मागण्यांसाठी साखर कामगारांचा पुण्यात मोर्चा

मागण्यांसाठी साखर कामगारांचा पुण्यात मोर्चा

पुणे  ः साखर कामगारांसंबधी त्रिपक्षीय वेतन समितीचे गठन सरकारने येत्या पंधरा दिवसांत करावे. साखर कामगारांची उपासमार सुरू असून, सरकाराने हा प्रश्‍न त्वरित निकाली काढवा, अन्यथा येत्या गाळप हंगामात साखर कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा साखर कामगारांनी दिला.  

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने विविध मागण्यांसाठी साखर आयुक्तालयावर बुधवारी (ता. २८) मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, मंडळाचे राज्य सरचिटणीस शंकरराव भोसले, कॉ. सुभाष काकुस्ते, राज्य कार्याध्यक्ष राऊ पाटील, राज्य उपाध्यक्ष अशोक बिराजदार, डी. बी. मोहिते, खजिनदार रावसाहेब भोसले, राजेंद्र तावरे, सुरेश मोहिते, नितीन बेनकर यांच्यासह राज्यभरातील साखर कामगार सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या पाच प्रतिनिधींनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना या वेळी मागण्यांचे निवेदन दिले.  

या वेळी तात्यासाहेब काळे म्हणाले, की साखर कामगारांच्या वेतनाबाबतच्या त्रिपक्षिय समितीची मुदत संपून पाच महिने झाले आहे. तरी अजूनही नवी समितीची निवड झालेली नाही. सरकारने नवीन समिती गठीत करून कामगारांचे प्रश्‍न सोडवावेत. साखर कामगारांचे थकीत वेतन, बंद पडलेल्या साखर कामगारांचे प्रश्‍न गंभीर आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने हा मोर्चा काढला आहे. यातूनही सरकारने भूमिका न घेतल्यास येत्या विधानसभेच्या वेळी कामगारांची ताकद दाखवून देऊ. 

साखर कामगारांचे प्रश्न माझ्या अखत्यारित येत नसून ते कामगार आयुक्तांच्या अंतर्गत आहे. कामगारांचे निवेदन कामगार आयुक्तांपर्यंत पोहोचवून साखर कामगारांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी या वेळी सांगितले.   या आहेत प्रमुख मागण्या 

  • साखर व जोडधंद्यातील कामगारांना वेतन व सेवाशर्ती ठरविण्याबाबत तातडीने त्रिपक्षीय समिती गठीत करावी. 
  • अंतिम निर्णय होईपर्यत साखर उद्योगातील कामगारांना पाच हजार रुपयांची अंतरिम वाढ द्यावी. 
  • साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक व तात्पुरते काम करणाऱ्या कामगारांना अकुशल कामगारांच्या वेतानाप्रमाणे मागील करारातील तरतुदीनुसार वेतन मिळाले पाहिजे. 
  • साखर उद्योगाताली कामगारांचे थकीत वेतन मिळण्यासाठी शासनाने वेगळा निधी उभारावा व थकीत वेतन मिळवून द्यावे. खासगी साखर कारखान्यांमधील कामगारांना वेतनवाढीच्या करारानुसार वेतन द्यावे. 
  • बंद पडलेल्या साखर कारखान्यांतील कामगारांचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यात यावेत. 
  • शासनाने योग्य त्या उपाययोजना करून साखर उद्योगातील कामगारांचे इतर चालू कारखान्यांमध्ये पुनर्वसन करण्यात यावे. 
  • एकतर्फी राज्य कामगार संघटनेस विचारात न घेता करीत असलेल्या आकृतिबंध आम्हाला मान्य नाही. त्यामुळे प्रातिनिधिक संघटना व कारखाना यांच्यामध्ये चर्चा करूनच अंतिम आकृतिबंध तयार करण्यात यावा. 
  • साखर उद्योगातील सेवानिवृत्त कामगारांना सात हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com