अॅग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी पुरस्कार विजयाताई रवींद्रराव गुळभिले रा. दीपेवडगाव, ता. केज, जि. बीड
कोणत्याही महिलेवर पतीच्या निधनाचा आघात सर्वात मोठा असतो. त्यातच दोन लहान मुले आणि दोन महिन्यांच्या गर्भवतीची स्थिती विचारायला नको. अशाच स्थितीमध्ये दीपेवडगाव (ता. केज, जि. बीड) येथील विजयाताई रवींद्रराव गुळभिले यांनी हातपाय न गाळता स्वतः जमीन कसण्याचा निर्णय घेतला. सिंचनाची सोय करत ऊस, केळी, आले, हळद, गुलाब अशा पिकांमध्ये आधुनिक तंत्राचा वापर केला आहे. शून्यातून शाश्वतेचा हा पल्ला कष्ट, जिद्द आणि धडपडीतून गाठला आहे.
दीपेवडगाव (ता. केज) येथील श्रीमती विजयाताई रवींद्रराव गुळभिले यांच्या पतीचे १९९१ मध्ये आकस्मिक निधन झाले. सामान्यपणे अशा आकस्मिक आघातानंतर हातपाय गाळून माहेरचा आसरा घेतला जातो. मात्र, सोपा पर्याय नाकारत स्वतः जमीन कसण्याचा निर्णय विजयाताईंनी घेतला. कष्ट आणि संघर्ष यातून शेतीत चांगली प्रगती साधली. मोडू पाहणारे घर पुन्हा उभे केले. धारूरचे सुखदेव लक्ष्मणराव सिनगारे यांची लेक असलेल्या विजयाताईंचा विवाह शिक्षक असलेल्या रवींद्रराव गुळभिले यांच्याशी १९८५ मध्ये झाला. ४ मार्च १९९१ रोजी विजयाताई दोन महिन्यांच्या गर्भवती असतानाच रवींद्रराव यांचे हृदयविकाराने निधन झाले. या घटनेने विजयाताईंवर आभाळच कोसळले. दोन चिमुकली मुलं, पोटात वाढत असलेले तिसरे अपत्य व वृद्ध सासू-सासरे यांच्यासह दीपेवडगाव येथे राहायचे की माहेरी आसरा घ्यायचा, हा प्रश्न होता. सुरवातीची पाच वर्षे कधी सासरी तर कधी माहेरी अशी निघून गेली. दु:खातून थोडं सावरल्यानंतर विचाराअंती त्यांनी दीपेवडगावातच राहून जमीन कसण्याचा निर्णय घेतला. मुलांना शिक्षणासाठी भावाकडे धारूरला पाठवले. १९९६ ला विजयाताईंनी सासू-सासऱ्यांच्या मदतीने १५ एकर शेतात खऱ्या अर्थानं काबाडकष्ट करण्यास सुरवात केली.
१९९६ ते २००४ पर्यंत शेतात तूर, बाजरी, ज्वारी, कापूस या पारंपरिक पिकांची लागवड सासू-सासऱ्याच्या मार्गदर्शनाखाली विजयाताई करू लागल्या. पेरणी, लागवडीपासून खुरपणी, सोंगणी, मळणी अशी सारी श्रमाची कामे करू लागल्या. अनुभव नसल्याने, तसेच पाऊस व निसर्गाची साथही न मिळाल्याने २००४ पर्यंत उत्पन्नही कमी मिळत असे. दरवेळी कर्ज उचल केल्याशिवाय पेरणी शक्य होत नव्हती. कौटुंबिक गरजांसोबतच मोठ्या मुलीच्या विवाहामुळे पाच एकर शेती त्यांना विकावी लागली. सिंचनाची काहीतरी सोय केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. काटकसरीतून वाचविलेले काही पैसे आणि भावांच्या मदतीने खासगीतून काही कर्ज घेत विंधनविहिर घेतली. तीनशे फुटांवर त्याला बऱ्यापैकी पाणी लागलं. मोटारपंप व एका एकरापुरती पाइपलाइनची सोय केली. याच काळात थकलेले वृद्ध सासरे वारल्यामुळे मोठा आधार गेला. भारनियमन, विजेचा लपंडाव यामुळे रात्री-अपरात्री पाणी देण्यासाठी जावे लागत असे. मात्र, अशा संकटांना न घाबरता जमेल ती सारी कामं स्वत:च करायला सुरवात केली. पाण्याची शाश्वती झाल्यामुळे २००६ मध्ये सर्वप्रथम दोन एकर ऊस लागवड केली. उत्पन्नामध्ये वाढ होऊ लागली. अन्य पिके व उसाच्या उत्पन्नातून २००७ मध्ये आणखी दोन एकरांत पाइपलाइनची सोय केली. २००९ पर्यंत प्रतिवर्षी दोन एकरप्रमाणे जवळपास आठ एकरांची पाइपलाइन त्यांनी काटकसर व नियोजनातून केली. २०१० मध्ये पहिल्यांदा त्यांनी संपूर्ण दहा एकरांवर कपाशीची लागवड केली. २०११ मध्ये सर्वप्रथम सरी-वरंबा पद्धतीने एका एकरावर आले लागवड केली. त्यामधून त्यांना २० क्विंटल उत्पादन मिळाले. हळदीच्या कंदाची लागवड करून त्यापासून एका एकरातील एका ओळीला पुरेल एवढे बेणे घेतले. त्या बेण्याला २०१३ मध्ये त्यांनी गावरान हळद बेण्याची जोड देऊन एक एकरावर हळदीची लागवड केली. त्यापासून त्यांना ४० क्विटंल हळद मिळाली. थोड्या कच्च्या हळदीपासून त्यांनी घरच्यांसाठी हळद पावडर तयार केली. शेजाऱ्यांकडून अशी दर्जेदार हळद मिळेल का, अशी विचारणा झाली. त्यातून हळदीवर प्रक्रिया करून हळद पावडर विकता येऊ शकते, हा मार्ग मिळाला. मागणी वाढल्याने त्यांनी दहा क्विंटल हळदीची पावडर तयार करून दीडशे रुपये प्रतिकिलोने विकली. २०१४ मध्ये त्यांनी गावरान हळदीऐवजी जास्त उत्पादन देणाऱ्या सेलम जातीच्या हळदीची दोन गुंठ्यांवर लागवड केली. अशा रीतीने हळदीचे गणित व्यवस्थित बसले आहे. विजयाताईंच्या १० एकर शेतीमध्ये सध्या सहा एकर ऊस, एक एकर १० गुंठे केळी बाग, २० गुंठे गुलाब लागवड आणि उर्वरित क्षेत्रावर हंगामी पिके घेतली जातात. ऊस, केळी आणि गुलाब लागवडीमध्ये कांदा, बटाटा, हरभरा यांसारखी आंतरपिके घेतली जातात. थोडे थोडे करीत आता संपूर्ण क्षेत्र ठिबकखाली आणले आहे. बीजप्रक्रिया, जीवाणू खते, आच्छादन अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा त्या वापर करतात. या साऱ्या धडपडीमध्ये मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. दोन्ही मुलींची पदवीपर्यंतच्या शिक्षणानंतर लग्ने करून दिली. मुलगाही पदवीनंतर आता त्यांच्याबरोबरीने शेतीत आला आहे.