काटेकोर शेतीत द्राक्ष उत्पादक अग्रेसर: डॉ. मायी

द्राक्ष चर्चासत्र
द्राक्ष चर्चासत्र

पुणे : कष्ट व कौशल्याच्या बळावर कोणताही आकार आणि मानकाची निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करण्याचे अवघड कसब शेतकऱ्यांनी आत्मसात केले आहे. त्यामुळे देशाच्या काटेकोर शेतीत द्राक्ष पीक अग्रेसर ठरले आहे, असे गौरवोद्गार भारतीय कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांनी काढले. ‘भारतीय द्राक्ष शेतीची वाटचाल आणि नियोजन’ या विषयावर पुण्यात सुरू झालेल्या दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्‍घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक महासंचालक डॉ. डब्ल्यू. एस. ढिल्लो, डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. इंदू सावंत तसेच प्रधान शास्त्रज्ञ डॉ. अनुराधा उपाध्याय व्यासपीठावर होत्या. डॉ. मायी म्हणाले की, “भारतीय शेतीत परिपूर्ण मूल्य साखळी असलेले पहिले पीक म्हणून द्राक्षाने स्थान मिळवले आहे. देशातील एकूण ४० टक्के बुरशीनाशके ही द्राक्ष व सफरचंदासाठी वापरली जातात. असे असूनही द्राक्षात ‘रेसिड्यू’ समस्येवर मात केली गेली आहे. शेतकऱ्यांनी साधलेले कौशल्य आश्चर्यकारक आहे. त्यामुळे काही शेतकरी आज बीएमडब्ल्यूमध्ये दिसतात. अर्थात असे असले तरी संशोधकांनी कीडरोगाचे पूर्वसूचना आणि उपाय सूचविणारी भक्कम यंत्रणा विकसित करून शेतकऱ्यांना आणखी बळकट करण्याची आवश्यकता आहे.”

नोंदणीकृत लागवड सामग्री नाही ः डॉ. सावंत कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत यांनी द्राक्ष शेतीमधील लागवड सामग्रीबाबत चिंता व्यक्त केली. “देशाच्या कृषी व्यवस्थेत द्राक्ष शेती अतिशय वेगळी आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी कधीही पराभूत होत नाही. तो सतत लढत असतो. त्यामुळे आम्हा शास्त्रज्ञांनादेखील अशा जिद्दी शेतकऱ्यांबरोबर संशोधन करताना आनंद वाटतो. दरवर्षी कोट्यवधी रोपांचा वापर द्राक्षशेतीत होतो. मात्र, अद्यापही नोंदणीकृत लागवड सामग्री नाही, हीच आमच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. त्यामुळे लागवड सामग्री बाहेरून आणावी लागते. परंतु, ही सामग्री बाधित असल्याने नव्या समस्या उभ्या रहातात.  प्रत्येक शेतकऱ्याला रोगमुक्त दर्जेदार आणि नव्या पिढीतील चांगली लागवड सामग्री प्राप्त होण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. शास्त्रज्ञ नियोजनबद्ध एकत्र आल्यास देशाच्या लागवड सामग्रीत चांगली भर घालू शकतील,” असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.

प्रतिकूल हवामानातही द्राक्षशेती टिकेल : डॉ. शिखामणी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय केंद्र शासनाने ठेवलेले आहे. ही क्षमता केवळ फलोत्पादनात आहे. शास्त्रज्ञांनी आता पाणीटंचाई ही मुख्य समस्या विचारात घेत संशोधनाचे टप्पे निश्चित करावेत. भारतीय द्राक्ष उत्पादक अतिशय प्रतिकूल हवामानात द्राक्ष शेती करीत आहेत. त्यामुळे भविष्यात कसेही हवामान बदलत गेले तरी आपली द्राक्ष यशस्वी होत राहील, असा विश्वास माजी कुलगुरू व प्रख्यात द्राक्ष शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. शिखामणी यांनी व्यक्त केला.

इंदू व एस. डी. सावंत यांचे संशोधन मौल्यवान ः डॉ. मुखोपाध्याय “मी महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकरी व शास्त्रज्ञांच्या कष्टाला सलाम करतो. काही वर्षांपूर्वी देशाच्या निर्यातक्षम द्राक्षाला नाकारले जात होते. वाहतुकीच्या कालावधीत मालाचे नुकसान होत असे. त्यासाठी आम्ही ट्रायकोडर्मावर संशोधनाचा सल्ला दिला होता. द्राश संशोधन केंद्रात त्यात चांगले काम केले. अर्थात कृषी शास्त्रज्ञ म्हणून डॉ. एस. डी. सावंत आणि डॉ. इंदू सावंत यांनी द्राक्ष संशोधनात केलेले काम मौल्यवान आहे,” असे उद्गार माजी कुलगुरू डॉ. ए. एन. मुखोपाध्याय यांनी काढले. “शेतकरी उत्पन्न वाढ तसेच बागेतील खर्च कमी करण्यासाठी अजून प्रयत्न करावे लागतील. ‘झिरो बजेट ॲग्रिकल्चर’ ही संकल्पना काही प्रमाणात शास्त्रज्ञांकडून आणली जाऊ शकते. मात्र, त्यासाठी रोगांचा अभ्यास आणि जैविक उपायांवर संशोधन वाढवावे लागेल,” असेही मत डॉ. मुखोपाध्याय यांनी व्यक्त केले. ‘सह्याद्री’ म्हणजे द्राक्षशेतीचे सर्वात आदर्श मॉडेल भारतीय द्राक्षशेतीची वाटचाल आणि त्यातून साधल्या जात असलेल्या प्रगतीबद्दल कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी शेतकऱ्यांचा गौरव केला. “देशातील एकूण द्राक्ष क्षेत्रापैकी ७५ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. त्यात पुन्हा ४५ टक्के लागवड नाशिकची आहे. शेतकरी व शास्त्रज्ञांकडून वर्षानुर्षे सुरू असलेले प्रयोग व संशोधनाचे हे फळ आहे. युवक शेतकरी व कृषी पदवीधर विलास शिंदे यांची ‘सहाद्री फार्मर्स प्रोडयुसर कंपनी’ ही द्राक्षशेतीमधील प्रगतीचे आदर्श रुप आहे. आशियातील सर्वात चांगला प्रकल्प श्री. शिंदे यांनी उभारून हजारो शेतकऱ्यांना आधार दिला आहे,” अशा शब्दांत कुलगुरूंनी सह्याद्रीचे कौतुक केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com