लांबलेल्या पावसाने आंबा हंगामावर परिणाम

आंबा
आंबा

रत्नागिरी ः पावसाचा लांबलेला मुक्काम आंबा बागायतदारांच्या उत्पन्नाचे गणित बिघडवणारा ठरला आहे. आंबा हंगाम दीड ते दोन महिने पुढे सरकल्यामुळे पहिल्या टप्प्यात मिळणाऱ्या चढ्या दराचा फायदा बागायतदारांना यंदा मिळणार नाही. एकाचवेळी हापूससह अन्य भागांतील आंबे बाजारात दाखल झाले तर दर गडगडतील, अशी भीती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.

परतीचा पाऊस दरवर्षी सप्टेंबर महिन्याअखेरीस पडतो; परंतु यंदा पावसाचा मुक्काम लांबतच गेला आहे. ऑक्टोबर महिन्यात सलग तीनवेळा कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्याचे रूपांतर वादळात झाले आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पिके वाया गेली आहेत. खरीप पिकांबरोबरच त्याचा परिणाम रब्बी पिकावरही होणार आहे. लांबलेल्या पावसाचा भीती कोकणातील आंबा बागायतदारांनाही घेतली आहे. ऑक्टोबर महिन्यात हवामान स्थिर राहाणे आंबा बागांच्यादृष्टीने आवश्यक होते. नोव्हेंबरमध्ये मोहोर येतो, पण अजूनही अनेक झाडांवर पालवी दिसते. काही झाडांवर तर पालवीही आलेली नाही. हवामान विभागाकडून नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली आहे. पावसाची स्थिती अशीच राहिली तर त्याचा फटका बागायतदारांना बसणार आहे.

सध्याच्या परिस्थितीमुळे यंदाचा आंबा हंगाम दीड ते दोन महिने पुढे जाणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत पहिल्या टप्प्यातील आंबा बाजारात दाखल होतो. पेटीचा दर सर्वसाधारणपणे दहा हजार रुपयांपर्यंत जातो. यंदा पहिली पेटी जाण्यासाठी फेब्रुवारी उजाडेल असा अंदाज आहे. पालवी जुन होऊन, मोहोर येणे आणि प्रत्यक्ष आंबा तयार होण्यासाठी १०५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यादृष्टीने ठरावीक झाडांना अजून मोहोरही आलेला नाही. येत्या पंधरा दिवसांत ती प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर थंडी सुरू झाल्यावर मोहोराला पोषक स्थिती निर्माण होईल. याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे. 

एप्रिल महिन्यात मोठ्याप्रमाणात आंबा तयार होणार असून त्या वेळी सर्वच राज्यातून बाजारात आंबा दाखल होईल. मार्च महिन्यात जाणाऱ्या ‍या पेट्यांचे प्रमाण अत्यंत कमी राहील. सुरवातीला कोवळा आंबा मार्केटमध्ये येण्याची भीतीही आहे. याबाबत आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे म्हणाले, की पाऊस लांबल्यामुळे मोहोर येण्यासाठी आवश्यक परिस्थिती अजूनही तयार झालेली नाही. अजून काही ठिकाणी पालवी येत आहे. त्याचा परिणाम हंगामावर होणार आहे. तसेच बागायतदार तुकाराम घवाळी म्हणाले, की एकाचवेळी विविध राज्यांतील आंबा बाजारात आला तर त्याचा परिणाम दरावर होईल आणि उत्पन्न घटेल. गतवर्षी शेवटच्या आंब्याला दर मिळाला नाही. यंदाही ८० टक्के आंबा शेवटी होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com