‘जलयुक्त’मधून खंदर माळवाडीचं शिवार झालं हिरवंगार

गावालगत असलेल्या तलावातील गाळ काढण्यात आला. त्याची साफसफाई करून खोलीकरण केल्याने आज तलावात मुबलक पाणीसाठा दिसतो आहे.
गावालगत असलेल्या तलावातील गाळ काढण्यात आला. त्याची साफसफाई करून खोलीकरण केल्याने आज तलावात मुबलक पाणीसाठा दिसतो आहे.

शेतकऱ्यांनी निवडली व्यावसायिक पीकपद्धती नगर जिल्ह्यातील खंदर माळवाडी (ता. संगमनेर) गावाला येथील ग्रामस्‍थांनी जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून जलस्‍वंयपूर्ण केले आहे. गावशिवारातील विहिरींची पाणीपातळी वाढली. पीकपद्धती बदलून अर्थकारणाला गती मिळाली. शिवारातील उजाड माळरानावर आज भाजीपाला शेती बहरली असून, कौटुंबिक अर्थव्‍यवस्‍थेला बळकटी मिळाली आहे. गावाने केलेल्‍या या कामामुळेच जिल्‍हा पातळीवर गावचा जलमित्र पुरस्‍काराने गौरव करण्‍यात आला आहे. नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुका मुख्‍यालयापासून तीस किलोमीटरवर खंदर माळवाडी (जि. नगर) हे डोंगराच्‍या कुशीत गाव वसले आहे. शेतीवरच गावची अ‍र्थव्‍यवस्‍था आधारलेली आहे. पूर्वी गावाला पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागे. पिकांची विविधता जपण्यावर मर्यादा येत. त्यामुळेच गावाचा जलयुक्‍त शिवार अभियानात समावेश करण्यात आला. कामांचा श्रीगणेशा प्रथम गावाचा भौगोलिक अभ्यास करण्‍यात आला. सरपंच वैशाली डोके, उपसरपंच प्रमोद लेंडे यांच्या नेतृत्वाखाली अभियान राबवण्‍याचा ग्रामस्थ शेतकऱ्यांनी संकल्‍प केला. लोकसहभाग वाढावा यासाठी सेवा सोसायटीचे चेअरमन, तंटामुक्‍त समितीचे अध्यक्ष यांचाही सहभाग घेतला. लोकसहभाग वाढू लागला.

गावात जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीपासून थेट नव्याने नाला खोलीकरणाची कामे सुरू झाली. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, तत्‍कालीन जिल्‍हाधिकारी अनिल कवडे, जिल्‍हाधिकारी अभय महाजन यांच्‍या मार्गदर्शनाखाली जिल्‍हा कृषी अधीक्षक पंडित लोणारे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडळ कृषी अधिकारी दशरथ गडाख, कृषी पर्यवेक्षक किशोर आहेर, कृषी सहायक दिलीप वाकचौरे, ग्रामसेवक भारत देशमुख यांचे प्रयत्‍न महत्त्वाचे ठरले.

कांमाची पूर्तता नाल्यांचे रुंदी-खोलीकरण व गरज असलेल्या ठिकाणी नव्याने बंधारा बांधण्याचे काम हाती घेतले. गावालगतच्या तलावात गाळ साचला होता. झाडाझुडपांनी नाल्याला वेढले होते. त्याची साफसफाई करून खोलीकरण करण्यात आले. अभियानांतर्गत सलग समतल चर, कंपार्टमेंट बंडिग, माती नालाबांध, सिमेंट नालाबांध, गाळ काढणे, गॅबीयन बंधारे, पाझर तलाव दुरुस्ती, नाला खोलीकरण, नाला दुरुस्ती, लुज बोल्डर आदी कामे झाली. बाजरी, मठ, हुलग्‍याचे गाव झाले कांद्याचे गावात सुमारे ४५० मिलिमीटर पाऊस पडतो. गाव परिसरात सुमारे ७५ टक्के जमीन हलकी तर उर्वरित खडकाळ आहे. ‘जलयुक्‍त शिवार’च्या यशस्वी कामांमुळे गावातील पीकपद्धतीत बदल घडत आहे. गावात पूर्वी बाजरी, मूग, मठ, हुलगा, मका अशी खरिपाची पि‍के घेतली जायची. आता शिवारात पाणी उपलब्‍ध झाल्‍यानंतर रब्बीमध्ये कांदा, गहू, हरभरा, डाळिंब व भाजीपाला अशा पिकांखालील क्षेत्र वाढले आहे.

गावात आज सुमारे २५० ते ३०० हेक्‍टरवर कांदा लागवड अाहे. उजाड माळरानावरही ठिबकवर कांदा लागवड करण्‍यात आली आहे. महामार्गालगत पडीक शिवारात भाऊसाहेब साळगट यांच्याकडे सद्यःस्थितीत कांदा काढणी सुरू आहे. माळरानावर फुललेला दर्जेदार कांदा पाहून साळगट यांच्‍या चेहऱ्यावर समाधान आहे. संगमनेर व आळेफाटा या बाजारपेठा जवळच असल्याने विक्रीही सुलभ झाल्याचे शेतकरी सांगतात. पाणी नियोजनाचा आदर्श प्रमोद लेंडे यांची आठ एकर शेती आहे. त्‍यातील चार एकरांत कांदा, एकरभर तूर, दोन एकर ज्‍वारी, वीस गुंठे भेंडी व उर्वरित क्षेत्रात गहू, हरभरा आहे. ठिबकवर कांदा घेऊन त्यांनी पाणी नियोजनाचा आदर्श ठेवला आहे. वर्षभरापूर्वी केवळ खरिपावर भिस्त ठेवणाऱ्या गावाने रब्‍बी पिकांचे नियोजन यशस्‍वी केलेच; शिवाय उन्‍हाळी हंगामाचे नियोजनही करणार असल्‍याचे गावातील शेतकरी सांगतात.

जलयुक्त अभियानांतर्गत झालेली ठळक कामे

  • सलग समतल चर - २० हेक्टर
  • सुमारे ७५० हेक्टरवर कंपार्टमेंट बंडिंगचे काम झाले. या कामांमुळे जमिनीची धूप व वाहून जाणारे पाणी थांबविण्यात यश आले. त्यामुळे मृद व जलसंधारण होऊन पाणीपातळीत वाढ झाली आहे.
  • एका माती नालाबांधाचे काम पूर्ण झाले असून, चार टीसीएम क्षमतेचा माती नालाबांध बांधण्यात आला. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाली अाहे. दुबार पिकांसाठी हे काम उपयुक्त ठरले आहे. या पाण्यावर कांदा व भाजीपाला उत्पादनात वाढ मिळणार आहे. चारापीक क्षेत्रात वाढ झाल्यामुळे दुग्ध व्यवयाय वाढीस लागला आहे.
  • गावशिवारातील तीन बंधांऱ्यांतील गाळ काढण्‍याचे काम पूर्ण झाले असून, नऊ टीसीएम क्षमतेने पाणीसाठा वाढला आहे.
  • गावाजवळील ओढ्यावर जुन्या पाझर तलावाची पाणीगळती थांबविण्यासाठी दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे गावच्या पाणीपुरवठा विहिरीच्‍या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
  • गावशिवारातील सहा सिमेंट नालाबांधांच्या कामांचा लाभ शेतीला झाला.
  • कामांची फलश्रुती

  • सलग समतल चर, कंपार्टमेंट बंडिंग व माती नालाबांध झाल्यामुळे दरवर्षी एप्रिल व मे महिन्यांत कोरड्या पडणाऱ्या विहिरींना मेमध्ये पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे विहिरींच्या पाण्यावर या वर्षी शेतकऱ्यांनी भाजीपाला, कांदा, चारापिके, फळबाग घेण्यास सुरवात केली आहे.
  • माती नालाबांधाची कामे झाल्याने शिवाराच्या खालील भागातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे दुबार पिके घेणे शक्य झाले.
  • सलग समतल चर झालेल्या भागात यंदा भूजलपातळीत वाढ झाली.  
  • एका पाझर तलावातून गाळ काढण्‍यात आला. दोन नाल्‍यांचे खोलीकरण करण्‍यात आले. पाच हजार झाडांची लागवड केली. पाच वनराई बंधारेही लोकसहभागातून पूर्ण करण्‍यात आले.
  • प्रतिक्रिया... गावात पूर्वी टँकरने पाणीपुरवठा केला जायचा. गाव टँकरमुक्‍त करण्‍याचा संकल्‍प करून जलयुक्‍त शिवार अभियानातून गावात २०१५ मध्‍ये कामांना सुरवात केली. गावशिवारात कामे झाली आणि विहिरींच्‍या पाणीपातळीत वाढ झाली. गाव जल स्‍वंयपूर्ण झाल्‍याचे मोठे समाधान आहे. सोबतच प्रधानमंत्री उज्‍ज्वला योजनेअंतर्गत गावातील १५० महिलांना सिलिंडर गॅसजोडणी देण्यात आली. गाव हागणदारीमुक्‍त झाले असून, लोकसहभागामुळे हे शक्‍य झाले. - वैशाली डोके, ७५८८६९३३९२, सरपंच, खंदर माळवाडी

    आज गावातील शेतकरी व्यावसायिक पिके घेऊ लागले आहेत. हा मुख्य बदल आपल्याला पाहायला मिळतो. - प्रमोद लेंडे, उपसरपंच, ७५८८५४०५३१

    शेतकरी व कृषी विभागाच्‍या सहकार्याने अनेक वर्षांपासून तलावात साचलेला गाळ काढून खोलीकरण करण्‍यात आले. त्‍यामुळे गावशिवारात पाणीपातळी वाढण्‍यास मदत झाली. - अॅड. दिलीप साळगट, शेतकरी

    माझी दहा एकर शेती मुरमाड, खडकाळ शेती असून, पडीक होती. शेतीलगत तलावात पाणी उपलब्‍ध असल्‍याने डाळिंब, कांदा व ऊस लागवड केली आहे. माझं उजाड माळरान आता सुजलाम, सुफलाम होत आहे याचा आनंद मोठा आहे. - भाऊसाहेब साळगट, शेतकरी

    शेतीलगत झालेल्‍या बंधाऱ्यामुळे पिकांना चांगला फायदा झाला आहे. या वर्षी आणखी दोन महिने पाणी पुरेल असे वाटते. त्‍यामुळे रब्‍बी पिकांना चांगला फायदा होईल. - लक्ष्‍मीबाई बाबासाहेब लेंडे, महिला शेतकरी

    पूर्वी आम्‍ही फक्‍त मठ, हुलगा आदी पिके घेत होतो. शेततळं झालं आणि गहू, हरभरा कांदे घेणं सुरू केलं. - अनिता राजेंद्र लेंडे, महिला शेतकरी

    एकूण कामांतून नव्‍याने ५०० टीसीएम पाणीसाठा अडविण्‍यात आला अाहे. नव्या पीकपद्धतीचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. - दिलीप वाकचौरे, ९४२२१४७०९४, कृषी सहायक (लेखक उपमाहिती कार्यालय, शिर्डी, जि. नगर येथे कार्यरत आहेत)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com