राजू शेट्टीं थेट काश्‍मीरात; बर्फवृष्टीग्रस्तांना भेटले, पिकांची केली पाहणी

पीक पाहणी
पीक पाहणी

कोल्हापूर : काश्मीरमधील सफरचंद, अक्रोड, केशर उत्पादक शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून, याकडे सरकारने दुर्लक्ष केले; तर येथील शेतकऱ्यांमध्येही आत्महत्यांचे सत्र सुरू होईल. यामुळे केंद्र सरकारने तातडीने येथील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करीत राष्ट्रीय आपत्ती निधीमधून मदतीची घोषणा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.  अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने काश्मीरमधील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी या शिष्टमंडळने काश्मीरमधील अनंतबाग, पुलवामा, पांपोर, कुलगाम, चौवलगाव या ठिकाणी सफरचंद, अक्रोड, केशर उत्पादक शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या शिवारभेटी करून समस्या जाणून घेतल्या. श्री शेट्टी म्हणाले की, गेल्या वर्षी व चालू हंगामात अवकाळी बर्फवृष्टीने सर्वाधिक नुकसान झाले आहे. चालू वर्षी बर्फवृष्टीने सफरचंदाची झाडे मोडून गेली असून, गेल्या तीस वर्षांतील सर्वाधिक नुकसान झाले आहे. सफरचंदाची लागवड होऊन पीक हातात येण्यासाठी जवळपास १० ते १२ वर्षांचा कालावधी जातो. सद्यःस्थितीत काश्मीरमधील कलम ३७० च्या निर्णयानंतर वाहतूक व्यवस्था व पायाभूत सुविधा नसल्याने सफरचंद निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. बर्फवृष्टी होऊन आज जवळपास १५ दिवस झाले. अजून पंचनामा करण्याचेही आदेश शासनाकडून देण्यात आलेले नाहीत. सफरचंदाच्या बागेतील मोडून पडलेली झाडे काढून पुन्हा फळबाग लागवड करणे हे शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारे आहे. यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. नाफेड व एन. एच. बी. (राष्ट्रीय बागवानी बोर्ड) यांच्याकडून कोणत्याच पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न केला नसल्याचे दिसून आले.  बर्फवृष्टीमुळे सफरचंदाच्या फळबागा जमीनदोस्त झाल्याने सफरचंद कुजत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सफरचंद पेट्या तयार करून बाजारात पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कलम ३७० च्या संचारबंदीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने बाजारापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे.  शिष्टमंडळाने केलेल्या मागण्या अशा

  • काश्मीरमधील अवकाळी बर्फवृष्टीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात यावी. 
  • तातडीने नुकसानभरपाईचा सर्व्हे करून संपूर्ण कर्जमाफी व ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार तिप्पट नुकसानभरपाई देण्यात यावी. 
  • सफरचंद, केशर व अक्रोड यांचा समावेश हवामान पीकविमा योजनेत करण्यात यावा. काश्मीरमधील सद्यःस्थितीत वेळेत बाजारात न पोहोचल्यामुळे खराब झालेल्या फळांची नुकसानभरपाई देण्यात यावी. 
  • नाफेड व राष्ट्रीय बागवानी बोर्ड (एनएचबी) यांच्यामार्फत तालुकानिहाय कोल्ड स्टोअरेज व खरेदी केंद्रे उभारण्यात यावेत. 
  • जम्मू आणि काश्मीर मध्ये स्वतंत्र फळबाग कृषी विद्यापीठाची निर्मिती करण्यात यावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com