फरदड कापूस घेण्याचे काही फायदे असले तरी तोट्यांचे प्रमाण अधिक आहे. विशेषतः ज्या भागामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झालेल्या भागात पुढील हंगामातील प्रादुर्भाव राहण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेण्याचे टाळावे. कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर एखादा पाणी देऊन पुन्हा कापूस पीक घेण्याच्या पद्धतीला फरदड कापूस म्हणतात. फरदड पिकांमध्ये चांगल्या उत्पादनासाठी पाणी, खते, कीटकनाशकांचा वापर केला जातो. या पद्धतीमुळे कापूस पीक शेतामध्ये मार्च महिन्यानंतर राहते. कपाशी वेचणीनंतर रब्बीपश्चात हंगामामध्ये नवीन पीक घेण्यासाठी मशागत, पेरणी आणि बियाणे अशा बाबींवर खर्च करावा लागतो. हा खर्च टाळून खरिपातील लागवडीवरच फरदड कापसाचे वाढीव उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. प्रति एकर कापूस उत्पादकता वाढत असली तरी या पद्धतीमुळे शेतीमध्ये दीर्घकाळ पीक राहते. गुलाबी बोंड अळीसारख्या किडींसाठी खाद्य व पोषक वातावरण निर्माण होते. गुलाबी बोंड अळीची समस्या वाढण्यास फरदडमुळे मदत
कपाशीच्या दीर्घकाळाच्या संकरित वाणाची लागवड केली जाते. परिणामी गुलाबी बोंड अळीच्या जास्त पिढ्या पूर्ण होतात. अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. वेगवेगळ्या कपाशीच्या संकरित वाणाच्या लागवडीमुळे त्यांचा फुले येण्याचा व बोंडे लागण्याचा काळ वेगवेगळा राहतो. गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी सतत अन्न पुरवठा होत राहतो. प्रदीर्घ काळापर्यंत कच्च्या कपाशीची जिनिंग आणि व्यापारी संकुलात साठवण केली जाते. त्यामुळे गुलाबी बोंड अळी आगामी हंगामात येण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. हंगामपूर्व एप्रिल-मे मध्ये लागवड केलेल्या कपाशीचा फुले येण्याचा काळ जून-जुलै महिन्यात येतो. त्यामुळे गुलाबी बोंड अळीसाठी पुढे खाद्य तयार असते. यातून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा मुख्यतः हिवाळ्यात ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये होतो. ही अळी डिसेंबर महिन्यात कपाशीच्या पऱ्हाट्या किंवा वाळलेल्या खुरकुट्यामध्ये कोषावस्थेत जाते. नोव्हेंबरनंतरही शेतात पाणी देऊन ठेवल्याने शेंदरी बोंड अळीच्या वाढीला आणखी चालना मिळते. बोंड अळीमध्ये प्रथिनाविरुद्ध प्रतिकारक्षमता तयार होणे टाळण्यासाठी नॉन बीटी म्हणजेच आश्रय ओळी (रेफ्युजी) बियाणे लावण्याची शिफारस केली जाते. मात्र, अनेक शेतकरी रेफ्युजी लागवड करणे टाळतात, हे चुकीचे आहे. कपाशी पिकावर येणाऱ्या प्रमुख बोंड अळ्यांपैकी हिरवी बोंड अळी, ठिपक्याची बोंड अळी, शेंदरी बोंड अळी आणि तंबाखूची पाने खाणारी अळी यापैकी फक्त शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम कापूस पिकावर पूर्ण होतो. यामुळे त्यांच्यामध्ये मागच्या तीन-चार वर्षांत बीटी प्रथिनांविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. कपाशीवरील रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी काही ठराविक कीटकनाशकांचा वारंवार वापर झाला. त्यामुळे झाडांची कायिक वाढ होऊन फुले व बोंडाचे प्रमाण कमी व पुढेमागे होते. अळीचा प्रादुर्भाव हिरव्या व फुटलेल्या बोंडामध्येही आढळून येतो. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वनस्पतिजन्य कीटकनाशकांची ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फवारणी केली. रासायनिक कीटकनाशकांचा मर्यादीत वापर केला, अशा ठिकाणी बोंडे एकाच वेळी फुटून आली. परिणामी शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी झाला. बीटी कापूस पिकाचे फरदड घेतल्यास बोंड अळीमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होऊ शकते. सध्या बीटी प्रथिनांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. कापूस पिकाच्या वाढीच्या कालावधीत बरोबरच त्यातील बीटी प्रथिनाचे प्रमाण कमी होत जाते. बोंड अळीचा प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक किमान पातळीपेक्षा प्रथिनाचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा परिणाम कमी होतो. फरदड कपाशीमध्ये बोंडाचे पोषण योग्य न झाल्यामुळे धाग्याची लांबी व मजबुती कमी राहते. कापसाची प्रत घटते. परिणामी कापसाला बाजारभाव कमी मिळतो. फरदड कापसासाठी सिंचनाची आवश्यकता असते. कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता राहते. त्यात पांढरी माशी या किडीच्या प्रादुर्भाव कापूस हंगामाच्या शेवटी ऑक्टोबर महिन्यात होतो. या परिस्थितीमध्ये कापसाची फरदड घेतल्यास पांढरी माशी किडीचे प्रमाण वाढते. तसेच पुढील हंगामांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव लवकर होऊ शकतो. फरदड कापूस घेतल्यामुळे त्या जमिनीमध्ये फ्युजारीयम, मर, व्हर्टीइसिलियम, मूळ सडणे इ. मृदाजन्य रोगकारक बुरशीचा प्रसार होऊ शकतो. फरदड कापूस पीक शेताबाहेर काढण्याच्या वेळी माती कडक झालेली असते. झाडे उपटून काढण्यासाठी अधिक प्रमाणात मजूर, वेळ, श्रम आणि पैसा खर्च होतो. संपर्कः डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८ (विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, ता. गेवराई, जि. बीड अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी.)