शुद्ध रोपांपोटी...

जातिवंत झाडेच रोपवाटिकेत लावली गेली पाहिजेत, डोळाबांधणीसाठीचे मातृवृक्षही जातिवंतच असावेत, अशी तरतूद रोपवाटिका कायद्यात आहे.
संपादकीय
संपादकीय

लिंबूवर्गीय फळपिकांवर सिट्रस ग्रीनिंग रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे उत्पादन आणि गुणवत्ताही खालावत असल्याचे केंद्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद लदानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे. त्याच वेळी रोगमुक्त रोपांचा शेतकऱ्यांना पुरवठा न होणे, हे त्यामागील एक कारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर याच संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात विदर्भातील ५० टक्के रोपवाटिका अनधिकृत (कोणत्याही परवान्याविना) असल्याचेही पुढे आले आहे. खरे तर संत्रा, मोसंबी या फळपिकांवर रोग-किडींचा वाढता प्रादुर्भाव, निकृष्ट दर्जाच्या रोपांचा शेतकऱ्यांना पुरवठा या बाबी काही नवीन नाहीत. केंद्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्थेच्या या पूर्वीच्या संचालकांनीदेखील वारंवार या बाबी स्पष्ट केल्या आहेत. अशा वेळी प्रश्न पडतो तो, यात सुधारणा होऊन शेतकऱ्यांना दर्जेदार रोपं कधी मिळणार? जंबेरी व रंगपूर लाइमच्या खुंटावर संत्रा रोपे बांधली जातात. उत्तरेकडील राज्यांमधून (प्रामुख्याने पंजाब, हिमाचल प्रदेश) या खुंटांचा पुरवठा होतो. अधिक उत्पन्नाच्या अपेक्षेने गलगल (पहाडी लिंबू) खुंटाची त्‍यात भेसळ केली जाते. रोपवाटिका धारकांकडून पुढे याच खुंटावर कलमे बांधून शेतकऱ्यांना वितरित केली जातात. अशा भेसळयुक्त खुंटावरील फळझाडे रोग-किडींना बळी पडून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. विशेष म्हणजे हे वर्षानुवर्षांपासून चालू असून, याकडे संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे, कृषी विभाग आणि शासनाचेदेखील लक्ष नाही, ही बाब अधिक गंभीर आहे. 

विदर्भातील शेतकऱ्यांबरोबर ग्रामीण अर्थकारणास कलाटणी देण्याचे सामर्थ्य संत्रा या फळपिकात आहे. परंतु रोपांपासून ते प्रक्रिया-निर्यातीपर्यंत शासन आणि संशोधन पातळीवर हे फळपीक दुर्लक्षित राहिले आहे. त्यामुळे या फळपिकाचे क्षेत्रविस्तार आणि उत्पादकता वाढीस राज्यात खीळ बसली आहे. खुंट रोगप्रतिकारक, चांगली वाढ होणारा आणि त्यावरील कलम अधिक तसेच दर्जेदार फळे देणारे असेल तरच बाग निरोगी राहते, हे फळबाग लागवडीचे मूलतत्त्व आहे. लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये मात्र या मूलतत्त्वालाच तडे देण्याचे काम अनेक वर्षांपासून चालू आहे. रोपवाटिकेतील भेसळीबाबत केंद्रीय संशोधन संस्था कृषी विभागाकडे बोट दाखवित असताना या दोघांच्या समन्वयातूनच लिंबूवर्गीय फळ उत्पादकांचे संकट दूर होणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे. जातिवंत झाडेच रोपवाटिकेत लावली गेली पाहिजेत, डोळाबांधणीसाठीचे मातृवृक्षही जातिवंतच असावेत, अशी तरतूद रोपवाटिका कायद्यात आहे. सुदैवाने देशात केवळ आपल्या राज्यात हा कायदा लागू असून, त्याचीही नीट अंमलबजावणी होत नाही, ही बाब मात्र दुर्दैवी म्हणावी लागेल.

कृषी विभागाने अनधिकृत रोपवाटिकांवर कारवाई करून शेतकऱ्यांना खात्रीशीर आणि दर्जेदार रोपांचाच पुरवठा होईल, हे पाहावे. लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये आकर्षक रंग, चव, अधिक टिकाऊ, रोगप्रतिकारक, निर्यातक्षम अशा गुणवैशिष्ट्यांचे वाण नाहीत, अशी शेतकऱ्यांची मागील अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने रोगप्रतिकारक ऍलिमो नावाच्या नवीन खुंटाबरोबर संत्र्याचे चार वाण येत्या चार-पाच वर्षांत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील, असा दावा सुमारे पाच वर्षांपूर्वी केला होता. त्याचे काय झाले ते आधी स्पष्ट करायला हवे. खुंटाबरोबर लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये नवनवीन जाती विकसित करून त्यांचा प्रसार संशोधन केंद्रे, रोपवाटिका व्यावसायिक आणि शेतकऱ्यांमध्ये व्हायला हवा. असे झाल्यास अनधिकृत रोपवाटिकांना आळा बसून शेतकऱ्यांना दर्जेदार रोपं मिळतील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com