अकोला ः महाराष्ट्रात मध्य प्रदेशप्रमाणे भावांतर योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. २८) भारतीय किसान संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे अांदोलन करण्यात अाले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात अाले.
सध्या तूर, हरभरा खरेदी मंद गतीने सुरू अाहे. यामुळे राज्यातील शेतकरी अार्थिक अडचणीत सापडले अाहेत. यासाठी शासन व प्रशासन दोघेही उदासीन अाहेत. यामुळे शेतकऱ्यांना तूर व हरभरा कमी भावाने व्यापाऱ्यांना विकावा लागला. यातून नुकसान सोसावे लागले. प्रशासनावर नियंत्रण नसल्याने तूर खरेदी केवळ ३३ टक्के व हरभरा खरेदी त्याहीपेक्षा कमी झाली. शासनाने जी थोडीशी खरेदी केली त्याचेही पैसे दिले नाहीत. शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी भारतीय किसान संघाने पाठपुरावा केला. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित अाहेत.
शासनाने भावांतर योजना सुरू करावी, विदर्भातील अनेक धरणांची कामे अजूनही अपूर्ण अाहेत हे प्रकल्प पूर्ण करावेत, कृषिपंपाला १२ तास वीजपुरवठा दिला जावा, पाणंद रस्ते पूर्ण करावेत, अायात निर्यात धोरण हे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आखावे, एकतर शेतीमाल अायात होऊ नये किंवा अायात शुल्क जास्त अाकारावे, शेतीमाल निर्यातीस प्रोत्साहन द्यावे, जैविक मालाची स्वतंत्र विपणन व्यवस्था बाजार समितीच्या माध्यमातून करावी.
शेतीमजूर मिळत नसल्याने रोजगार हमी योजनेत शेतकामाची योजना करावी व मजुरांना मिळणाऱ्या योजनांचा पुनर्विचार करावा, बोगस बियाणे, कीटकनाशके विक्रेत्यांवर कारवाई व्हावी, बीटी कापसाच्या एचटी वाणावर बंदी घालावी, वन्य प्राण्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशा मागण्या किसान संघाने केल्या अाहेत.
जिल्हाध्यक्ष पांडुरंग गायकी, जिल्हामंत्री डॉ. सुभाष देशपांडे यांच्यासह इतर पदाधिकारी या अांदोलनात सहभागी झाले होते.