कृषी महाविद्यालयाने उभारले २६ पीक वाणांचे संग्रहालय

कृषी महाविद्यालयाने उभारले २६ पीक वाणांचे संग्रहालय
कृषी महाविद्यालयाने उभारले २६ पीक वाणांचे संग्रहालय

‘दुर्मीळतेकडून मुबलकतेकडे ही संकल्पना दुर्लक्षित, नामशेष वाणांची लागवड औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथील दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालयाने दुर्मीळ, नामशेष होत चाललेल्या तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने व्यावसायिक मूल्यवर्धन होऊ शकणाऱ्या पीक वाणांचे संग्रहालय आपल्या प्रक्षेत्रात उभारले आहे. यात सुमारे ३६ विविध वाणांची लागवड झाली आहे. ‘दुर्मीळतेकडून मुबलक’तेकडे ही संकल्पना घेऊन सुरू केलेल्या या उपक्रमाचा शेतकरी, विद्यार्थी तसेच अभ्यासकांनाही मोठा फायदा होणार आहे. खरीप, रब्बी हंगामातील मुख्य पिकांबाबत आपल्याला पुरेशी माहिती असतेच. मात्र आपल्याकडे जैवविविधता इतकी आहे की विविध कृषी हवामानात येणाऱ्या विविध पिकांची संख्याही चांगली आहे. त्यातील अनेक पिके दुर्लक्षित किंवा उपेक्षितही राहिली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथील दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालयाने अशा पिकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आणताना आपल्या प्रक्षेत्रात पीक संग्रहालय उभे केले आहे. पोषकतत्त्वांनी वा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असणारे, अत्यल्प पाण्यावर तग धरू शकणारे विशेषत: बदलत्या हवामानामध्ये किंवा वाढत्या तापमानात चांगले उत्पादन देणाऱ्या अनेक पीक वाणांचा त्यात समावेश आहे. यातील अनेक पिके एकतर दुर्मीळ होत चालली आहेत किंवा काही पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच दुर्मीळतेकडून मुबलकतेकडे ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून महाविद्यालयाने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. सुमारे ३६ वाणांचा संग्रह हे संग्रहालय शेतकऱ्यांसाठी निश्‍चित महत्त्वाचे आहेच. शिवाय शास्त्रज्ञ, विद्यार्थी, अभ्यासक यांच्यासाठीही ते ज्ञानाचे भांडार ठरणारे आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये घेण्यात येणाऱ्या कणखर दुर्मीळ पिकांचे वा वाणांचे छत्तीस स्वतंत्र प्लॉट येथील प्रक्षेत्रावर डौलाने उभे आहेत. काळानुरूप लोप पावत चाललेल्या जैवविविधतेचा होणारा वाढता ऱ्हास काही प्रमाणात थांबावा, बाजारपेठेत चांगला दर मिळवून देण्याची क्षमता असलेल्या हंगामी पिकांची शास्त्रोक्त ओळख व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांसाठी ‘प्रॅक्टिकल’ अनुभव याबाबत बोलताना महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. विनायक शिंदे-पाटील म्हणाले की या उपक्रमातून परिसरातील युवा शेतकऱ्यांना अधिक ऊर्जा मिळेल. त्यांच्या ज्ञानात भर पडेल. कृषी विषयाचे शिक्षण विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अभ्यासक्रमातून मिळत असतेच. पण येथे संग्रहालयासाठी त्यांना प्रत्यक्ष मशागत, लागवड, आंतरमशागत व तत्सम कामे करावी लागतात. त्यामुळे हे विद्यार्थी जेव्हा घरी परततील तेव्हा त्यांना त्या पिकांमधील तंत्रज्ञान आपल्या शेतीत वापरणे सोपे होते. आपल्या पालकांच्या कष्टाचीदेखील या निमित्ताने जाणीव होते. विविध गुणधर्मांचे वाण येथे अंबाडी, नाचणी, राळा, कुळीथ, देशी कापूस, राजगिरा, बोरू, भात, ओवा, मटकी, एरंडी, रान शेवरी, ताग, तीळ, घाटमाथ्यावरील तांदूळ (अपलँड राईस) अशा विविध पिकांच्या विविध वाणांची लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक वाणावजवळ त्याच्या महितीचे फलक लावण्यात आले आहेत. भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना महाविद्यालयाच्या प्राध्यापकांकडून त्यासंबंधीची संपूर्ण माहिती दिली जाते. कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार लागवड हंगाम, लागवडीची पद्धत, लागवडीचे अंतर, कार्यक्षम अन्नद्रव्ये, पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण, काढणी या सर्व बाबींचे योग्य मार्गदर्शन या निमित्ताने केले जाते. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून बियाणे संकलित केले आहे. तसेच विद्यापीठाच्या शिफारशींनुसार लागवड करण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे. यापुढेही प्रत्येक वर्षी खरीप-रब्बी हंगामातील तसेच दुर्मीळ भाजीपाला पिकांचे, आयुर्वेदिक व औषधी पिकांच्या लागवडीतून संग्रहालयाचा विस्तार करण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे. कमी उत्पादन खर्च असणाऱ्या या पिकांचा बाजारपेठेच्या दृष्टीनेही अधिक अभ्यास झाला तर युवा शेतकऱ्यांसाठी ही नगदी पिके ठरतील, असे डॉ. शिंदे यांचे म्हणणे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. बैनाडे, उपप्राचार्य डॉ. बी. एम. जोशी यांनी या संग्रहालयासाठी मार्गदर्शन केले आहे. तर प्राध्यापक वर्गात गणेश घुगे, संजय बडे, डॉ. विनायक शिंदे, निखिल जाधव, पूजा सूर्यवंशी, माधवी भालाधरे, तुषार जगताप, अशोक पगार व विद्यार्थ्यांनी त्यासाठी मेहनत घेतली आहे. वाणांचे गुणधर्म समजून घेण्याची गरज डॉ. शिंदे म्हणाले की, जी पिके दुर्लक्षित म्हणून ओळखली जातात त्यांच्यात अनेक गुणधर्म आहेत. त्यांची आपल्याला माहिती असणे गरजेचे असतो. उदाहरण द्यायचे तर राळ्याच्या दाण्यापासूनच्या पिठाच्या भाकरी तयार करतात. अशक्त व्यक्ती व रुग्णांना दाणे दुधात शिजवून देतात. दाण्यांचा उपयोग पाळीव पक्ष्यांचे खाद्य म्हणूनही होतो. पीक फुलावर असताना त्याचा कापूस सावलीत वाळविल्यास चांगल्या प्रकारची वैरण तयार होते. वरी हे देखील शरीराचे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त व ‘ग्लुटेन’ मुक्त तृणधान्य आहे. अंबाडीच्या पानांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व व लोहाचे प्रमाण अधिक आहे. त्यातील फुलांमधील जैविक गुण उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रविकार, कोलेस्टेरॉल यावर गुणकारी असतात. अंबाडीच्या बियांपासून जे तेल काढतात त्यास हॅश ऑईल असे म्हणतात. कुळीथाचे पीकदेखील मुतखडा या विकाराला प्रतिबंध करण्यासाठी लाभदायक आहे. शारीरिक वजन कमी करणे तसेच महिलांमधील विकारांवरही ते उपयोगी आहे. संग्रहालयातील वाणांची माहिती

  • कापूस देशी– १०७, एनएचएच-४४, बार्बाडस
  • मूग- बीएम-२००३-२००२, बीपीएमआर-१४५
  • उडीद - टीएयू-१, बीडीएन-१
  • सोयाबीन- एमएयू-७१, एमएयू-१६२, एमएयू-६१२
  • ज्वारी (रब्बी)- परभणी भक्ती, पीव्हीआर-८०१
  • बाजरी- एएचबी- १२००, एएचबी-१२६४
  • तूर- बीडीएन-११, बीडीएन-१६, बीएसएमआर-७३६
  • मका- एनएचएम-४०५३, एमआरएम-३८४५
  • सूर्यफूल- एनएसएफ-१००१, एनएसएफ-१७१
  • भुईमूग- टीएलजी-४५
  • संपर्क- डॉ. विनायक शिंदे-पाटील- ७०७१७७७७६७ प्रा. गणेश घुगे- ८६००७०५७६८ (लेखक दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, जि. औरंगाबाद येथे सहायक प्राध्यापक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com