यवतमाळ जिल्ह्यात तुरीवर मररोगाचा प्रादुर्भाव

खासगी कंपनीचे बियाणे वापरल्याने त्याला बीजप्रक्रियेची गरज वाटली नाही. त्याचे परिणाम आज मर रोगाच्या माध्यमातून समोर आले आहेत. तीन एकरांवरील बहुतांश झाडे वाळत आहेत. शेंगा भरण्याच्या अवस्थेत हे होत असल्याने नुकसान सोसावे लागणार आहे. - लक्ष्मण खंडाळे, शेतकरी, वालतूर रेल्वे, ता. पुसद, यवतमाळ.
तूरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव
तूरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

यवतमाळ   ः सोयाबीन, कपाशीनंतर आता मर रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तुरीचे पीक धोक्‍यात आल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. एकूण पेऱ्याच्या जवळपास २० टक्‍के क्षेत्रावर मररोगाचा प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज असल्याने त्याचा थेट उत्पादनावर परिणाम होणार आहे.

जिल्ह्यात यावर्षी एक लाख २१ हजार ९२९ हेक्‍टरवर तुरीची पेरणी झाली आहे. सुरवातीला पर्जन्यमान समाधानकारक असल्याने शेतकरी समाधानी होते. परंतु, गरजेच्यावेळी पावसाने खंड दिल्याने पिकाला फटका बसला. वाढते तापमान, त्यासोबतच झालेला रोगाचा प्रादुर्भाव यामुळे हाती येणारे पीक संकटात सापडले आहे. जिल्ह्यात पेरा झालेल्या क्षेत्रापैकी २० क्षेत्रावर मर रोगाचा तसेच हवामान बदलाचा परिणाम दिसून येत आहे.

मररोग, उधळणी तसेच थंडी असताना दिल्या जाणाऱ्या पाण्याचा परिणाम तुरीवर दिसत आहे. मररोग आणि उधळणीमुळे खालून वर अशापद्धतीने तूर वाळत आहे. एकूण पेऱ्याच्या २० टक्‍के क्षेत्र यामुळे बाधीत झाल्याचा अंदाज आहे. परिणामी यंदाही पीक उत्पादनात घट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया न केल्यास तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. जमिनीत याची बुरशी असते. मुळाच्या माध्यमातून याचा प्रसार होतो. झाडाची अन्नशोषण क्रिया थांबून झाड वाळते. मर रोग नियंत्रणासाठी उपाययोजना काहीच नसल्याने हंगामाच्या सुरवातीला बीजप्रक्रिया करणे आणि पीक फेरपालट यामाध्यमातून या रोगावर नियंत्रण मिळवता येते, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे  वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ  डॉ. ए. एन. पाटील यांनी सांगितले.

पुसद तालुक्‍यातही प्रादुर्भाव श्रीरामपूर, जि. यवतमाळ ः पुसद तालुक्‍यासह जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीचे पीक अचानक वाळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. मररोग व वाढत्या थंडीच्या परिणामी हे होत असल्याची माहिती दिली जात आहे.

पुसद तालुक्‍यात सर्वदूर तुरीवर मररोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासोबतच वातावरणात गारवा वाढीस लागल्याने त्याचाही तुरीवर विपरीत परिणाम झाल्याचे सांगितले जाते. या दोन्ही कारणांमुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात तुरीचे पीक जळत असल्याने त्यामुळे उत्पादकता घटण्याची चिन्हे आहेत. खरीप हंगामात पुरेशा पावसाअभावी सोयाबीन, कपाशी पीक गमावलेल्या शेतकऱ्यांची चिंता यामुळे वाढत आहे. सोयाबीन व कपाशीला अपुऱ्या पावसाचा फटका बसला होता. या दोन्ही पिकांचे उत्पादन घटल्याने आता शेतकऱ्यांची सारी भिस्त तुरीवर होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com