जागतिक हवामान कसे घडते?

जागतिक हवामान कसे घडते?
जागतिक हवामान कसे घडते?

जागतिक हवामान ही सतत बदलणारी गोष्ट असून, त्यावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये उत्सर्जित किरणे, भूविज्ञान आणि अक्षांशसारख्या अनेक घटकांचा समावेश असतो. विविध क्षेत्रांतील हवामान हे भिन्न असून, त्यानुसार त्याचे काही टप्पे पाडले जातात. या स्थानिक हवामानावर परिणाम करणारे अनेक स्थानिक घटक असतात. या भागामध्ये असलेल्या कृषी क्षेत्राशी संबंधित हवामानाचे भागही पाडता येतात. उदा. महाराष्ट्रामध्ये आठ कृषी हवामान विभाग आहेत. हवामान म्हणजे काय? एखाद्या भागातील दीर्घकाळाची (३० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ) वातावरणीय स्थिती म्हणजेच त्या भागातील हवामान होय. पृथ्वीवरील विविध भागांत हवामान वेगवेगळे आढळते. सूर्याच्या थेट पडणाऱ्या प्रकाशामुळे विषुववृत्तावरील वातावरण अतिउष्ण असते. याउलट ध्रुवीय भागावर सूर्यप्रकाश विशिष्ट कोनामध्ये पडत असल्यामुळे तेथील तापमान अतिथंड असते. अतिउष्ण व अतिथंड अशी विरोधाभास स्थिती दिसून येते. मात्र अक्षांशानुसार ही स्थिती बदलत जाते. काळानुरूप झालेले बदल ः मागील दोन दशलक्ष वर्षांमध्ये पृथ्वीचे हवामान सातत्याने बदलत गेले. या कालखंडात पृथ्वीवरील बराचसा भाग जास्त काळासाठी बर्फाच्छादित होता, यालाच हिमयुग म्हणून ओळखले जाते. यादरम्यान संपूर्ण उत्तर युरोप, सायबेरिया, न्यूझीलंड, तस्मानीया, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेचा भूभाग सुमारे १ हजार मीटर उंचीच्या बर्फाच्या चादरीने झाकलेला होता. शेवटचे हिमयुग हे सुमारे १० हजार वर्षापूर्वी संपले. प्रदीर्घ कालखंडामध्ये पृथ्वीच्या हवामानात सातत्याने झालेल्या बदलामुळे सध्याचे उबदार हवामान अनुभवत आहोत. सद्यःस्थितीत ध्रुवीय भागातील बर्फाचे प्रमाण हे हिमयुगाच्या तुलनेत खूप कमीच आहे. पृथ्वीच्या वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहेत. त्यासाठी हवामान बदलासाठी हरितगृहवायूंचे होणारे उत्सर्जन हे प्रमुख कारण आहे. सतत बदलत्या हवामानामुळे अतिउष्ण भागांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी ध्रुवीय भागातील बर्फ जलद गतीने वितळत आहे. वैज्ञानिकांच्या मते, सूर्याकडून मिळणारी उष्णता, ऊर्जा आणि पृथ्वीच्या भूगर्भातील हालचालींमुळे हवामान नियंत्रित केले जाते. परंतू, या दोन प्रमुख ऊर्जेशिवाय वारा, समुद्र आणि पर्वतरांगा याद्वारेदेखील हवामान काही अंशी नियंत्रित होते. उदा. वाऱ्याद्वारे समुद्राकडून जमिनीच्या दिशेने बाष्पाचे वहन होऊन वातावरणात आर्द्रता निर्माण होते. दक्षिणेकडील भागात वाऱ्याचा कल ईशान्य व दक्षिणपूर्व पाहायला मिळतो. हे वारे उष्णकटिबंधीय भागात जवळ येऊन वादळे, पाऊस आणि बाष्प ही परिस्थिती निर्माण होते. विषुववृत्तापासून सुमारे ३० अंशांपर्यंत उत्तर-दक्षिण वाऱ्याचा प्रवाह तुलनेने कमी असतो. त्यामुळेच समुद्राच्या आतून वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये थोडेफार बाष्प निर्माण होते. तसेच कोरडी हवा पृष्ठभागावर वाहिल्यामुळे वातावरण उष्ण होते. जगातील अनेक वाळवंटी प्रदेश, उदा. सहारा, आखाती प्रदेश, मेक्सिकोचा काही भाग हे एकाच अक्षांशांवर असल्याचे दिसते. तसेच ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या दक्षिणेकडील भागामध्येदेखील वाळवंटाचा पट्टा दिसून येतो. पर्वतरांगांमधून वाहताना वाऱ्याची गती वाढते. यादरम्यान हवा थंड होऊन ढगांमध्ये बाष्प निर्माण होते. पाऊस पडतो. एका बाजूला पर्जन्यछायेचा प्रदेश किंवा दुष्काळी प्रदेश तयार होतो. महासागराहून वाहणाऱ्या बाष्पामुळे वादळी पावसासारखी स्थिती तयार होते. यामुळे किनारपट्टीवरील तापमानात बदल दिसून येतो. सन १९०० च्या सुरुवातीला हवामान शास्त्रज्ञ व्लादिमीर कप्पेन यांनी जागतिक हवामान एक्सोस्फीयर, थर्मोस्फीअर, मेसोस्फीयर, स्ट्रॅटोस्फीयर आणि ट्रॉपोस्फीयर या पाच प्रमुख घटकांत विभागले आहे. त्यांच्या मते, उष्णकटिबंधीय भागातील हवामान उष्ण आणि दमट असते. मैदानी आणि वाळवंटी भागातील तापमान कोरडे व अतिउष्ण असते. तलाव, नद्या किंवा महासागराजवळ दमट, थंड व त्यासोबतच अतिउष्ण वातावरण पाहायला मिळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com