निर्मितीनंतर तणनाशकाचा शेतकऱ्यांपर्यंतचा प्रवास

निर्मितीनंतर तणनाशकाचा शेतकऱ्यांपर्यंतचा प्रवास
निर्मितीनंतर तणनाशकाचा शेतकऱ्यांपर्यंतचा प्रवास

संशोधनाअंती मूलद्रव्यांचा शोध घेतल्यानंतर प्रयोगशाळा किंवा बंदिस्त वातावरणामध्ये चाचण्या सुरू होतात. त्यातून पार पडल्यानंतर तणनाशकाच्या प्रत्यक्ष शेतामध्ये अनेक निकष पडताळण्यासाठी पुन्हा चाचण्या होतात. सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी ठरलेले रसायन आर्थिक निकषांच्या पातळीवर बसल्यानंतर कंपनी बाजारात उतरवण्याचा विचार करते. ही सर्व वाटचाल प्रिन्सिपल्स ऑफ वीड सायन्स या पुस्तकामध्ये सविस्तर दिली आहे. तणनाशकाची निर्मिती ही खर्चिक बाब आहे. कारण, त्यातील यशाच्या शक्यता अत्यंत कमी असतात. परिणामी, संशोधनासाठी प्रचंड आर्थिक गुंतवणूक करावी लागते. इतक्या संशोधनानंतर एखादे रसायन तणनाशक म्हणून काम करणे शक्‍य असल्याचे आढळल्यानंतरही त्याची पुढील वाटचाल काटेरी असते. ही सर्व वाटचाल प्रिन्सिपल्स ऑफ वीड सायन्स या पुस्तकामध्ये सविस्तर दिली आहे. वास्तविक या उत्पादनाचा अंतिम ग्राहक आणि वापरकर्ता हा शेतकरी आहे. ही सर्व प्रक्रियेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचल्यास तणनाशकांविषयीच्या अनेक शंका दूर होण्यास मदत होईल. एखादे तणनाशक तयार झाल्यानंतर होणाऱ्या चाचण्या  सर्वप्रथम माती भरलेल्या कुंड्यात ठरावीक तणे व पिकासाठी त्याचे परीक्षण केले जाते. पेरणीपूर्वी व पेरणीनंतर असे दोन प्रकारात कुंड्यातील मातीवर ठरावीक मात्रेत औषध फवारणी केली जाते. तण व पीक उगविण्यापूर्वी मातीवर तसेच पीक व तण उगविल्यानंतर पिकासह तणावर फवारणी करून या नवीन तणनाशकाच्या गुणधर्माचा अभ्यास केला जातो. या चाचण्या प्रामुख्याने काचगृह अगर प्रयोगशाळेतील बंदिस्त वातावरणात केल्या जातात. यातील उपलब्ध होणाऱ्या निरीक्षणांची व्यवस्थित नोंद केली जाते. या तपासणीत बाद होणाऱ्या रसायनांची टक्केवारी ८५ ते ९० टक्क्यांच्या आसपास असू शकते. या पायरीतून निवड झालेली रसायने पुढील तपासणीस पात्र ठरतात. पुढील पायरीत रसायनांच्या फवारणीसाठी मात्रांचा तसेच त्याच्या वापरातून कोणकोणती तणे मारता येतात, पिकाची प्रतिकारकता यांचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जमीन व हवामानामध्ये त्याची कार्यक्षमता तपासली जाते. हे कामही प्रामुख्याने काचगृहातच केले जाते. या चाचणीतून निवड झालेली रसायने पुढील प्रत्यक्ष शेतातील परीक्षणासाठी पात्र ठरतात. प्रत्यक्ष शेतातील चाचण्यांसाठी कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था व काही स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाते. या पायरीत परत एकदा हेक्‍टरी मात्रा, फवारणीची वेळ, नियंत्रणात येणारी तणे, कोणत्या पिकासाठी वगैरेंचा सविस्तर अभ्यास केला जातो. यानंतर सदर रसायनाचे पीक उत्पादन व जमिनीत राहणाऱ्या औषधांच्या शेष भागाबाबतही अभ्यास केला जातो. तणनाशकाची रितसर सरकारी नोंदणी होण्यापूर्वी त्याच्या वापराचा पर्यावरणावर होणारा परिणाम पूर्णपणे अभ्यासण्यात येतो. या चाळणीतून निवड झालेल्या तणनाशक उत्पादन व विक्रीच्या अर्थशास्त्राचा अभ्यास कारखानदाराकडून केला जातो. त्याच्या वापराने प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा होणारा फायदा, बाजारात उपलब्ध असणाऱ्या पर्यायी तणनाशकांच्या स्पर्धेला तोंड देण्याची क्षमता अशा विविध अंगाने अभ्यास केला जातो. रसायनाचे शेषभाग टिकून राहण्याचा गुणधर्माच्या (पर्सिस्टंसी) अभ्यासात कृषी उत्पादनात येणारे उर्वरित अंश, वनस्पतींच्या शिल्लक अवशेषांच्या विघटनातून तयार होणारे रासायनिक घटक, त्याचा मानव व प्राणी यांच्या अन्नचक्रातील पुढील वाटचालीचा सविस्तर अभ्यास केला जातो. शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्षामध्ये कोणतेही रसायन पोचण्यापूर्वी सरकारमार्फत योग्य ती काळजी घेतली जाते, हेच यातून अधोरेखित करावयाचे आहे. तणनाशकांच्या संशोधनावरील खर्च आणि विक्रीचे गणित १९७८ या वर्षीच्या सर्वेक्षणानुसार, त्याकाळी एकूण खपाच्या ४७% वापर एकट्या अमेरिकेत होत होता. तर १९% युरोप, ११% जपान व उर्वरित २३% जगातील अन्य देशांत असा तणनाशकाचा खप होता. तणनाशकांचा जगातील एकूण ३७१६ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा व्यापार होता. वरील सर्वेक्षणातून असे दिसून येते, की २/३ हिस्सा युरोप, अमेरिकेतील खपाचा आहे. तणनाशके उत्पादन करणे हे खूप मोठे खर्चिक काम असल्याने याविषयीचे सर्व संशोधन या विकसित देशातच झाल्याचे दिसते. यातही आघाडीवरील देश अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड व जपान अशा केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत देशातच तणनाशकासंबंधित संशोधन झाल्याचे दिसते. या सर्व प्रक्रिया पार करून एखादे रसायन बाजारात येण्यासाठी ६-१० वर्षांचा कालावधी लागतो. यापुढे त्या तणनाशकाचे स्वामित्व हक्क १५ वर्षेपर्यंत उत्पादकाला मिळतात. १५ वर्षांनंतर सदर तणनाशकाचे उत्पादन अन्य कोणीही करू शकतो. अर्थात, ही माहिती १९८४ मध्ये प्रकाशित पुस्तकातील आहे, त्यामुळे यातील काही कायदेशीर तपशीलांमध्ये दरम्यानच्या काळामध्ये बदल झालेले असू शकतात. मात्र, प्रदीर्घ प्राथमिक गुंतवणूक आणि मर्यादित स्वामित्व हक्ककाळ या दोहोंचे संतुलन साधून नफा मिळवणे ही तशी अडथळ्याची शर्यत ठरते. फार थोड्या कंपन्यांना हे सर्व साधणे शक्य होते. मला बरेच दिवस प्रश्‍न पडत असे, की भारतातील शास्त्रज्ञ व तंत्रज्ञान इतके प्रगत होऊनही आपण एखादे नवे रसायन शोधून बाजारात का आणू शकत नाही? या प्रश्‍नाचे उत्तर येथे मिळते. एखादे तणनाशक अमेरिकेत नोंदणी केले गेले, की लगेच त्याला जगभरचा बाजार खुला होत नाही. आता तिसऱ्या जगातील बहुतेक देशाचे सेंट्रल इन्सेक्‍टिसाईड बोर्ड असा एक स्वतंत्र विभाग असतो. भारतायी बाजारात प्रवेश करण्यापूर्वी सदर तणनाशकाची रितसर नोंदणी करावी लागते. नोंदणी झाल्यानंतर त्या तणनाशकाच्या चाचण्या व परीक्षण कृषी विद्यापीठात अगर मान्यताप्राप्त संशोधन संस्थेकडून करून घ्याव्या लागतात. या चाचण्यांमध्ये तणनियंत्रण, मुख्य पिकावरील परिणाम, जमिनीत व पिकात राहणारे उर्वरीत अंश, पर्यावरणावर होणारे परिणाम तपासले जाते. त्यानंतर त्यांच्याकडून हे तणनाशक वापरण्यास योग्य असल्याचा दाखला मध्यवर्ती संस्थेकडे सादर केला जातो. यानंतर सुरवातीला दोन वर्षांसाठी सदर तणनाशकाला बाजारात विक्रीचा परवाना मिळतो. दोन वर्षांच्या काळात सदर तणनाशकाविषयी कोणतीही तक्रार न आल्यास पुढे कायमस्वरूपी विक्रीचा परवाना मिळतो. तणनाशकाप्रमाणेच कीटकनाशक, बुरशीनाशकांनाही अशाच प्रक्रियेतून पुढे जावे लागते. पर्यावरणाच्या समस्या व प्रश्‍नांबाबत बहुतांश सर्व देश जागरूक होत आहेत. अशाच सर्व काटेकोर नियमावली लहान-मोठ्या सर्वच देशांमध्ये करण्यात आलेल्या आहेत. माझा अनुभव मी १९७० साली शेती करण्यास सुरवात केली. नुकतेच आम्ही एक फवारणी यंत्र विकत घेतले होते. पदार्पणापासूनच पीक संरक्षण रसायनाशी संबंध चालू झाला. त्या वेळी एखादे रसायन फवारून तणे मारता येतात, अशी कविकल्पनाही लोकांच्या मनामध्ये नव्हती. तणनियंत्रणासाठी बाजारात पैसे मोजून रसायने विकत आणून फवारणी करणे असा विषयही फारसा माहीत नव्हता. २, ४-डी हे एकमेव रसायन त्या काळात भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होते. या वेळी अमेरिकेतील बाजारपेठेत दोनशे तणनाशके विक्रीस होती. पुढे भारतातही वेगवेगळ्या तणनाशकांचे आगमन झाले. मी जवळपास ४० वर्षे तणनाशकाचा वापर करतो. मला त्याचा कोणताही वाईट परिणाम अनुभवास न आल्याने मानवी निंदणीकडून संपूर्णपणे तणनाशकाकडे वळलो. कारण, माझ्या १०-१२ एकर शेतीमध्ये मानवी भांगलणी कशी ४०-५० दिवसांनंतर परत परत करावी लागते. एका रानातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या अशा प्रकारे. तणनाशकांचा आणि माझा संपर्क सतत राहत आला आहे. आज माझे वय ७० असून, कोणताही आजार नाही. आजही मी शेतात दिवसभर काम करीत असतो. तणनाशकाच्या वापराबाबत लोकांच्या मनामध्ये भीती बसली आहे. प्रत्येक जण मला विचारतो, यांच्या वापरामुळे जमिनीतील जिवाणूंचे काय होईल? ४०-५० वर्षांपूर्वी या जिवाणूंचा शेतकरी मेळाव्यात उल्लेखही होत नसे. आज मोठ्या प्रमाणावर उल्लेख होत असला तरी त्याला शास्त्रीय आधार काहीही नसतो. मी मानवी निंदणी बंद करून तणनाशकाने निंदणी करण्यास सुरवात केल्यानंतर मला उत्पादनात भरपूर वाढ मिळाली. मी सूक्ष्मजीव शास्त्राचा विद्यार्थी असूनही तणनाशकाचा वापर करतो. वास्तविक चांगले कुजलेले खत टाकल्याने सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेत वाढणारे व जमिनीला सुपीकता देणाऱ्या जिवाणूंना खाद्य राहत नाही. चांगले कुजलेले शेणखत कंपोस्ट वापरून हे सुपीकता देणारे जिवाणू आपण जमिनीतून संपविले आहेत, असे माझे मत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com