द्राक्ष पट्ट्यातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींसमोर मांडली कैफियत

द्राक्ष नुकसान
द्राक्ष नुकसान

नाशिक : जुलैपासून मेहनत करून द्राक्षाचा हंगाम काढणीसाठी आला असताना परतीच्या पावसामुळे बागलाण तालुक्यातील द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. यांसह डाळिंबासह खरीप पिके, भाजीपाला आणि इतर पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाहणीसाठी आलेल्या लोकप्रतिनिधींसमोर शेतकऱ्यांनी आपली कैफीयत मांडली.     धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी नुकतीच बागलाण तालुक्यातील नुकसानग्रस्त फळबागांची पाहणी केली. या वेळी तालुक्यातील इजमाणे येथील तरुण शेतकरी अभिजित धोंडगे यांनी नुकसानीबाबत कैफियत मांडली. त्यांनी वीस लाख रुपये खर्च करून निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतले होते. मात्र, दुर्दैवाने परतीच्या पावसाने त्यांच्या सहा एकरातील ४२ टन द्राक्ष माल मातीमोल झाला. त्यामुळे त्यांना नुकसानीबाबत विचारले असता, त्यांना रडू अनावर झाले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना धीर दिला.  खासदार डॉ. भामरे आणि आमदार दिलीप बोरसे यांनी द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. ‘‘व्यवसायाने डॉक्टर असलो तरी सर्वात आधी शेतकरी पुत्र आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या दु:खाची मला जाणीव आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे,’’ असे आश्वासन डॉ. भामरे यांनी दिले.  या वेळी बोलताना आमदार दिलीप बोरसे यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे पंचनामे पूर्ण करून हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहे. या वेळी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे आग्रह धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, तालुकाध्यक्ष संजय भामरे, कृष्णा भामरे, किशोर खैरनार, केदा काकुळते, मनोहर देवरे, भास्कर सोनवणे, शिवाजी रौंदळ, प्रभाकर रौंदळ, पंकज ठाकरे, डॉ. शेषराव पाटील, खंडेराव आहिरे आदींसह द्राक्ष उत्पादक शेतकरी बहुसंख्येने संख्येने उपस्थित होते. धोरणात बदल करण्याबाबत प्रयत्न करणार  द्राक्ष पिकासमोर असलेल्या अडचणींवर तात्पुरता इलाज न करता त्या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विशेष कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पाऊस आणि खराब हवामानात तग धरणाऱ्या द्राक्षाची वाण विकसित करण्यासाठी जे प्लॅस्टिकचे अस्तरीकरण करावे लागते, त्यासाठीचे अनुदान आणि विमा धोरणात बदल करण्याबाबत प्रयत्न करणार आहे, असेही डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले.  द्राक्ष उत्पादकांच्या प्रमुख मागण्या

  •    द्राक्षाला जून ते जुलै महिन्यांपासून विमा संरक्षण पुरवावे.
  •    प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी अनुदान द्यावे.
  •    हमीभावात वाढ करावी.
  •    बँकांशी बोलून कर्जाचे पुनर्गठन करावे.
  •    नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com