केंद्र सरकारकडून एक लाख टन कांदा आयातीला परवानगी
पुणे: मॉन्सूनचा वाढलेला मुक्काम, अतिवृष्टी, मॉन्सूनोत्तर पावसाचे वाढलेले दिवस आदी कारणांनी कांदा पिकाचे झालेले नुकसान आणि जुन्या कांद्याच्या टंचाईमुळे बाजारातील कांद्याची आवक घटली आहे. परिणामी, कांद्याचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र शासनाने एक लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचे अर्थ सल्लागार आणि नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी ए. के. चौधरी यांनी एक लाख टन कांदा आयात करण्याबाबतचे पत्र एमएमटीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वेद प्रकाश यांना दिले आहे. कांद्याच्या आयातीमुळे शेतकऱ्यांना मिळणारे दर कमी होण्याचा धोका निर्माण झाला असून, याबद्दल शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशातील कांदा टंचाई लक्षात घेता केंद्राने कांदा आयात सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, महिनाभरात इजिप्त आणि तुर्कस्थान येथून कांदा आयात होणार आहे. या आयात होणाऱ्या कांद्याच्या वितरणाची जबाबदारी नाफेडवर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि शेजारील राज्यात झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थितीमध्ये कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पादन घटले असून, बाजारात सध्या होणारी आवकेमध्येदेखील चांगल्या दर्जाच्या कांद्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जुन्या कांद्याला मागणी वाढली असून, त्याचे दर पुणे बाजार समितीमध्ये किलोला ६० रुपयांपर्यंत वाढले आहेत. तर नवीन कांद्याचे दर ३० रुपयांपर्यंत आहेत. तर हेच दर किरकोळ बाजारात ८० रुपयांच्या घरात पोचले आहेत. भविष्यात कांद्याच्या दराने शंभरी ओलांडू नये यासाठी केंद्राने आयातीचा निर्णय घेतला आहे. पुढील महिनाभरात टप्प्याटप्पाने कांदा आयात होणार असून, त्याचे वितरण नाफेड मार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.