शेतीला मिळतोय मधमाशीपालनाचा मोठा आधार
केवळ अडीच एकर शेतीला उदरनिर्वाहासाठी मधमाशीपालनाची जोड देत बीड जिल्ह्यातील राजुरीमळा (ता. गेवराई) येथील वाल्मीक गर्जे यांनी तो यशस्वी केला आहे. परागीकरणासाठी मधपेट्या शेतकऱ्यांना पुरवण्याचा त्यांचा व्यवसाय जम धरत आहे. बीड जिल्ह्यातील राजुरीमळा (ता. गेवराई) येथील वाल्मीक रामकृष्ण गर्जे यांच्या वाट्याला एकूण ६ एकर वडिलोपार्जित शेतीपैकी अडीच एकर शेती आली. गोदावरी नदीच्या काठावरील या गावामध्ये विहिरीलाही पाणी तसे वर्षभर पुरते. पाण्याची सोय असल्याने वाल्मीक हे दरवर्षी टरबूज आणि खरबुजाची लागवड करतात. भरपूर शेणखत घालून गादीवाफे तयार केल्यानंतर त्यावर प्लॅस्टिक मल्चिंग करतात. त्यावर लागवड करूनही उत्पादन तुलनेने कमी (८ ते १० टन) येत होते. उत्पादन वाढण्याच्या उद्देशाने खामगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये भेट दिली. तेथील डॉ. एन. के. भुते यांनी त्यांना परागीकरण, फुलोरा आणि फळांची संख्या यांचे गणित उलगडून दाखवले. कमी खर्चामध्ये सातेरी मधमाशीपालनाविषयी माहिती दिली. अधिक प्रशिक्षण घेण्यासाठी लातूर येथील दिनकर पाटील यांचे नाव सुचवले. पाटील हे उत्तम मधमाशीपालक असून, त्यांच्याकडे ३ हजारांपेक्षा अधिक मधपेट्या आहे. त्यांच्याकडे आठ दिवस पूर्णवेळ राहून संपूर्ण मधमाशीपालनाची माहिती घेतली. या प्रशिक्षणासाठी त्यांनी काही मोबदला घेतला नाही. अशा प्रकारे त्यांना मधमाशीपालनाची गोडी लागली. सुरुवातीला केवळ पाच मधपेट्या घेत वाल्मीक यांनी सुरुवात केली. केवळ शेतीतील उत्पादनवाढीसाठी सुरू केलेल्या या पूरक उद्योगातून त्यांचे उत्पादन तर वाढले; पण आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांचाही फायदा होऊ लागला. यातून त्यांच्याकडे मधपेट्यांची मागणी वाढत गेली. आता त्यांच्या पेट्या बीड जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांतही जातात. मधपेट्या केवळ परागीकरणासाठी
मधपेट्यांची वाहतूक ही रात्रीच्या वेळीच करावी लागते. प्रचार आणि प्रसार हाच आधार गोदाकाठचे गाव असल्याने आजूबाजूला झाडझाडोरा, फुले यांची उपलब्धता होती. शिवारामध्ये डाळिंब, टरबूज, खरबूज आणि कांदे यांचे मुख्य उत्पादन घेतले जाते. त्यामुळे मधमाश्यांसाठी अन्नाची कमतरता भासत नाही. शेतीतील उत्पादनासाठी मधमाश्या किती महत्त्वाच्या आहेत, याविषयी आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी ते सातत्याने बोलत असतात. सातेरी मधमाशीचे शास्त्रीय व यशस्वी संगोपन, परागीभवनाचे महत्त्व याबाबत ते शेतकऱ्यांनी जागृत करतात. त्यातून हानिकारक ठरणाऱ्या कीडनाशकांचा वापर कमी होण्यास मदत होत आहे. यातून मधमाशीचा मृत्यूदर कमी करण्यात यश आले आहे. वाल्मीक आता मधमाशीपालनाचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. मधपेट्यांतून उत्पन्न
मधमाशीपालनामुळे शेती उत्पादनात वाढ
कुटुंबाची साथ मधमाशीपालनासह शेतीमध्ये पत्नी जयश्री यांची मदत होते. मुले पार्थ आणि प्रज्ञा अद्याप लहान असून, ते शाळेत जातात. त्यांच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष एक लाख रुपयांची तजवीज करणे शक्य होत आहे.
सातेरी ही मधमाशी माझ्यासाठी खरी लक्ष्मी ठरली आहे. केवळ शेतीतून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे तसे अवघडच ठरले असते. माझ्या परिवाराच्या सुख समाधानामध्ये मधमाशीपालनाचा मुख्य वाटा आहे. मधमाशीपालनाकडे वळण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र, खामगाव येथील तज्ज्ञांचाही त्यात मोठा वाटा आहे. - वाल्मीक गर्जे, ७८८७३६३८३२
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.