निरभ्र वातावरणात वाढणाऱ्या थंडीपासून बागेचे संरक्षण 

निरभ्र वातावरणात वाढणाऱ्या थंडीपासून बागेचे संरक्षण
निरभ्र वातावरणात वाढणाऱ्या थंडीपासून बागेचे संरक्षण

येत्या आठवड्यामध्ये बहुतांशी सर्व द्राक्ष विभागामध्ये वातावरण निरभ्र राहणार आहे. अपवाद फक्त सांगली, सोलापूर भागामध्ये गुरुवारी व शनिवारी काही प्रमाणात ढगाळ राहण्याची शक्यता आहे. थंडीच्या काळामध्ये वातावरण निरभ्र राहिले की पहाटे सूर्योदयाच्या आधी तापमान काही काळ फार कमी होण्याची शक्यता असते. विशेषतः माळरानावरील हलक्या जमिनीचा भाग, तसेच नदी, तलाव किंवा नाले असे पाण्याचे स्रोत जवळ असलेल्या व खोलगट भागात तापमान जास्त प्रमाणात घटण्याची शक्यता असते. सध्या मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा दिलेला आहे. या थंडीच्या लाटेच्या प्रभावाखाली द्राक्ष विभागामध्ये विशेषतः नाशिक, नगर व सोलापूर भागामध्ये काही ठिकाणी तापमान फार खाली जाण्याची शक्यता आहे. तसे पाहता सध्याचे किमान तापमान १५ -१६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. अंदाजानुसार ते १३ ते १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे. वर नमुद केल्याप्रमाणे काही ठिकाणी हे तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षाही खाली जाऊ शकेल. अशा भागांमध्ये बागेला थंडीमुळे नुकसान होऊ शकते. बागायतदारांनी आपल्या बागेतील तापमान मोजून अंदाज घेत राहावे. त्यानुसार योग्य ती काळजी घ्यावी. थंडीपासून बागेचा बचाव करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करता येतील. 

  1. ज्या ठिकाणी तापमान ४ -५ अंशापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी पहाटे लवकर बागेच्या जवळपास शेकोट्या पेटवणे फायद्याचे ठरू शकेल. ज्या दिशेने बागेकडे हवा येते, त्या दिशेला शेकोटी पेटवल्यास बागेतील तापमान वाढते. बागेचा अतिथंडीपासून बचाव होण्यास मदत होते. विशेषतः खोलगट भागामध्ये अशी काळजी घेणे आवश्यक असते. 
  2. सिलिसिलिक अॅसिड आधारित सिलिकॉन पानांवर फवारल्यास त्यातून सिलिकॉन हे अन्नद्रव्य झाडांना मिळते. सिलिकॉन पानांची व मण्यांची थंडीविरुद्धची प्रतिकारक क्षमता वाढवते. सर्व विभागामध्ये पहाटे काही काळ तापमान कमी राहणे व त्यानंतर सूर्योदयानंतर ते वेगाने वाढणे या दोन्ही गोष्टीमुळे नुकसान होण्याची शक्यता असते. विशेषतः जीए, सीपीपीयू, ब्रासिनोस्टेरॉईड्स, सीवीड एक्स्ट्रॅक्ट ( सागरी शैवाळाआधारित टॉनिक्स), अमिनो अॅसिड फवारलेल्या बागांमध्ये नुकसानीचा जास्त धोका असतो. 
  3. कायटोसॅन २ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर प्रमाणामध्ये फवारल्यास पानांवर किंवा घडांवर सूक्ष्म आवरण तयार होते. त्यामुळे मण्यांचे थंडीपासून संरक्षण होते. वाढत्या मण्यांचे क्रॅकिंग होणेसुद्धा कमी होऊ शकेल. कायटोसॅन वापरलेल्या बागांमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी अॅम्पिलोमायसिस या जैविक नियंत्रणासाठी वापरलेले फॉरम्युलेशन्स फवारल्यास चांगल्या प्रकारे काम करते. भुरीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळू शकते. 
  4. थंडीच्या काळात बाष्पोत्सर्जनाचा (पानातून होणाऱ्या बाष्पीभवनाचा) वेग कमी होतो. अशा वेळी मुळातून दिल्या जाणाऱ्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. मण्यात पाणी भरण्यास सुरवात झालेल्या बागेमध्ये जरूरीपेक्षा जास्त पाणी दिल्यास क्रॅकिंग होऊ शकते. 
  5. सध्याच्या वातावरणामध्ये तसे पाहता कोणताही रोग जास्त वाढणार नाही. परंतु, वातावरण ढगाळ राहिल्यास व कॅनोपिमध्ये आर्द्रता वाढल्यास भुरी वाढू शकते. या भुरीच्या नियंत्रणासाठी नियमितपणे सल्फर (८० डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रतिलिटर व अॅम्पिलोमायसिस ८ ते १० मिलि प्रतिलिटर आलटून पालटून फवारलेले असल्यास बागेमध्ये भुरी वाढणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com