सांगली जिल्ह्यात द्राक्षबागांना आता रोगांचा विळखा

द्राक्षबागांवर रोग
द्राक्षबागांवर रोग

सांगली ः गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी मॉन्सूनोत्तर पावसाने यंदा जिल्ह्याला अक्षरक्ष: झोडपून काढले. खरीप पिकांची मोठी हानी झाली. कृषी विभागाकडे नोंद असलेल्या ६१ हजार ८३२ एकर द्राक्षबागांपैकी अंदाजे ४५ हजार ५३७ एकर द्राक्षबागा अतिपाऊस आणि रोगाला बळी पडल्या आहेत. परिणामी एकरी नुकसानीचा आकडा वाढून चार लाखांचे नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना १ हजार ८०० कोटींहून अधिक फटका बसला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.  दरम्यान, बदलत्या वातावरणामुळे आणि कीड-रोगांमुळे नुकसानीचा आकडा आणखी वाढेल, असे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील उच्चांकी तब्बल ८ हजार ९८७ मिलिमीटर पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या तब्बल १७६ टक्के हा पाऊस ठरला. पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी द्राक्षबागांमध्ये गुडघाभर तर काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचले होते. मात्र अशाही स्थितीत द्राक्षबागा रोगाला बळी पडू नयेत म्हणून शेतकऱ्यांनी दिवसातून चार-चार वेळा बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या. पण शेतकऱ्यांना बागा वाचविण्यात यश आले नाही. ऐन छाटणी हंगामात पावसाने झोडपून काढल्याने केलेली मेहनत, सारा खर्च पावसाच्या पाण्यासोबतच वाहून गेला. फुलोऱ्‍यातील बागांमध्ये घडकूज झाली. तयार झालेल्या बागांची मणीगळ सुरू झाली आहे. अनेक बागांत विक्रीसाठी तयार झालेल्या मण्यांना तडे जात आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. परंतू या मागणीकडे सराकारने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.  आगळगावमध्ये द्राक्ष घड फेकण्याची वेळ आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बागेत पावसाचे पाणी साचून राहिल्याने कुजवा व दावण्या रोगाच्या प्रादुर्भावाने सर्व द्राक्ष घड ओढापात्रात फेकण्याची वेळ आली आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यात दुष्काळ नेहमीच पाचवीला पुजलेला असतो. तरीही शेतकऱ्यांनी स्वतःच्या जिद्दीवर द्राक्षबागांचे मळे फुलवले, प्रसंगी टॅंकरने पाणी आणून बागा जगवल्या. मात्र, येथील शेतकऱ्यांवरही रोगग्रस्त सर्व द्राक्षे वाहत्या ओढ्यात फेकून द्यावी लागली.  तालुकानिहाय द्राक्षबागांचे झालेले नुकसान (एकरमध्ये)

तालुका  क्षेत्र   नुकसानग्रस्त क्षेत्र    नुकसान (कोटींत)
मिरज    १८१७५  १२७२२   ५०९
वाळवा  २२८०  १७१०  ६९
आटपाडी   ४९१    १४७    ६  
तासगाव  १९८००   १६८३० ६७३
कडेगाव  ३१६   १५८  ६
खानापूर   १९५५   १७६०   ७०
पलूस ३०८५ २१६० ८६
क. महांकाळ ४१००  ३०७५   १२३
जत    ११६३०   ६९७५ २७९
एकूण   ६१८३२   ४५५३७ १८२१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com