द्राक्ष बागांवर फळकुजीचे संकट

ज्या द्राक्ष बागा फुलोरा अवस्थेत आहेत. त्यांच्यात घडकुज ही समस्या तयार झाली आहे. हे नुकसान सुमारे २० टक्क्यांपासून ते ४० ते ५० टक्क्यांपर्यंत आहे. पुढेही पाऊस सांगितला असल्याने नुकसानीची तीव्रता अजून वाढणार आहे. - जितेंद्र बिडवई, अध्यक्ष, द्राक्ष उत्पादक संघ, जुन्नर
द्राक्ष नुकसान
द्राक्ष नुकसान

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून होणारा सततचा पाऊस, धुके आणि ढगाळ वातावरणामुळे जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रतिकूल हवामानामुळे फुलोऱ्यातील द्राक्ष बागांचे घड आणि फळकुजीमुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचे चित्र आहे.   प्रतिकूल हवामानामुळे द्राक्षावर डाऊनीचे प्रमाण वाढल्याने कीटनाशक फवारणीच्या खर्चाला सुमार राहिला नाही तर फवारण्या करूनही उपयोग होत नसल्याने द्राक्ष उत्पादक हतबल झाले आहेत. घड कुजीच्या समस्येमुळे उत्पादनावर ५० टक्के नुकसान तत्काळ स्वरूपात झाले आहे, तर आठ दिवसांनंतर मोठ्या प्रमाणात नुकसान वाढण्याची भीती आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये छाटणी केलेल्या बागा आता फुलोरा, फेलफुट, डीपिंग या अवस्थेत आहेत. काही बागांच्या छाटण्या सुरू आहेत. काही बागा पोंगावस्थेत आहेत. काही बागा फेलफुट ते कळीच्या डीप अवस्थेत आहेत. या हवामानामध्ये सगळ्यात जास्त धोका दोडा अवस्थेपासून मणीधारणा अवस्थेपर्यंतच्या बागांना आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे दहा ते पंधरा हजार हेक्टर क्षेत्र आहे. कृषी विभागाकडून दरवर्षी साधारणत १५ ऑक्टोबरपासून लागू होणारा हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहिर केली जाते. यंदा अद्यापही जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. द्राक्ष पिकाच्या झालेल्या व होणाऱ्या नुकसानीची भरपाई कोण देणार असा सवाल शेतकरी करत असून  तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे. घड जिरण्याची समस्या  सतत पाऊस पडत राहिल्याने ज्या बागा पोंगा अवस्थेत आहेत त्यांच्यातही घड जिरण्याचे प्रमाण मोठे आहे. त्याचे प्रमाण अजून वाढू शकते. हे देखील मोठे नुकसान म्हणायला हवे. सध्या रोगांपासून बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा ३० ते ४० टक्के खर्च केवळ बुरशीनाशकांवर होतो आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे नुकसान व वाढलेला भरमसाट खर्च यातून शेतकऱ्यांच्या हाती काय लागणार हा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. जु न्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष बिडवई म्हणाले, की ज्या द्राक्षाच्या बागा पाच- सहा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत छाटल्या आहेत. त्या फुलोरा अवस्थेत आहेत. त्यांच्यात घडकुज ही समस्या तयार झाली आहे. हे नुकसान सुमारे २० टक्क्यांपासून ते ४० ते ५० टक्क्यांपर्यंत आहे. पुढेही पाऊस सांगितला असल्याने नुकसानीची तीव्रता अजून वाढणार आहे. या बागांचा माल जानेवारी ते फेब्रुवारीत सुरू होणार असल्याने त्यांना मोठ्या उत्पादन घटीला सामोरे जावे लागणार आहे. ज्या बागांची वेळेवर छाटणी झाली आहे किंवा ज्या बागा पोंगा किंवा फुटण्याच्या अवस्थेत आहेत. त्यांच्यात डाऊनी रोगाचा मोठा धोका तयार झाला आहे. सद्यःस्थितीत या बागा वाचवणे देखील आव्हानाचे होऊन बसले आहे. शरद सीडलेस, जंबो या वाणांना मागील वर्षीच माल कमी होता. याचे कारण म्हणजे एप्रिलमध्ये त्यांना पाण्याचा ताण सहन करावा लागला होता. पाऊस पडून गेल्यानंतरही घडकुजीचे लक्षण दिसण्यास काही अवधी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. असे झाले नुकसान

  • आगाप द्राक्षांचे ३० ते ८० टक्के नुकसान  
  • फुलोऱ्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान  
  • घडांतील मणी पावसाने फुटले  
  • मणी, घडांवर डाऊनीचा मोठा प्रादुर्भाव  फवारण्या करूनही उपयोग होण्याची चिन्हे नाहीत
  • प्रतिक्रिया बदलत्या हवामानामुळे फुलोऱ्यातील द्राक्ष बागांचे घड आणि फळकुजीमुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. दिवाळीच्या सणांमुळे प्रशासकीय अधिकारीही फिरकले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे. - जयवंत ज्ञानेश्‍वर ढोके, शेतकरी, गोळेगाव, ता. जुन्रर

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com