नागपूर जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी बांधलेला बंधारा गेला वाहून

नागपूर जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी बांधलेला बंधारा गेला वाहून
नागपूर जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी बांधलेला बंधारा गेला वाहून

नागपूर  ः जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत दोन महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेला बंधारा पहिल्याच पावसात वाहून गेल्याने या कामाच्या गुणवत्तेविषयी शंका व्यक्‍त केली जात आहे. जलयुक्‍त शिवार अभियानातील या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सरपंच राजेश ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते संजय सत्येकार यांच्यासह शेतकऱ्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.   शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, तसेच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या उद्देशाने जलयुक्‍त शिवार अभियान राबविले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील या उपक्रमांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे हाती घेण्यात आली. पारशिवणी तालुक्‍यातील पालासावळी व कोंढासावळी या गावांदरम्यान वाहणाऱ्या नाल्यावर बंधाऱ्याचे दोन महिन्यांपूर्वीच बांधकाम करण्यात आले. या कामाचे कंत्राट जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत कंत्राटदाराला देण्यात आले होते. यात संबंधित कंत्राटदाराने नाल्याचे खोलीकरण करून नियोजित ठिकाणी सिमेंटच्या बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर या भागात गेल्या चार दिवसांपासून संततधार पावसाला सुरवात झाली. त्यातच नाल्याला पूर आला आणि याच पुरात या बंधाऱ्याला मोठमोठे भगदाड पडून पाणी पूर्णपणे वाहून गेले. या बंधाऱ्यालगत असलेल्या रस्त्याखालील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. परिणामी, या बांधकामाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सरपंच राजेश ठाकूर यांच्यासह शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यासंदर्भात निवेदन दिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com