळ झाडावरच पिकण्याचे प्रमाण वाढले. तर काढणी न होऊ शकल्याने फळे जमिनीवर पडू लागली. तसेच बाजारपेठेत एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने दरदेखील ५० टक्क्यांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. हे नुकसान राज्यात सुमारे २०० ते २५० कोटींपर्यंत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- श्याम गट्टाणी, महाराष्ट्र राज्य सीताफळ उत्पादक संघ
- 1 of 657
- ››