संपादकीय
संपादकीय

नकाशा दाखवेल योग्य दिशा

सध्याच्या अति अनिश्चित पाऊसमानाच्या काळात बदलत्या पीक पद्धतीबाबतचा आढावा तालुका, गावपातळीवर घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन झाले तर ते अधिक फायदेशीर ठरेल.

जागतिक तापमानवाढीमुळे बदललेल्या हवामानाच्या समस्येने आता गंभीर रूप धारण केले आहे. आपल्या देशात, राज्यात तर मागील काही वर्षांपासून ऋतूचक्र बदलाचा अनुभव येतोय. पूर्वी पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू वर्षात प्रत्येकी चार महिने असे बरोबर विभागले गेले होते. आता तसे राहिले नाही. पावसाळ्यातून पाऊस गायब झालाय, हिवाळ्यात थंडी राहिली नाही तर अर्धा उन्हाळा पावसाने गाजतोय. ऋतूतील अशा बदलामुळे शेतीचे नुकसान तर वाढले, परंतु त्याहूनही गंभीर बाब म्हणजे हवामान आधारित राज्याची पीक पद्धती विस्कळित झाली आहे. सध्याच्या काळात नेमकी कोणती पिके घ्यावीत, कोणती घेऊ नयेत, या संभ्रमावस्थेत राज्यातील शेतकरी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग आधुनिक होत असल्याची चर्चा आहे, परंतु त्याहूनही अधिक चर्चेचा आणि विनोदाचा विषय त्यांचे अंदाज ठरताहेत. 

आधुनिक ड्रॉप्लर रडारचे जाळे देशभर पसरले आहे. इस्त्रोचे दोन संवेदनशील उपग्रह वातावरणाचे अहोरात्र निरीक्षण करीत आहेत, ठिकठिकाणी हवामानाच्या नोंदीकरिता स्वयंचलित उपकरणे बसविली जात आहेत. परंतु अजूनही हवामानाचा अचूक वेध घेऊन त्यानुसार शेतीचे नुकसान कमी करण्यात या विभागाला यश लाभलेले दिसत नाही. खरे तर राज्याला मागील अडीच-तीन दशकांपासून हवामान बदलाचे चटके बसत असताना तेेव्हापासूनच याचा अभ्यास चालू करून त्यानुसार पीक पद्धतीत बदल, पिकांचे व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे होते. परंतु आता उशिरा का होईना राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये हवामान बदलाचा अभ्यास होऊन शेतकऱ्यांना ‘ॲग्रोक्लायमॅटिक ॲटलास’च्या माध्यमातून मार्गदर्शन होणार आहे, याचे स्वागतच करायला हवे. 

 देशपातळीवर हवामान बदलाचा अभ्यास मागील अनेक वर्षांपासून चालू असल्याचे सांगितले जात असले तरी त्याचे दुष्परिणाम नेमके कसे टाळायचे, याबाबत शेतकऱ्यांना अजूनही थेट मार्गदर्शन होत नाही. हवामान बदलासंबंधी विखुरलेला अभ्यास आणि माहितीमुळे हे होत आहे. आता ॲग्रोक्लायमॅटिक ॲटलासच्या माध्यमातून हवामान बदलाचा पायाभूत अभ्यास होऊन विखुरलेल्या स्वरूपातील माहितीही एकत्र करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान या प्रमुख हवामान घटकांबरोबर वातावरणाशी निगडित बारकावे ॲटलास(नकाशे)च्या माध्यमातून मांडले जाणार असल्याने ते शेतकऱ्यांना समजणे सोपे जाईल. विशेष म्हणजे आजच्या काळात कोणती पीक पद्धती फायदेशीर ठरेल, याचा जिल्हा पातळीवर आढावा घेऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जाणार असल्याने त्यांचे होणारे नुकसान टळेल अथवा ते कमी तरी होऊ शकते. सध्याच्या अति अनिश्चित पाऊसमानाच्या काळात हा आढावा तालुका, गावपातळीवर घेऊन पीक पद्धतीबाबत मार्गदर्शन झाले तर ते अधिक फायदेशीर ठरेल. याबाबतही कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यायला हवा. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे या ॲटलासचा अभ्यासावर कृषी विद्यापीठांनी आपल्या संशोधनाची दिशा बदलायला हवी. हवामान बदलास अनुकूल नवीन वाणं, पीक व्यवस्थापन पद्धती शेतकऱ्यांना मिळायला हव्यात. हवामान बदलाची माहिती देणारा ॲटलास अभ्यासकांबरोबर शेतकऱ्यांपर्यंतही पोचायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com