चौथीच्या अभ्यासक्रमातून शिवरायांचा इतिहास वगळला

छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज

मुंबई : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वगळण्यात आला आहे. निवडणुकांच्या तोंडावर शिवरायांच्या नावे मतांचा जोगवा मागितला जात असतानाच हा प्रकार पुढे आल्यामुळे सर्व क्षेत्रांतून संताप व्यक्त होत आहे.  राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृतीसोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, या हेतूने शिक्षण विभागाने ‘आंतरराष्ट्रीय’ असे नामकरण केले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचीही स्थापना करण्यात आली. गेल्यावर्षी पुस्तकांविनाच चालणाऱ्या या शाळांसाठी यंदा पहिली ते चौथीची पुस्तके ऑगस्ट महिन्यात छापण्यात आली. त्यातून हा प्रकार समोर आला आहे. बालवयातच विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्याची गाथा समजावी, यासाठी इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला. मात्र, आता हा जाज्वल्य इतिहासच शालेय अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे. इयत्ता चौथीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्यात येतो. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना १९९१ मध्ये चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात काही बदल करण्यात आले होते. त्या वेळी विरोध झाल्यानंतर चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, लढाया यांचा समावेश इतिहासाच्या पुस्तकात केलेला दिसत नाही. केवळ ‘भारतीय लोक’ या पाठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी, एकलव्य, लाल बहादूर शास्त्री आणि हनुमान यांची छोटेखानी माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय, शिवस्मारकाच्या उभारणीत केलेला अक्षम्य विलंब हे कमी होते म्हणून की काय भाजपा-शिवसेना सरकारने आता चौथीच्या पुस्तकातून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘इतिहास’ हद्दपार करण्याचा घाट घातलाय. हे अतिशय दुर्देवी असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी याचा तीव्र निषेध केला आहे. तर छत्रपती शिवरायांचा या सरकारने केवळ स्वार्थासाठी वापर केल्याचे आता उघड होत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून पुसण्याचा घाट घातला गेला असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com