कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
यशोगाथा
भाजीपाला, फळबागेतून बसवली आर्थिक घडी
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील सोमनाथ लाटवडे यांनी सुमारे २२ वर्षे मजुरी केली. त्यातून अडीच एकर शेती घेत भाजीपाला व फळबागेची लागवड केली.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील सोमनाथ लाटवडे यांनी सुमारे २२ वर्षे मजुरी केली. त्यातून अडीच एकर शेती घेत भाजीपाला व फळबागेची लागवड केली. त्याला करारावर घेतलेल्या दोन एकर शेतीची जोड मिळाली आहे. यातून मिळालेल्या पैशातून आर्थिक घडी बसवली आहे.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ हा सतत अवर्षणग्रस्त तालुका. कवठेमहांकाळचे मधुकर नरसाप्पा लाटवटे या कुटुंबाकडे फक्त १३ गुंठे वडिलोपार्जित शेती. शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करावा लागे. त्यातच विजेच्या खांबांच्या उभारणीच्या मजुरीचे काम मिळाले. जिल्हाभर फिरून काम दिवसाकाठी एक रुपया मजुरी मिळे. पुढे वाढ होत तीन रुपयांपर्यंत पोहोचली. यातूनही काही विशेष भागत नसल्याने शेवटी कराराने शेती घेऊ लागले. जोडीला गवंडी कामही सुरू होते. मधुकर यांचा मुलगाही सोमनाथही धडाडीचा. सातवीपर्यंत कसेबसे शिक्षण झाल्यानंतर शेत मजुरीला सुरुवात केली. सुटल्यानंतर शेतमजुरीच करायला सुरुवात केलेली. सुमारे २० ते २२ वर्षे त्यांनी मजुरी केली. आपण दुसऱ्यांच्या शेतात किती दिवस राबायचं, आपलीही शेती असावी, या उद्देशाने हळूहळू पै पै जोडली. काही उधार उसनवारी करत २०१२ मध्ये सुमारे ९ लाख रुपये खर्चून त्यांनी अडीच एकर शेती खरेदी केली. ही माळरानाची जमीन होती. यंत्राच्या साह्याने मोठमोठे दगड बाजूला काढले. त्यात एक हजार ट्रॉली काळी माती टाकली. एक कूपनलिकाही घेतली. पण त्याला पाणी कमी लागले. या सर्व कामांसाठी सुमारे साडेसात लाख रुपये खर्च करावे लागले.
भाजीपाल्यासह ॲपलबेर ः
पाण्याची सोय झाल्याने १३ गुंठ्यांमध्ये टोमॅटो, खरबूज, भेंडी अशी भाजीपाल्याची लागवड सुरू केली. त्यातून खेळता पैसा सुरू झाला. डाळिंब किंवा द्राक्षापेक्षाही वेगळे नगदी पीक काय करता येईल, याचा शोध सुरू झाला. ‘ॲग्रोवन’चे नियमित वाचक असलेल्या सोमनाथ यांच्या वाचनात ॲपलबेरची माहिती आली. ‘ॲग्रोवन’मधून शेतीतील विविध प्रयोग, तांत्रिक पद्धतीची माहिती मिळते. यामुळे शेतीत नवे काही करण्याची ऊर्मी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. ॲपलबेर उत्पादन शेतकऱ्याशी बोलून माहिती घेतली. त्याच्या शेताला भेट दिली. मग २०१३ मध्ये ३० गुंठ्यांमध्ये १० बाय १२ फूट अंतरावर या प्रमाणे २१० रोपांची लागवड केली. प्रति रोप ६२ रुपये असा खर्च आला. पाणी कमी पडू लागले. २०१४ मध्ये जवळच तीन गुंठे जमीन खरेदी करून तिथे विहीर घेतली. तेथून एक किलोमीटर अंतराची पाइपलाइन केली. शेतीतून मिळणाऱ्या पैशातून काही रक्कम बाजूला काढत संपूर्ण क्षेत्रासाठी ठिबक सिंचन केले.
स्वतः केले मार्केटिंग
ॲपलबेर लागवडीनंतर साधारण १८ महिन्यांनी उत्पादनाला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी पाच टन ६०० किलो इतके उत्पादन मिळाले. त्याला सरासरी २३ रुपये प्रति किलो दर मिळाला. खर्च वजा जाता फारसे काही हाती राहिले नाही. तरीही सोमनाथ यांनी हताश न होता अधिक चांगले व्यवस्थापन केले. २०१६ मध्ये उत्पादन १७ टनांवर पोचले. दरही चांगला (सरासरी ४२ रुपये प्रति किलोपर्यंत) मिळाला. तिसऱ्या वर्षी २०१७ मध्ये उत्पादन २३ टन ८०० किलोवर पोचले. त्याला सरासरी ४२ रुपये प्रति किलो असा दर मिळाला. पहिल्या वर्षी ॲपल बेर विक्रीमध्ये अडचणी आल्या. विविध बाजार समित्यांमध्ये प्रयत्न केल्यानंतर शेवटी सांगली येथील फळ बाजारात अपेक्षित दर मिळू लागला. तिथे प्रति किलो कमाल ३७ रुपये, किमान १० रुपये, तर सरासरी दर २० ते २५ रुपयांपर्यंत मिळतो. फळे-भाजीपाला यांच्या विक्रीसाठी सांगलीबरोबर कोल्हापूर येथेही केली. यातून सोमनाथ यांचा विश्वास वाढला. कराराने दोन एकर शेती घेऊन त्यातही ॲपलबेरची लागवड केली.
पीक बदलाचा निर्णय
वातावरणातील बदलामुळे कीड-रोगांच्या प्रमाणात वेगाने वाढ झाल्याचा फटका ॲपलबेरला बसला. अपेक्षित दर्जेदार उत्पादन मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षी दोन एकर क्षेत्रात द्राक्ष बाग लावली. त्यासाठी ३.५ लाख रुपये खर्च आला. पहिल्या पिकातून ५६०० पेट्या (चार किलोची पेटी) मिळाल्या. त्याला सरासरी १४६ रुपये प्रति पेटी असा दर मिळाला. एकूण ६ लाख ५० हजार रुपये उत्पन्न मिळाले. कराराच्या शेतीतील ॲपलबेरने साथ दिल्याने त्यातील उत्पन्नाचा नवीन पिकाच्या लागवडीसाठी फायदा झाला. मात्र या शेतीमध्येही या वर्षी द्राक्ष लागवडीचे नियोजन केले आहे.
कुटुंबाची साथ
सोमनाथ यांच्या कुटुंबीयांमध्ये आई सखूबाई, वडील मधूकर, पत्नी जयश्री यांचा समावेश आहे. त्यांचा मुलगा शिवकांत हा बी. एस्सी. (कृषी) पदवीला आहे, तर मुलगी समीक्षा ही आठवीत शिकत आहे. घरातील सर्वांची शेती कामात मदत होते.
साधारण वार्षिक ताळेबंद
- एकूण उत्पन्न ः ६ ते ७ लाख रुपये.
- विमा ः ६० हजार रुपये
- आरोग्य ः २० हजार रुपये
- मुलांच्या शिक्षणासाठी ः ५० हजार रुपये
- पुढील पिकासाठी आवश्यकतेनुसार खर्च केला जातो. त्याची सोय पीक कर्जातून करतो.
- आणीबाणीच्या प्रसंगी २० टक्के
- एक चारचाकी, एक दुचाकी आहे. मात्र शेतीसाठी आवश्यक यंत्रांच्या खरेदीचे नियोजन सुरू आहे. या वर्षापासून एकूण उत्पन्नाच्या १५ टक्के बचत सुरू केली आहे.
- दावणीला दोन म्हशी असून, एक देशी गाय आहे. त्यामुळे दुधाचा प्रश्न मिटतो.
- ६ शेळ्या असून, त्यांच्या विक्रीतून घरखर्चाला आधार होतो.
- कुटुंबीयासाठी आवश्यक धान्य शेतातच पिकवले जाते.
- बांधावर नारळ ५, आंबा ३०, चिकू ५ अशा फळझाडांची लागवड केली आहे.
सोमनाथ लाटवडे, ९४२३८०९००६