राज्यात उन्हाचा चटका कायम

हवामान अंदाज
हवामान अंदाज

पुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशांपुढे गेला असून जळगाव, मालेगाव, सोलापूर, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, यवतमाळ येथे उन्हाचा चटका अधिक आहे. शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारपर्यंत (ता. १७) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानासह तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी वाढला आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान २८ ते ३८ अंशांच्या आसपास आहे. कोकणात ३२ ते ३४, मराठवाड्यात ३४ ते ३६ आणि विदर्भात ३२ ते ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या वर असून, विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र रात्रीचे तापमान सरासरीच्या खाली घसरले आहे. परभणी येथे राज्यातील नीचांकी १७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असल्याचे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.

बंगालच्या उपसागरामधील वादळ निवळले असून, शनिवारी सकाळी पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर कमी दाब क्षेत्र सक्रिय होते. त्यामुळे अोडीशा, पश्‍चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांमध्ये ढगांची दाटी झाली असून, या भागात पाऊस पडत आहे. तर अरबी समुद्रातील ‘लुबन’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. आज (ता. १४) दुपारपर्यंत हे वादळ रियान (येमेन) आणि अल-घैदाह (आेमान) जवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी (ता. १३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.१, जळगाव ३८.०, कोल्हापूर ३३.८, महाबळेश्वर २७.८, मालेगाव ३६.०, नाशिक ३४.१, सातारा ३२.८, सोलापूर ३६.६, सांताक्रूझ ३४.७, अलिबाग ३२.७, रत्नागिरी ३३.५, डहाणू ३४.१, आैरंगाबाद ३५.०, परभणी ३५.५, नांदेड ३६.०, उस्मानाबाद ३४.३, अकोला ३६.८, अमरावती ३६.०, बुलडाणा ३४.०, ब्रह्मपुरी ३४.०, चंद्रपूर ३४.२, गोंदिया ३२.०, नागपूर ३३.५, वर्धा ३५.०, यवतमाळ ३६.०.

दक्षिण भारतात माॅन्सूनचे अस्तित्व महाराष्ट्रासह बहुतांशी देशांतून परतीची वाटचाल अवघ्या आठ दिवसांत पूर्ण करणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) अद्यापही देशाचा निरोप घेतलेला नाही. महाराष्ट्रातून गेल्या आठवड्यात शनिवारी (ता. ६) परतल्यानंतर लुबन आणि तितली चक्रीवादळांच्या निर्मितीमुळे मॉन्सूनची वाटचाल मंदावली आहे. दक्षिण भारतातील राज्यामध्ये मॉन्सूनचे अस्तित्व असून, मच्छलीपट्टणम, कर्नुल, गदग, वेंगुर्लापर्यंतची मॉन्सूनची परतीची सीमा शनिवारी (ता. १३) कायम असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com