केसर आंब्याचे उत्पादन ४५ टक्के घटणार; लांबलेल्या पावसाचा परिणाम

गेलं वर्ष ‘ऑनईअर’ असलेल्या केसर आंब्यासाठी यंदाचं वर्ष ‘ऑफईअर’च दिसतं. त्यामुळे साधारणत: दहा ते पंधरा टक्‍के परिणाम होईल. अर्थात पोषक नसलेले वातावरण केसरच्या बहरावर किती परिणाम करतं यावरही बरंच काही अवलंबून आहे. - डॉ. एम. बी. पाटील, फळबाग संशोधन केंद्र प्रमुख, हिमायतबाग, औरंगाबाद.
केसर आंब्याचे उत्पादन ४५ टक्के घटणार; लांबलेल्या पावसाचा परिणाम
केसर आंब्याचे उत्पादन ४५ टक्के घटणार; लांबलेल्या पावसाचा परिणाम

औरंगाबाद : गंध आणि चवीसाठी केसर आंब्याची आपली स्वतंत्र ओळख आहे. हापूसच्या बरोबरीने हा केसर आंबासुद्धा तितकाच भाव खात असतो. मात्र, यंदाच्या हंगामात सततच्या पावसाने केसर आंबा उत्पादनाला खोडा घातला आहे. पावसाळ्यानंतर आधी ‘हीट’चा तडका व नंतर थंडीचा ‘शॉक’ न बसल्याने बहुतांश बागांमध्ये बहराऐवजी नवती फुटली आणि फुटते आहे. या पालवीवर बहराची तूर्त शक्‍यता नसल्याने केसर आंब्याचे उत्पादन आणखी महिनाभर लांबणीवर पडून सुमारे ४५ टक्क्यांपर्यंत उत्पादनघटीचा अंदाज आंबा उत्पादकांनी व्यक्‍त केला आहे. यामुळे सुमारे ७०० कोटी रुपयांचा थेट फटका केसर आंबा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे.  यंदा ऑक्‍टोबरमध्ये लांबलेल्या पावसानंतर आंब्याच्या झाडांना बहराऐवजी नवती फुटते आहे. ही नवती केसरच्या उत्पादनावर तसेच हंगाम आणखी लांबणीवर टाकण्याची शक्‍यता शेतकरी व्यक्‍त करीत आहेत. या ''नवती''(पालवी)वर मोहर येण्याची शक्‍यता नाही, तसेच अजूनही बहराऐवजी नवतीच फुटत असल्याचे शेतकरी सांगतात. अर्थात ज्या बांगांमध्ये नवती नाही त्या बांगामध्ये मोहर वेळेवर फुटून वेळेवरच केशरचे उत्पादन होण्याची आशा तज्ज्ञांनी व्यक्‍त केली आहे. राज्यात जवळपास दीड लाख हेक्‍टरवर विविध जातीच्या आंबा बागा आहेत. कोकणातील हापूस व मराठवाड्यातील केसर या प्रमुख जाती आहेत. मराठवाड्यात १९३७१ हजार हेक्‍टरवर आंबा बागा आहेत. त्यापैकी व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड झालेल्या जवळपास ७० ते ८० टक्‍के क्षेत्रावर केसर आंबा आहे. राज्यात जवळपास ३० हजार हेक्‍टरपर्यंत केसर आंबा बागेचे क्षेत्र आहे. साधारणत: हेक्‍टरी सहा टनांपर्यंत केसर आंब्याचे उत्पादन होते. केसरचे आगमन कधी होते यावरून त्याला साधारणत: ६० ते १२० रुपये प्रतिकिलोपर्यंत केसरला दर मिळतात.  मराठवाड्याचा केसर साधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये बहरून त्यानंतर एप्रिल किंवा मे मध्ये बाजारात दाखल होतो. त्यासाठी सप्टेबरपर्यंत पाऊस, त्यानंतर ऑक्‍टोबर ''हीट''चा तडका आणि त्यानंतर थंडीचा ''शॉक'', त्यात साधारणत: २१ दिवसापर्यंत रात्रीचे तापमान १४ डिग्री कायम असणे असं वातावरण असणे आवश्‍यक आहे. यंदा मात्र अजून आंब्याला मोहर फुटण्याची स्थिती नाही. शिवाय पुढील दहा दिवस रात्रीचे तापमान १७ ते १८ डिग्री राहणार असल्याचा अंदाज असल्याची माहिती हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. बी. पाटील यांनी दिली. त्यामुळे यंदा नवती न फुटणाऱ्या बागा वगळता केसरचे उत्पादन मे किंवा जूनपर्यंत लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यास केसरला मार्केटच उरणार नसल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष आंब्यासाठी ‘ऑफइअर’च असण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्‍त केली आहे.  ताळतंत्र बिघडलं ! पावसाळ्यानंतर साधारणतः सप्टेंबरपर्यंत अनियमित व असमान पाऊस होता. शिवाय ऑक्‍टोबरमध्ये पावसाचा जोर सर्वदूर अतिजोरदार स्वरूपाचा होता. त्यामुळे अजूनही अनेक बागा वाफसा परिस्थितीत नाहीत. त्यामुळे केसर आंब्याला ऑक्‍टोबर हीटचा तडका बसलाच नाही. शिवाय पावसाळ्यानंतर बाग ताणावर न गेल्याने अनेक बागांमधील आंब्यांच्या फांद्यांना 'नवती' फुटली, ती अजूनही फुटणे सुरू आहे. काही बागांत नोव्हेंबरमध्ये तर काही बागांमध्ये डिसेंबरमध्ये आंबा बागांना मोहर फुटणे सुरू होतो. परंतू यंदा अजून मोहर फुटण्याची चाहूल बागेत नाहीे. एरवी एप्रिलअखेर वा मेमध्ये होणारे केसरचे उत्पादनही उत्पादनही जमिनीच्या मगदूराप्रमाणे किमान महिनाभराच्या कालावधीसाठी पुढे ढकलले जाईल, असे शेतकरी व तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   प्रतिक्रिया

ज्या बागांमध्ये नवती नाही, त्या केसर बागांमध्ये मात्र मोहर वेळेवर फुटून आंबा उत्पादन वेळेवरच होईल. वातावरणातील बदल कसा पूरक राहतो यावरही बरच काही अवलंबून आहे. - डॉ. भगवानराव कापसे , फळबाग तज्ज्ञ 

माझ्या बागेत दहा टक्‍के नवती फुटली व फुटते आहे. अजून मोहर फुटण्याच्या दृष्टीने कुठलीही हालचाल नाही, डिंक जास्त येतोय, त्यामुळे फाटे कमजोर होताहेत. महिनाभर हंगाम लांबेल असेच चिन्ह आहेत. साधारणत: ४० ते ५० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आहे.  - मिठूभाऊ चव्हाण, आंबा उत्पादक शेतकरी, भांडेगाव, जि. औरंगाबाद

केसर आंबा बहराची अजून सुरवात नाही. नवती निघाली व निघते आहे, त्यावर बहर येणे नाही. शिवाय वातावरणावर सारं अवलंबून आहे, त्यामुळे यंदा हंगाम लांबण्याचीच चिन्हं आहेत.  - गवनाजी अधाने, विरमगाव, जि. औरंगाबाद. 

आधी दुष्काळाचा चटका बसल्याने मोठ्या प्रमाणात केसर आंब्याची झाडं गेली. जी वाचली त्यातील पक्‍व काडीवर मोहराऐवजी नवती फुटली, ती अजूनही फुटते आहे. शिवाय ऑक्‍टोबर हीटचा ताणही बसला नाही, थंडी कशी राहिलं हे आता सांगता येत नाही. यंदाचा हंगाम उत्पादनाबाबत अडचणीचा व लांबणीवर पडणाराच दिसतो.  - संजय मोरे पाटील, आंबा उत्पादक शेतकरी, नळविहिरा, जि. जालना. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com